+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

खगोलशास्त्रज्ञ गर्ग

भगवान श्रीकृष्ण ,पांडव, कौरव यांचा तो काळ, गर्ग नावाचे एक महान मुनी. त्यांना ताऱ्यांशी गुजगोष्टी करणारा खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात. विश्वरूपाचं अद्भुत वर्णन गर्गमुनि श्रीकृष्णाच्या महालात प्रवचनाद्वारे ऐकवत असत. अनेक नवनिर्माण तेजगोलांच ज्ञान, अनेक नक्षत्रांचे रहस्य त्यांना उलगडलेलं होतं. आकाशाच्या या अमर्याद अवकाशात पसरला आहे 27 ताराकापुंजांचा संभार. सतत वेगाने धावणारा आणि सारे आकाश तेजाने भारून टाकणारा. पुढे ते श्रीकृष्णाला कृतिका, रोहिणी, मृग , वर्षा ,पूनरवसु,अरद्रा पुष्य ,आश्लेषा, मघा, फाल्गुनी ,हस्त, चित्रा ,स्वाती ,विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा या नक्षत्राविषयी सांगत. नक्षत्रांच्या या पसाऱ्यात आपला जीवप्रणेता सूर्य आहे. गर्ग मुनीना तेव्हा जाणवले की नक्षत्र आपलं दैनंदिन, ऋतूंनी विविध रंगी आणि विविध गुणी केलेले जीवन घडवतात, जगण्यासाठी सुखमय करतात. आणि ह्या नक्षत्राच्या ही पलीकडे अमर्याद अतिसुंदर विश्व आहे. हे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. खगोलशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ग्रहज्योतिष विज्ञान आणि फलज्योतिष विज्ञान यांचाही त्यांना चांगला अभ्यास होता. या विस्तीर्ण अवकाशात असंख्य ग्रह गोल पसरलेले दिसतात तरी ते विश्वनीयत्याच्या शिस्तीन बद्ध आहेत. त्यांची हालचाल, त्यांच्या कक्षा नियमित आणि निश्चित आहेत. गर्ग नक्षत्रांची संख्या निश्चित करणारे पहिले खगोलशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांना गर्गसंहितेचा कर्ता मानले जाते. वराहमीहिराची बृहस्थसंहिताही गर्गसंहितेवर आधारित आहे. अथर्व वेदात त्यांच्या नावाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही ऋचा आहेत. नक्षत्र संख्या 27 की 28 या वादात गर्ग यांचा भाग असावा. 20 ते 23 व्या तारका पुंजाच्या क्षेत्रात तेजोगोलांची अशी काही गर्दी आहे त्यामुळे नक्षत्र संख्येचा गोंधळ होतो. याच क्षेत्रात पण फार दूरवर असणारे नक्षत्र म्हणजे अभिजीत.
आकाश गणिताच्या सोय नुसार सूर्याच्या नक्षत्र भ्रमणाच्या काळाला 27 नक्षत्रे मानून भागले तर प्रत्येक भागाला बरोबर पूर्णांकात मोडता येईल असा काळ मिळतो. नक्षत्र मालिकात अश्विनी आणि भरणी ला गर्ग मुनी यांनीच स्थान दिले. गर्ग मुनी म्हणत परमेश्वराने आपल्या जीवसृष्टीचा प्रयोग करायला हीच भूमी मान्य केली. कारण या भूमीला अनेक ऋतुंनी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नानाविध आकर्षक सृष्टीला वैभव दिले व सजवले. वसंत ऋतुनी जीवनाचा बहरीचा उत्साह पूर्ण आणि निष्पाप प्रारंभ दाखवला, ग्रीष्माने कष्टमय आणि कर्तुत्व पूर्ण तारुण्य दाखवले, वर्षा आणि शरद यांनी कर्तुत्वाने निर्माण केलेली समृद्धीजनक लाभवृष्टी दाखवली आणि हेमंत व शिशिर यांनी समृद्ध सुखकारक अशा जीवनाची परिणिती दाखवली. आणि याच ऋतूंच्या गर्भात वसंताचा उत्साहवर्धक उषःकाल आहे या जाणिवेचे बीज निर्माण केले. यातच आपल्या जीवनाचा जणू परिपाठच दडला आहे. आकाशस्थ ग्रहगोल ,तेजोगोल, तारका समूह हे अत्यंत नियमितपणे मार्गक्रमण करतात. त्यांनी भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांचा अभ्यास करायला प्रारंभ केला. यातूनच त्यांना सूर्याचे नक्षत्र भ्रमण लक्षात आलं. सूर्याच्या विशिष्ट नक्षत्रातील स्थानावरूनच त्यांना उन्हाळा ,पावसाळा आणि हिवाळा कळू लागला. वर्षातले महिने, दिवस, दिवसांचे प्रहर , घटीका हे सारे ज्ञान त्यांना आकाशान दिल. प्रत्येक आकाशात असणाऱ्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम होतो हे अटळ आहे, असे गर्ग मुनी त्यावेळी सांगत……………
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन….
प्रा.भालबा केळकर
संकलन डॉ.बाहुबली लिंबाळकर
9834393018

विक्रम साराभाई

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

स्मृतिदिन – ३० डिसेंबर, १९७१

विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ – ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

रखमाबाई सावे

रखमाबाई सावे

 

*जन्मदिन – २२ नोव्हेंबर १८६४*

त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात ‘मुलींना पदवीदान करणे’, हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स ऑफ एडिंबरा ॲंड ग्लासगो’ (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेने उत्तीर्ण झाल्या. ‘लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स’ (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झाले.

रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या ‘शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल’मध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून ‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी ‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.)