+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
डॉ सतीशधवन

डॉ सतीशधवन


जन्म. २५ सप्टेंबर १९२०

सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. धवन यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते.

त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले.


धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले. १९५१ साली त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी केली. कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ अशी ओळख असलेल डॉ. सतीश धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधनाची सुरवात केली.

त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली.

श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय. १९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणा-या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवनसरांना भेटले. रोज १ तासप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. सत्रान्ती आराखडा बनवण्याइतके डॉ. कलामांचे मन खंबीर झाले. १९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली.

डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले. १९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता.

धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत. १० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली.

यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली. त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला.

पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला. या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांनी कसे वागावे याचा आदर्श ‘धवनसर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली, डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले.

१९९० मध्ये हैद्राबादमध्ये ‘पक्ष्यांची उड्डाणे’ या विषयावर धवन सरांचे व्याख्यान झाले, त्यावेळी डॉ. कलामांनी त्यांची ओळख करून दिली. ३१ मे १९९२ रोजी, ‘लॉच व्हेइकल प्रोग्राम’वर धवनसरांनी चर्चा आयोजित केली होती. डॉ. कलामांनी इस्रे संचालकांसमोर आपले विचार मांडले. प्रा. धवन यांनी डॉ. कलामांच्या डीआरडीओमध्ये बदलीची घोषण करून सा-यांना धक्का दिला.

१९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय. १९९९ मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांना लाभला. राष्ट्रीय समस्या सा-यांना बरोबर घेऊन वैज्ञानिक मार्गाने सोडवण्याच्या धवनसरांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे डॉ. कलाम यांना त्या क्षणी वाटले. इस्त्रोचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रेचे’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वायपेयी यांनी केला.

डॉ.सतीश धवन यांचे ३ जानेवारी २००२ रोजी निधन झाले.

संदर्भ- संजीववेलणकर पुणे.
संकलन- डॉ बाहुबली लिंबाळकर

डॉ सतीशधवन

डॉ. असिमा चॅटर्जी

23 सप्टेंबर 1917.
22 नोव्हेंबर 2006.

असिमा चॅटर्जी विज्ञानात डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचे डॉक्टरेट संशोधन वनस्पती उत्पादनांच्या रसायनशास्त्रावर आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्रावर केंद्रित होते.

1954 मध्ये तिची विज्ञान विभागात रीडर म्हणून नियुक्ती झाली.

भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी विज्ञान जगतात आपला झेंडा फडकावला आहे आणि आपल्या शोधांद्वारे पृथ्वीच्या विकासात योगदान दिले आहे. या क्षेत्रात नेहमीच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे, कारण भारतात 20 व्या शतकापर्यंत महिलांना घरातच कोंडून ठेवले जात होते, परंतु त्यानंतरही अनेक महिलांनी हे सामाजिक बंधने तोडून विज्ञानाच्या जगात वेगळे स्थान मिळवले. त्यापैकी एक डॉ. असिमा चॅटर्जी होत्या. एक यशस्वी ऑरगॅनिक केमिस्ट असण्यासोबतच, भारतातील डॉक्टरेट ऑफ सायन्सची पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील आहेत.

असिमा चॅटर्जी यांचा जन्म 23 सप्टेंबर 1917 रोजी बंगालमध्ये झाला. त्यांचे वडील इंद्र नारायण मुखर्जी हे डॉक्टर होते आणि आई कमला देवी. हे एक मध्यमवर्गीय कुटुंब होते, ज्यामध्ये त्यांना शिक्षण क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या वडिलांना वनस्पतिशास्त्रात खूप रस होता आणि चॅटर्जी यांना त्यांच्या आवडीचा वाटा होता.

त्यानंतर असिमाने स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर असिमा चॅटर्जी यांनी राजाबाजार सायन्स कॉलेज कॅम्पसमधून सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि 1944 मध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यांचे डॉक्टरेट संशोधन वनस्पती उत्पादनांच्या रसायनशास्त्रावर आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्रावर केंद्रित होते.

2006 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी तिने हे जग सोडले.

संकलन – डॉक्टर बाहुबली लिंबाळकर.

डॉ सतीशधवन

परभणीचे गिरीरोहक रणजित करेगावकर यांनी सर केले हिमालयातील ब्लॅक पीक शिखर

दिनांक 20.9.2023
शेतकरी आणि महिलांचा व इस्त्रोचा सन्मान म्हणून देशभरातील गिर्यारोहकांनी एकत्र येत उत्तराखंडमधील वीस हजार फूट उंचीचे हिमशिखर सर करत आगळावेगळा संदेश दिला.या गिर्यारोहकांमध्ये परभणीचे गिर्यारोहक रणजीत कारेगावकर यांचा देखील समावेश होता

देशभरात महिलांचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांनी सन्मान करावा या हेतूने देशभरातील गिर्यारोहकांनी एकत्र येत हिमालयात मोहिमेचे आयोजन केले होते या मोहिमेचे नेतृत्वही हरियाणाची महिला गिर्यारोहक एव्हरेस्टवीर मीनू कालीरामन हिने केले.


दिल्ली येथील राहुल शर्मा यांनी पुढाकार घेत ही मोहीम आखली. राजस्थानचे संदीप सैनी, पंजाबचे गुरप्रीत सिंघ सिंधू , डॉ. सुखवीर सिंग, हरजिंदर सिंग, गुरजीत सिंग, उत्तर प्रदेशचे किरपाल सिंग, दिल्लीचे आरुष सैनी व महाराष्ट्र परभणीचे रणजित कारेगांवकर आदींनी यात सहभाग घेतला.

ही मोहीम 8 सप्टेंबर रोजी सांक्री येथून ब्लॅक पिक एक्सपिडिसनचे यश पंवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. पुढे सीमा मार्गे जात चार मुक्काम करत बेस कॅम्प पर्यंतचा खडतर व डोंगरदरी चढून पार केला. वाटेत जिथे जिथे मुक्काम पडला तिथे रात्रीच्या निरभ्र आकाशातील आकाशगंगेचे निरीक्षण करुन त्याचे फोटोही टिपले. 16 सप्टेंबरला बर्फाळ प्रदेशातून वाट काढत अखेर उणे १० तापमानात रात्र काढत शिखर गाठले.


या गिर्यारोहकांनी खडतर प्रवास करत वीस हजार फूट उंचीचे शिखर सर केले व छत्रपती शिवाजी महाराज की जय, माँ.जिजाऊ की जय, संभाजी महाराज की जय, वाहेगुरु दा खालसा वाहेगुरू दि फतेह आदी घोषणा देत तिरंगा ध्वज फडकवला तसेच शेतकरी व महिलांचा सन्मान करा अशयाचे फलक देखील झळकवले.

त्यासोबतच नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांनी केलेल्या यशस्वी चांद्रयान व आदित्य यल 1, आवकाश मोहिमाँचे कौतुक करण्यासाठी हिम शिखरावर इस्रोचा जयजयकार केला आणि परभणी ऑस्ट्रॉनोमिकल सोसाईटीचा फलक या विज्ञानवादी गिर्यारोहकांनी फडकवला.


मोहिमेत गाईड विजय, रघुवीर, जयेंद्र सिंग, प्रदीप व त्रिपन आदींनी मदतनीस म्हणून सहभाग नोंदवला.

डॉ सतीशधवन

कर्मवीर भाऊराव पाटील

शिक्षणाचा दिवा घरोघरी लावणारे, थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक –
2
2 सप्टेंबर 1887.
9 मे 1959.

भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली. तेव्हापासून अनेक विद्वान व बहुजनसमाज आदराने आणि प्रेमाने त्यांना कर्मवीर म्हणू लागला. ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

भाऊराव यांचा जन्म कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.

भाऊराव पाटील हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. त्यातच १९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता.

पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले.

गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

भाऊराव हे बहुजनसमाजाच्या शैक्षणिक उद्धाराकडे वळले, त्याचे वास्तविक कारण सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य करून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. स्वतःच्या मातापित्यांची व समाजाचीही नाराजी त्यांनी ओढवून घेतली. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले. रयत शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने जनतेची झाली. वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली.

गांधींवधानंतरच्या उद्रेकात १९४७ साली संस्थेचे सरकारी अनुदान काही दिवस स्थगित करण्यात आले; पण कर्मवीर भाऊराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाणेदारपणाने लोकाश्रयावर संस्था पुढे चालविली व संवर्धित केली.

कर्मवीर भाऊराव हे विलक्षण जिद्दीचे व धडाडीचे कार्यकर्ते होते. धिप्पाड शरीर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि गरीब, पददलितांचा अंतर्यामी जिव्हाळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होत. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले व राजर्षी शाहू महाराज यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. सद्गुरू गाडगेबाबांचेही रयत शिक्षण संस्थेस अमोल साह्य लाभले.

भाऊराव यांनी भगीरथ प्रयत्नांनी खेड्यापाड्यांत ज्ञानगंगा नेऊन पोचविली. त्यांची रयत शिक्षण संस्था ही आशियातील एक मोठी व नावलौकिक प्राप्त झालेली संस्था असून तिच्या शाखा महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांत व कर्नाटक राज्यात विस्तारलेल्या आहेत. त्यांमध्ये ३१ पूर्व प्राथमिक, ४२ प्राथमिक, ४३८ माध्यमिक आणि ४२ महाविद्यालये आहेत. तसेच गरीब व होतकरू मलांसाठी ५१ आणि मुलींसाठी २९ अशी एकूण ८० वसतीगृहे आहेत (२०१९).


संदर्भ :
Matthew, A. V., Karmaveer Bhaurao Patil, Satara, 1958.


संकलन -डॉक्टर बाहुबली लिंबाळकर

डॉ सतीशधवन

आदित्य एल 1

भारत सूर्याच्या किती जवळ जाणार, L1 म्हणजे काय? जाणून घ्या इस्रोच्या आदित्य-L1 बाबत सर्व माहिती….
ISRO Aditya L1 Mission: चंद्रावर गेल्यानंतर आता भारत सूर्याच्या जवळ जाण्यास सज्ज झाला आहे. पण, सूर्याच्या उष्णतेने आदित्य-L1 जळून राख का होणार नाही? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

सूर्याच्या पृष्ठभागापासून थोडे वर म्हणजेच फोटोस्फिअरचे तापमान सुमारे ५५०० अंश सेल्सिअस इतके असते. त्याच्या केंद्राचं कमाल तापमान १५ दशलक्ष अंश सेल्सिअस असतं. अशा स्थितीत कुठलंही यान किंवा स्पेसक्राफ्ट तेथे जाणं शक्य होत नाही. पृथ्वीवर मानवाने बनवलेली अशी कोणतीही वस्तू नाही जी सूर्याची उष्णता सहन करू शकेल. म्हणूनच स्पेसक्राफ्टला सूर्यापासून योग्य अंतरावर ठेवले जाते किंवा काही अंतरावरुन त्याचं भ्रमण केलं जातं.

इस्रो २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.५० वाजता आदित्य-एल१ मिशन लाँच करणार आहे. ही भारतातील पहिली अंतराळ आधारित वेधशाळा आहे. आदित्य-एल१ सूर्यापासून इतक्या लांब असेल की त्याला उष्णता जाणवेल, पण तो नष्ट होणार नाही किंवा खराब होणार नाही. त्याला अशाच प्रकारे तयार करण्यात आलं आहे.आदित्य-एल१ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून केले जाईल. या प्रवासादरम्यान आदित्य-एल१ १.५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करेल. म्हणजेच ते सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर दूर, पृथ्वीच्या जवळ असेल. तर १.५ दशलक्ष किलोमीटरचे अंतर चंद्राच्या अंतरापेक्षा चारपट जास्त आहे. प्रक्षेपणासाठी PSLV-XL रॉकेटचा वापर केला जाणार आहे आहे. ज्याचा क्रमांक PSLV-C57 आहे.

L1 म्हणजे Lagrange Point One म्हणजे काय?

आपल्या ताऱ्याला म्हणजेच सूर्याचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. तर, पृथ्वीचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. अंतराळात जिथे या दोघांचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना भिडते. किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जिथे संपतो, तिथून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सुरू होतो. या मधल्या बिंदूला Lagrange Point म्हणतात.

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच लॅरेंज बिंदू चिन्हांकित केले गेले आहेत. भारताचे सूर्ययान लॅरेंज पॉइंट १ म्हणजेच L1 येथे तैनात असेल.दोन्हीच्या गुरुत्वाकर्षणाची जी सीमा आहे, तिथे एखादी छोटी वस्तू जास्त काळ राहू शकते. ती दोघांच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेली असेल. त्यामुळे अवकाशयानाचे इंधन कमी वापरले जाते. तो बराच वेळ काम करु शकतो. L1 हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरळ रेषेच्या डावीकडे स्थित आहे. हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे. म्हणजे १५ लाख किमी. तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५० दशलक्ष किलोमीटर आहे. एकूण पाच लॅरेंज पॉइंट्स आहेत – L1, L2, L3, L4 आणि L5.


आदित्यसारख्या खडतर मिशनचा प्रवास कसा पूर्ण होणार?

आदित्य-L1 लोअर अर्थ ऑर्बिट (LEO) येथून प्रवास सुरू करेल. म्हणजेच पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेट ते LEO मध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार ऑर्बिट मॅन्यूवरनंतर ते थेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या म्हणजेच स्फेअर ऑफ इन्फ्ल्यूएन्स (SOI) च्या बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझ फेज सुरू होईल. हे काही काळ चालेल.यानंतर आदित्य-एल१ हे हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येईल. L1 बिंदू कुठे आहे. हा बिंदू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण, सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त १ टक्के आहे. या प्रवासात १२७ दिवस लागणार आहेत. हे फार अवघड असेल असं मानले जात आहे कारण त्याला दोन मोठ्या कक्षेतून जावे लागणार आहे. पहिली अवघड कक्षा म्हणजे पृथ्वीच्या SOI च्या बाहेर जाणे. कारण पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट खेचून घेते. यानंतर समुद्रपर्यटन क्रूज फेज आणि हॅलो ऑर्बिटमध्ये L1 हे स्थान कॅप्चर करणे. हे फार महत्त्वाचं असेल. त्याचा वेग इथे नियंत्रित केला नाही तर तो थेट सूर्याकडे जाईल आणि जळून राख होईल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जातोय आदित्य एल-१

सूर्य हा आपला तारा आहे. त्यातूनच आपल्या सूर्यमालेला ऊर्जा मिळते. त्याचे वय सुमारे ४५० कोटी वर्षे मानले जाते. सौरऊर्जेशिवाय पृथ्वीवरील जीवन शक्य नाही. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे या सूर्यमालेतील सर्व ग्रह स्थिर आहेत. अन्यथा, ते खूप कधीच अंतराळात तरंगत राहिले असतेन्यूक्लियर फ्यूजन सूर्याच्या मध्यभागी म्हणजेच कोरमध्ये घडते. त्यामुळे सूर्याच्या आजूबाजूला आगीच्या ज्वाळा दिसतात. पृष्ठभागाच्या थोडंवर म्हणजे त्याच्या फोटोस्फियरचे तापमान ५५०० अंश सेल्सिअस पर्यंत असते. सूर्याचा अभ्यास याकरिता केला जात आहे जेणेकरुन सूर्यमालेतील उर्वरित ग्रहांबद्दल समजून घ्यायला मदत मिळेल.

सूर्यामुळे पृथ्वीवर रेडिएशन, उष्णता, चुंबकीय क्षेत्र आणि चार्ज्ड पार्टिकल्स यांचा सतत प्रवाह असतो. या प्रवाहाला सौर वारा किंवा सोलर विंड म्हणतात. ते उच्च ऊर्जा असलेल्या प्रोटॉनने बनलेले असतात. सौर चुंबकीय क्षेत्राची माहिती मिळते, जे खूप स्फोटक आहे. येथेच कोरोनल मास इजेक्शन (CME) होते. त्यामुळे येणाऱ्या सौर वादळामुळे पृथ्वीचे अनेक प्रकारची हानी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच अंतराळातील हवामान जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे हवामान सूर्यामुळे चांगलं होतं आणि बिघडतंही.


आदित्य मिशनचा मुख्य उद्देश काय?

सूर्याच्या कोरोनामधून बाहेर पडणाऱ्या उष्णता आणि उष्ण वाऱ्यांचा आदित्य अभ्यास करणार आहे.

सौर वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

सौर वाऱ्यांचे वितरण आणि तापमानाचा अभ्यास करेल.

सौर वादळे, सौर लहरी आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम याचे कारण अभ्यासणार आहे.

संकलन डॉ. बी. व्हि. लिंबाळकर

डॉ सतीशधवन

चांद्रयान 3– मोहिमेतून नक्की काय मिळणार

लँडिंगचा आनंद आहेच पण या मोहिमेतून नक्की काय मिळणार आहे हे जाणूया थोडे विस्तृतपणे

चंद्रयान-2 मध्ये ज्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या चंद्रयान 3 मध्ये काढून टाकत लँडर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आला आहे.
प्रपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर सात प्रकारच्या उपकरणांनी सुसज्ज आहेत. यामध्ये लँडरवरील चार, रोव्हरवरील दोन आणि प्रोपल्शन मॉड्यूलवरील एक यंंत्राचा समावेश आहे.
इस्रोने चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटरसह विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे लँडर मॉड्यूलचा भाग म्हणून पाठवले होते.
चांद्रयान-2 चं ऑर्बिटर जवळपास चार वर्षांपासून चंद्राभोवती फिरत आहे.

प्रपल्शन मॉड्यूल


17 ऑगस्ट रोजी चंद्रयानाचं लँडर प्रपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यात आले. त्याचे वजन 2145 किलो आहे आणि प्रक्षेपणाच्या वेळी त्यात 1696 किलो इंधन होते.
चंद्रयान-3 च्या प्रपल्शन मोड्यूलमध्ये शेप नामक उपकरण देखील जोडण्यात आले आहे. शेप (SHAPE) म्हणजे स्पेक्ट्रो पोलरोमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लेनेटरी अर्थ. हे शेप उपकरण प्रपल्शन मोड्यूलसोबत चंद्राभोवती फिरत राहील आणि इतर दूरच्या ग्रहांचे स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक सिग्नलद्वारा निरिक्षण करेल आणि तिथे पृथ्वीसारखे जीवन आहे का याचा शोध घेईल.
इस्रोचा अंदाज आहे की हे यान तीन ते सहा महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. हे शेप उपकरण प्रोपल्शन मॉड्युलमध्ये बसवलेल्या एस बँक पॉन्डरवर गोळा केलेली माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्क पर्यंत पोहोचविण्याचं काम करेल.


लँडर मॉड्यूल


चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे.
ते दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर, त्यांचं आयुष्य केवळ एका दिवसाचं असेल. म्हणजे चंद्रावरील एक दिवसात त्याचं संशोधन केलं जाईल.
चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. (चंद्रावर एक दिवस आणि एक रात्र असं चक्र पूर्ण होण्यासाठी पृथ्वीवरचे 28 दिवस लागतात. )


लँडर


चंद्रयान-3 चे लँडर दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद, एक मीटर 116 सेमी उंच आणि 1749 किलो वजनाचे आहे. चंद्रयान-3 च्या दळणवळणात लँडर महत्त्वाची भूमिका बजावेल कारण हे लँडर रोव्हर सोबतच चंद्रयान-2 वेळी प्रक्षेपित केलेल्या ऑर्बिटरशी देखील संवाद साधेल. याशिवाय, तो बंगळुरूजवळील बेलालू येथील भारतीय डीप स्पेस नेटवर्कशी थेट संवाद साधेल. चंद्रयान 1 आणि मंगळयान सारख्या अंतराळ मोहिमेदरम्यानही नेटवर्कचा वापर संपर्कासाठी करण्यात आला होता.


चंद्रयान 3 ची विशेष उपकरणे


इस्रोने लँडर मॉड्यूलमध्ये महत्त्वाचे पेलोड लावले आहेत. यापैकी एक म्हणजे रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अॅटमॉस्फियर. थोडक्यात सांगायचं तर रंभा. (RAMBHA). हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल. तिथल्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सची पातळी आणि काळानुसार त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून माहिती गोळा करेल.

लँडरमध्ये बसवलेलं हे महत्त्वाचं उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्मांचा अभ्यास करेल. लँडरमध्ये बसवलेलं आणखी एक प्रमुख उपकरण आहे, ज्याला आयएलएसए म्हणजेच इंस्ट्रुमेंट फॉर लूनार सिस्मिक एक्टिविटी असं म्हणतात. हे उपकरण चंद्रयान-3 च्या लँडिंग स्थळावर होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींची तपासणी करेल.भूकंप ओळखण्यासाठी सेस्मोग्राफरही लँडरवर बसवण्यात आला आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वसाहती करायच्या असतील, तर आधी तिथल्या भूकंपीय क्रियाकलापांचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे, हे उपकरण चंद्रयान-3 च्या लँडिंग साइटवरील भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करेल आणि चंद्राच्या कवच आणि आवरणाची तपासणी करेल.


यासोबतच एलआरए नावाचा आणखी एक पेलोड लँडरमध्ये बसवण्यात आला आहे. एलआरएला लेझर रेट्रोरेफ्लेक्टर अॅरे असं म्हणतात. हे उपकरण चंद्राच्या गतिशीलतेची तपासणी करते. या उपकरणांना चालवण्यासाठी वीज लागते. चंद्रयान-3 मध्ये बॅटरीसोबतच वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेल लावण्यात आलेत.
जर लँडर सूर्यप्रकाशाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने उतरला तरी कोणतीही अडचण येणार नाही कारण लँडरच्या तीन बाजूंना सोलर पॅनेल आहेत. चौथ्या बाजूने रोव्हर सुरक्षितपणे बाहेर येण्यासाठी रॅम्प बसवण्यात आला आहे.


रोव्हर


चंद्रावर लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर, रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि संशोधन करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.
चांद्रयान-3 च्या रोव्हरचं वजन फक्त 26 किलो आहे. त्याला सहा चाकं असून वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेलसह बॅटरीचाही समावेश आहे.
रोव्हर-91.7 सेमी लांब, 75 सेमी रुंद आणि 39.7 सेमी उंच असलेलं हे रोव्हर त्याच्या सहा चाकांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर फेरी मारेल. त्याच्या लहान आकारामुळे आणि इतर गोष्टींमुळे, रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो. याचा अर्थ की रोव्हरने जर लँडरला गोळा केलेली माहिती पाठवली तरच लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल.
रोव्हरमध्ये दोन प्रमुख उपकरणे आहेत.
त्यापैकी पहिलं आहे एलआयबीएस म्हणजेच लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप. हे मुख्य उपकरण आहे. एखाद्या ठिकाणचे घटक आणि त्यांचे गुणधर्म ओळखण्यासाठी वापरली जाणारी ही एक अत्याधुनिक पद्धत आहे.
हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर अतिशय तीव्र लेसर प्रकाश टाकेल.
त्यामुळे पृष्ठभागावरील माती वितळून प्रकाश उत्सर्जित होईल. त्याच्या तरंगलांबीचे विश्लेषण करून, एलआयबीएस पृष्ठभागावर असणाऱ्या रासायनिक घटकांची ओळख पटवेल.
रोव्हरवर बसवलेले हे एलआयबीएस उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह या घटकांचा शोध घेण्यात मदत करेल.
चंद्रावरील या मोहिमांमध्ये हे सर्वात महत्त्वाचं संशोधन आहे.
एलआयबीएस चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस घालवेल आणि विविध ठिकाणी विश्लेषित केलेली माहिती लँडरला पाठवेल. लँडर ही माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. या माहितीचे विश्लेषण करून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांची माहिती मिळवेल.
रोव्हरवर बसवलेलं दुसरं उपकरण आहे एपीएक्सएस म्हणजेच अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. हे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले रासायनिक संयुगे शोधून काढेल.
यामुळे चंद्राच्या भूपृष्ठाबद्दल आणि मातीबद्दलची आपली समज वाढेल. त्यामुळे भविष्यातील प्रयोगांना अधिक वेग मिळेल.


नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटीसारख्या रोव्हरमध्येही असंच उपकरण बसवण्यात आलं होतं.

२३/८/२३
माहिती स्रोत –
ISRO website
BBC News.

डॉ.माधवी किशोर ठाणेकर
सांगली

संकलन डॉ. लिंबाळकर