+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला



    20 मे तारीख 2025 मंगळवारी सकाळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर सर यांचे दुःखद निधन झाले ही बातमी कळाली आणि मन सुन्न झाले. सविस्तर माहिती घेतली असता असे समजले की नारळीकर सरांचे गेल्या आठवड्यात त्यांचे हिप ऑफ फ्रॅक्चर चे ऑपरेशन झाले होते. त्यांना घरी आणले होते.  ते त्यांचे आई वडील बसत त्या खुर्चीवर तीन तास बसले. आयझर मध्ये गाडीतून चक्कर मारून आले. काल दिवसभर आनंदात होते आणि सकाळी सर अनंतात विलीन झाले. 
    विज्ञान क्षेत्रातील एक अद्वितीय ध्रुवतारा निखळला. ज्यांना लहानपणापासून आपले हिरो मानत आलो, विज्ञान अथवा वैज्ञानिक म्हटलं की मराठी घरांमध्ये पहिलं नाव उच्चारलं जायचं, 'नारळीकर'.गणित व खगोलशास्त्रामध्ये ज्यांच्यामुळे आवड निर्माण झाली असे जयंत नारळीकर सर आता पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाहीत या विचाराने मन दु:खी झाले. पण म्हणतात ना 'जातस्य ध्रुवो ही मृत्यू' तथा जो जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच. आमच्या पिढीला डॉ जयंत नारळीकर यांचा सारखा शास्त्रज्ञ व त्यांचा सहवास लाभणे हे आमचे भाग्यच. जसा सचिन तेंडुलकर प्रत्येकाला आपल्या घरातला सदस्य वाटायचा तसेच नारळीकर सरही प्रत्येक विज्ञान प्रेमीला आपल्या घरातला सदस्यच वाटायचे. त्यामुळे प्रत्येक विज्ञान प्रेमीला नारळीकर सर आपल्यात नाहीत हे ऐकून फार दुःख झाले. यानंतर डॉ नारळीकर सरांच्या सहवासातील आठवणींनी मनामध्ये गर्दी केली होती. नारळीकर सरांचे संशोधन, परदेशातील शिक्षण, भारतात आगमन, TIFR मध्ये संशोधन सुरू असताना जेष्ठ शास्त्रज्ञ श्री यश पाल यांच्या आग्रहाखातर 'आयुका'ची स्थापना व व विस्तार, विज्ञान साहित्याची निर्मिती व अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये केलेली बहुमोल कामगिरी हे सर्व आठवले. त्यांची गणितातील आवड हे मात्र वाखाणण्याजोगी होती.  नारळीकर सरांचे शिक्षण संशोधन याबद्दल अनेक मान्यवर त्यांच्या लेखांमधून ही माहिती देतीलच पण मला उमजलेले नारळीकर सर मी या लेखात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
     आयुकामध्ये JVN या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले, आयुकाचे चैतन्य आणि श्वास असणारे असलेले नारळीकर सर यांच्या विज्ञान साहित्याबद्दल सांगायचे झाल्यास मी शाळेत असताना 'आकाशाशी जडले नाते, वामन परत न आला, प्रेषित या कादंबऱ्या वाचण्यात आल्या. प्रेषित व यक्षांची देणगी या कादंबऱ्यांनी तर प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि त्याचे गारुड आजतागायत कायम आहे.  विज्ञानातील संकल्पना विज्ञान कथांच्या माध्यमातून अतिशय सोप्या करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांना विज्ञानामध्ये गोडी निर्माण केली.  विशेषतः मराठी भाषेमध्ये सरांनी विपुल लिखाण केले.  आपण साहित्यिक नाही हे वारंवार सर सांगत आले मात्र त्यांची पुस्तक वाचल्यानंतर असे कळते की साहित्याबद्दलची त्यांची जाण किती मोठ्या उंचीची आहे. 

14 जानेवारी 2017 रोजी नारळीकर सर परभणीला आले असता त्यांची भेट घेण्याचा योग आला आणि त्यांचा प्रवासी प्रबंधक म्हणून त्यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण. या दिवसभरात नारळीकर सरांना अजून जवळून अनुभवता आले. त्यामध्ये तुमच्या स्वभावातील नम्रपणा, आपण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असताना देखील प्रत्येक व्यक्तीला बोलताना असणारी अदब, त्या व्यक्तीची व्यवस्थित विचारपूस सर करायचे. नारळीकर सरांना लहान मुले यांच्या बद्दल खूप कौतुक आणि कुतुहल होते. लहान मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी व तो मनात रुजवण्यासाठी सर सर्वतोपरी प्रयत्न करायचे. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी शाळे शिक्षण घेत असताना आपण आयुका येथे भेटलो होतो आता वीस वर्षानंतर आपण भेटतोय आणि मी गणित या विषयांमध्ये पदवी मिळवत आहे. हे एकूण सरांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सौ मंगला नारळीकर यांना म्हणाले की ‘’अगं हा तुझ्या विषयाचा आहे बरं का?” तेव्हा तितक्यात मिश्किल पद्धतीने मंगला मॅडमने देखील त्यांना उत्तर दिले की ‘’अरे हो का ! गणिताबद्दल तू काय बोलणार बरं?’’ हे ऐकून त्या ठिकाणी चांगला हशा पिकला होता. असे अनेक प्रसंग या दाम्पत्यांच्या जीवनात घडले असतील. सर्वजण सरांसोबत फोटो काढण्यासाठी धडपडत होते पण मात्र नारळीकर सर वैतागून गेले होते पण मी मात्र त्यांना इच्छा बोलून दाखवली की मला तुमच्या सोबत एक फोटो घ्यावयाचा आहे. तेव्हा त्यांनी म्हणाले की हो नक्कीच! माझ्या बाजूला बसा. पण मात्र मी त्यांच्या पायाशी बसून फोटो काढला आणि मनात म्हणालो ‘मम पामरासी काय थोरपण, पायीची वाहने पायीच बरी.’

होएल-नारळीकर स्टेडी स्टेट थेअरीचा सिद्धांत मांडतानाचा एक अनुभव नारळीकर सर सांगतात की आदल्या दिवशी फ्रेड होएल सरांनी त्यांना या सिद्धांतावर वैज्ञानिक मंडळी काय उलट प्रश्न विचारू शकतात याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यानुसार सादरीकरणाच्या आतल्या रात्री नारळीकर सरांनी या सर्व उलट प्रश्नांची शक्यता व त्यावरील उत्तरे यांचा अभ्यास केला व यशस्वीरित्या तो प्रबंध सादर केला. हा प्रसंग मी माझ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग मांडताना सांगितला तेव्हा विद्यार्थ्यांनी तसेच केले आणि त्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. यानंतर दिवसभरात सरांकडून हे असे आणि अनेक प्रसंग सर सांगत राहिले आणि त्यांचे मार्गदर्शन मिळत राहिले. संध्याकाळी सरांचा ‘अवकाशातील विचित्र वर्षाव’ या विषयावर मराठीमध्ये व्याख्यान झाले आणि या व्याख्यानासाठी तुडुंब गर्दी झालेली होती. नंतर सर पुण्याला परत निघत असताना मी भारताच्या मंगळयान मोहिमेवर एक छोटेसे इंग्रजी भाषेतून संकलित पुस्तक तयार केले होते ते सरांना दाखवले सरांनी बघितल्यानंतर आनंद व्यक्त केला पण मात्र हे जर मराठीमध्ये लिहाल तर अजून आपल्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असे सुचवले. अगदी असेच मला श्री मोहन आपटे यांच्याकडून देखील सुचवण्यात आले होते.

यानंतर मात्र मी पुढचे सर्व लिखाण ते वर्तमानपत्रातील असो किंवा एखाद्या वैज्ञानिक घटनेबद्दल असो ते मराठी मधून लिहू लागलो आणि यानंतरच सरांना भेटण्यासाठी आलेले परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, डॉक्टर पी आर पाटील आणि सुधीर सोनुनकर या तीन महारथींची भेट व त्यांच्याशी जुळलेला ऋणानुबंध की जो आजतागायत कायम आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील की ज्यामुळे सरांचे सरांकडून बरेच काही शिकता आले व मिळवता आले. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे विज्ञान वारी हा उपक्रम दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात येतो यात विद्यार्थ्यांना एका परीक्षेद्वारे निवडून आयुका पुणे येथे नेण्यात येते . यामध्ये नारळीकर सरांचा ‘Ask a Scientists’ कार्यक्रम असतो यामध्ये लहान मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरे सर शास्त्रीय पद्धतीने व तितक्यात मिश्किल पद्धतीने देतात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा वैज्ञानिक आपल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो हेच मुलांसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि परभणीतील विद्यार्थ्यांची जवळपास 80 टक्के प्रश्न त्यामध्ये घेतले जातात याबद्दल नारळीकर सरांनी नेहमीच कौतुक केले आहे व याची नोंद घेतली आहे.

दोन वर्षांपूर्वी सरांच्या पत्नी सौ मंगला मॅडम यांचे निधन झाले आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाला नारळीकर सरांना व्हीलचेअर वर पाहिले तेव्हा मात्र काळजात चर्रर झाले. हिरोला व्हीलचेअर वर बघून खूप वाईट वाटले आणि यावर्षी नारळीकर सर खूप आजारी असताना देखील गणित या विषयावर सरांनी ‘Ask a Scientists’ कार्यक्रमा ऐवजी गणित या विषयावर व्याख्यान दिले आणि वाटले की आता सरांनी एक नवीन इनिंग सुरू केली आहे. पर्यंत सरांची बुद्धी विलक्षण साथ देत होती. पण सर मात्र शरीराने खूप थकले आहेत असे दिसत होते. मी माझा मित्र जयेश चाचड आम्ही सरांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि तसेच घडले 20 मे मंगळवारी सकाळी नारळीकर सर आपल्यात नाहीत ही बातमी कळली आणि मन सुन्न झाले. पृथ्वीवरील एक अढळपदी विराजमान असलेला तेजस्वी तारा लुप्त झाला अशीच त्यांच्या बद्दल प्रत्येकाची भावना झाली. जरी नारळीकर सर आपल्यात नसले तरी देखील त्यांनी जो विज्ञानाचा त्यांच्या साहित्याचा जो ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे, जो मार्ग आखून दिला आहे त्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे पण मात्र आकाशाशी नाते जोडणाऱ्या या व्यक्तीच्या कार्याला एका लेखात कवेत घेणे कसे शक्य होईल बरे! जोपर्यंत सूर्य-चंद्र असतील तोपर्यंत या ‘आकाशाशी नातं जोडणाऱ्या’ या तेजस्वी ताऱ्याचे आढळपद प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनात कायम राहील.

प्रसाद वाघमारे
खगोलशास्त्र तथा गणित अभ्यासक
सहसचिव, परभणी कल सोसायटी, परभणी

परभणीकरांनी वाहिली खगोलशास्त्रज्ञ डॉ नारळीकरांना श्रद्धांजली

दिनांक २० मे २०२५, परभणी

पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आज दिनांक 20 मे 2025 रोजी , आकाशाशी जडलेले नाते ,असलेल्या प्रा डॉ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली परभणीकरांच्या वतीने अर्पण करण्यात आली.

जगातील ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांनी केलेल्या कार्य अगदी सोप्या भाषेमध्ये खगोलाचा अभ्यास, खगोलीय गोष्टी आहेत , त्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मांडण्याचा काम आदरणीय प्रा डॉ जयंत नारळीकर यांनी केलेला आहे

परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल , परभणी यांच्या वतीने विज्ञान चौक,परभणी या ठिकाणी डॉ नारळीकर यांना , त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री संजयजी ससाने (शिक्षणाधिकारी योजना) तसेच आदरणीय डॉ पी आर पाटील सर, सुभाष जाधव सर, ओमसेठ तलरेजा, नागेश वाईकर सर, प्रद्युम्न शिंदे डॉ रवी शिंदे, प्रा राम कराळे त्याचबरोबर प्रसाद वाघमारे तसेच सुधीर सोनूनकर व विज्ञानप्रेमी परभणीकर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.

त्यांच्या कार्याची ओळख ही चिरंतन आणि शाश्वत असून, त्यांच्या कार्याचा उपयोग, सर्व खगोल संशोधन करणाऱ्यां विद्यार्थ्यास , संशोधकास उपयोग होईल. प्रा डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला

शाश्वत विकासासाठी जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर गरजेचा

प्रकट मुलाखतीतून पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितला पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र

परभणी/ 9/4/2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री चैत्राम पवार यांची प्रकट मुलाखत व नागरी सत्कार सोहळा बुधवारी (दि.९) सायंकाळी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वनामकृवि परभणी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.जगदीश नाईक आणि डॉ.विजयकिरण नरवाडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्राम पवार यांच्या व्यक्तिमत्वासह त्यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण कांतराव झरीकर, प्रमुख वक्ते हरीश कुलकर्णी व स्वागताध्यक्ष संदीप देशमुख, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्कार मिळालेले चैत्राम पवार यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. धुळे जिल्हा- सार्की तालुक्यात बारीपाडा येथे त्यांनी जवळपास 400 हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण केलेले आहे. 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून 400 हेक्टर जंगलाचे संरक्षण केले. स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी जवळपास 5 हजारहून अधिक झाडे लावली असून आजूबाजूच्या 40 गावामध्येही ही वनसंवर्धनाची चळवळ सुरू आहे अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली.
श्री.पवार यांनी घेतलेले शिक्षण, आपल्या कामाची केलेली सुरुवात, जनप्रबोधन, संघटन आदीबाबत डॉ.नाईक यांनी प्रश्न विचारून त्यांना बोलते केले.
श्री.पवार यांनी केवळ कष्टाचे डोंगर फोडले नाहीत, तर बारीपाडा गावच्या आदिवासींच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणला. अज्ञान, दारिद्य्र आणि अनारोग्य या समस्यांना तोंड देतानाच पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबवण्याचे महत्वाचे काम ते 30 वर्षापासून करत आहेत.
बेसुमार वृक्षतोड थांबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रबोधन करताना भविष्याची चिंता आणि वर्तमानातील गरज यांची सांगड घालावी लागत होती. हळूहळू त्यांची मते ग्रामस्थांना पटू लागली; पण ती अंगवळणी पडण्यासाठी काही अवधी लागला. मुळात शाश्वत विकासासाठी ते झटत होते. त्यामुळे केवळ जंगल वाढविणे किंवा वृक्षतोड थांबविणे एवढ्यापुरता त्यांचा विषय नव्हताच. जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन या पाच बिंदूंवर त्यांनी काम केले आणि त्यासाठी डॉ.आनंद फाटक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रबोधन करूनही जंगलतोड होतच होतीआणि बारीपाडा शहाणा झाला तरी आसपासच्या गावांचं काय? त्यांच्या कुर्‍हाडी कोण थांबविणार? हा प्रश्न होता. त्यामुळे गावाने नियमावली बनवली आणि सर्वजण तिचे पालन करू लागले असे श्री.पवार यांनी सांगितले.
केवळ झाडांची कत्तल थांबवायची नव्हती, तर निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करून बारीपाड्याच्या अनंत समस्यांचे उत्तर मिळवायचे होते. त्यातूनच त्याची लोकसहभागातून जैवसाखळी शाश्वत स्वरूपात उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जुन्या वृक्षांचे संवर्धन आणि नव्या झाडांची लागवड करताना जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा कधीही विसर पडू दिला नाही, असेही ते म्हणाले.
केवळ पावसावर अवलंबून असणार्‍या आणि ठरावीकच पारंपरिक पिके घेणार्‍या बारीपाड्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले.
इंद्रायणीसारखी सुवासिक तांदळाची शेती केली तशी मोहाच्या फुलांपासून निरनिराळे पदार्थ बनवले. साबण, अगरबत्ती तयार झाली.
बचतगटातून वडिलांनी घेतलेली रक्कम मुदत संपली तरी ती परत केली नाही तेव्हा वसुलीसाठी श्री.पवार यांनी सर्व सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एका क्षणात निर्णय घेतला. जेवढी रक्कम थकीत आहे तेवढ्या किमतीची भांडी घरातून उचलून आणा आणि बचत गटात ठेवा.अशा त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध केले आणि या प्रसंगामुळे बारीपाड्याच्या गावकर्‍यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला.

कधीकाळी बेसुमार वृक्षतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा बारीपाडा आता सदाहरित डोंगरासाठी आणि वाहणार्‍या ओढ्यांसाठी ओळखला जातो. निसर्ग आणि माणूस यांच्या समन्वयातून ही संपदा निर्माण झाली आहे. या कामामध्ये पुढील पिढी जोडण्याचे कामही सुरू असून 44 गावांचा समूह करून लोकसहभागातून 11 हजार 200 हेक्टर वनक्षेत पुढे आणल्याचे पवार यांनी सांगितले. आमच्याकडे महिला, पुरुष असा कुठलाच भेद नाही. वनभाजी महोत्सव 100 टक्के महिलांचा असतो. त्याला 20 वर्षे झाली असून त्यांना पूर्वी बोलता येत नव्हते अशा महिला सर्व भाज्यांची माहिती पटापट देतात. वन धन केंद्राच्या माध्यमातून 3 गावात मोहाच्या झाडासारख्या शाश्वत संसाधनांचा वापर करून उद्योग निर्मितीचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गरजा कमी करून नैसर्गिक संसाधने वाचवीण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत असे सांगून वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. जैवसाखळी ऍग्रो फॉरेस्ट्रिसारखी कामे विविध विद्यापीठे, संशोधक आदींच्या मदतीने 10 वर्षे सातत्याने काम केले तरच निश्चित बदल झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वन संवर्धन कार्यात युवकांचा वाढता सहभाग हे आशादायी चित्र असून पर्यावरणाशिवाय आपण जगूच शकत नाही हे सर्वांना कळू लागले आहे

शब्दांकन—श्री बाळासाहेब काळे.

बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा


परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम : विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

परभणी/प्रतिनिधी

गोष्ट, नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम ‘गोष्टरंग’ च्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मोठी उपस्थिती लावली.
परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘गोष्टरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बालसाहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. पहिली ते चौथीसाठी ‘हाकांचा पूल’ तर पाचवी ते आठवीसाठी ‘पेरू’ ही गोष्ट नाट्यरूपाने सादर केली. यावेळी गोष्टरंग टीमचे फेलोज सचिन चिंचोलकर, सायली जोशी, गणेश वसावे, क्वेस्टचे सचिन वीर, सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.प्रताप पाटील, डॉ.जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड, डॉ.बाहुबली लिंबाळकर, अशोक लाड, बालाजी दामुके, बबन आव्हाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश वाईकर यांनी केले तर त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले.

बालकलावंतांचा सत्कार…

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकवणार्‍या बालकलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नृसिंह विद्यामंदिर पोखर्णीच्या कु. नम्रता वाघ, कु. पंकजा वाघ, कु. उत्कर्षा वाघ यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल आयोजित विज्ञानजत्रा 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनांक 9.2.2025

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या पहिल्या विज्ञान जत्रेला विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, शिक्षक, विविध स्तरातील नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शहरातील विविध शाळांचे जवळपास 72 प्रोजेक्ट यामध्ये सहभागी झालेले होते. यापैकी प्राथमिक गटात 40 प्रोजेक्ट व माध्यमिक गटात 32 प्रोजेक्ट मॉडेल्स मांडण्यात आलेले होते.

यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, टिशू कल्चर, हॉर्टिकल्चर, एन्व्हायरमेंटल सायन्स, एग्रीकल्चर, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रिसिटी, सोलार एनर्जी, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण इत्यादी प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या प्रयोगाचे सादरीकरण केले… या सर्व प्रयोगांना भेट देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दाद दिली. यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात झाले. यावेळी नांदेड विभागाचे विक्री व सेवाकरचे आयुक्त श्री निलेश शेवाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ राजेश क्षीरसागर, डॉ विश्वनाथ खंदारे,परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, अल्फाप्लास्टचे श्री अडकीने , राजेश्री ग्रुपचे श्री अरुण पाटील आदी उपस्थित होते.


विज्ञानजत्रेचा समारोप समारंभ दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. माननीय आमदार डॉ राहुल पाटील हे मुख्य अतिथी होते आणि स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबिणारे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार तसेच परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञानजत्रेत सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

या विज्ञान जत्रेबरोबरच विद्यार्थ्यांना तारांगण उपलब्ध करून देण्यात आले होते, तसेच ट्रॅंपोलीन , मिकी माऊस बाऊंसी हे आउटडोअर गेम्स, त्याचप्रमाणे पुस्तक प्रदर्शन, टी-शर्ट व टोपी व विज्ञान साहित्य प्रदर्शन व विक्री यांना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सहभागी विद्यार्थ्याचे विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रोजेक्ट मॉडेल्सचे परीक्षण करण्यासाठी खास हिंगोलीहून श्री नितीन मोरे, श्री नामदेव तांदळे व श्री बालाजी आसोले या परीक्षकांची विशेष उपस्थिती होती

विज्ञानजत्रा 2025 चा निकाल पुढीलप्रमाणे


प्राथमिक गट- प्रथम क्रमांक ओएसिस इंग्लिश स्कूल परभणी च्या लेबर हेल्थ डिवाइस, द्वितीय क्रमांक रामरावजी लोहट पब्लिक स्कूल यांच्या रेजूनेक्स व तृतीय क्रमांक सारंगस्वामी विद्यालय च्या वेहिकल आयडेंटिफिकेशन कोड

माध्यमिक गट –
प्रथम क्रमांक श्री रत्‍नाबाई चंद्रकांतराव सोनटक्के विद्यालय नवागड च्या स्मार्ट डिस्टिलेशन, द्वितीय क्रमांक केंद्रीय विद्यालय परभणीच्या बायो सीड गार्ड
तृतीय क्रमांक ओयासीस इंग्लिश स्कूलच्या व्हर्सेटाईल रोबोकार यांना मिळाले.

वसंतराव नाईक विद्यापीठाचे देखील काही प्रोजेक्ट मॉडेल्स यामध्ये मांडण्यात आलेले होते. यामध्ये विज्ञानजत्रेत कृषी क्षेत्राशी निगडित एकात्मिक शेती पद्धती, जल पुन:र्भरण, जमिनीतील ओलावा दर्शक यंत्रणा, शून्य उर्जेवर आधारित साठवणूक यंत्रणा, सौरउर्जेवर चालणारी शेती उपकरणे, यांत्रिकीकरणातून श्रम बचतीची साधने अशा विविध प्रयोगांची मांडणी केली होती.

कुलगुरू इंद्रामणी सर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्भूत असलेल्या स्कूल कनेक्ट (शाळेशी जोडा) या उद्देशाने प्रेरित होऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मुलांसाठी या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल मार्फत भविष्यातील शास्त्रज्ञांच्या निर्माण कार्यात सक्षमपणे सहभागी होईल.

आमदार राहुल पाटील म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या मार्फत भविष्यात अनेक वैज्ञानिक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ रणजीत चव्हाण, डॉ अनंत बडगुजर यांनी विज्ञान जत्रेच्या यशस्वीतेसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात विज्ञानजत्रा 2025, भव्य चे आयोजन

दिनांक 6.2.2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणी आयोजित तर आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे पहिल्या विज्ञानजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात विविध शाळांचे प्रोजेक्ट मॉडेल्स व प्रयोग यांची मांडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये अन्न, आरोग्य व स्वच्छता, वाहतूक व दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, संसाधन व्यवस्थापन, रोबोटिक्स व गणितीय मॉडेल या विविध विषयावर विद्यार्थी प्रोजेक्ट व प्रयोगाचे सादरीकरण करणार आहेत.

तसेच वनामकृवि विद्यापीठाचे देखील स्टॉल्स असणार आहेत. या विज्ञान जत्रेबरोबरच आनंदनगरी, तारांगण, लहान मुलांसाठी खेळ, ब्रह्मांड संकल्पना, दिवसाचे खगोल, ड्रोन तंत्रज्ञान, AI रोबोट, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन व विक्री, इत्यादींची विविध दालने असणार आहेत.

विज्ञान जत्रेचे आयोजन तारीख 8 फेब्रुवारी , शनिवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 , या वेळेत आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसर, प्रशासकीय बिल्डिंगच्या पाठीमागे परभणी येथे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानप्रेमी व परभणीतील शाळांनी जास्तीत जास्त संख्येने विज्ञान जत्रेला भेट द्यावी असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे करण्यात आली आहे.