वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते.
नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).
विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी प्रेमविवाह केला. वत्सलाताई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत.
वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. गोरगरिबांचा वकिल म्हणून ते वर्ऱ्हाडात ओळखले जायचे. सर्वसामान्यांशी जनसंपर्क वाढत गेला. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.
महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली.वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कार्यकेले•कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, अकोला (१९६९), परभणी (१९७२), राहुरी (१९६८),
• औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी)
•मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४
•महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७. बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती.
•राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), सन १९६८
•शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती (१९६५)
• नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), सन १९७१
• हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना, विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते.
नवी मुंबईची निर्मिती ही वसंंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी सामाजिक कार्य व शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वतःला पुर्णतः झोकून दिले.
महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या.
कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणून संबोधतात. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. महानायक वसंतराव नाईक हे एक केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा आहेत.
वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले.
विक्रम अंबालाल साराभाई भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात ऑगस्ट १२, १९१९ रोजी झाला. त्यांचे वडील उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले.
भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली.
डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. संपादन करा
३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे दुःखद निधन झाले.
जन्म.८ ऑगस्ट १९३४ औरंगाबाद येथे. महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करताना माधवराव चितळे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही.
नेपाळ, भूतान, बांग्लादेश व पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण मार्गाने केलेला पाणीवाटपाचा करार असो, भारताची पहिली राष्ट्रीय जलनीती साकारणं असो, किंवा राष्ट्रीय जलदिन साजरा करण्याची कल्पना राबवणं असो, प्रत्येक टप्प्यावर डॉ. माधवराव चितळे हे नाव, पाण्याशी जोडलेलं आहे.
डॉ. माधव चितळे यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हिलची पदवी प्राप्त केली. पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुढे नगरचा मुळा प्रकल्प, मुंबईचा भातसा प्रकल्प येथेही अभियंता म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची नियुक्ती चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली.
पुढे प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं. १० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी ‘सर्वोत्तम पर्विन फेलो’ हा सन्मान पटकावला.
त्यापुढील काळात दिल्लीत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ५ वर्षांच्या या दिल्लीतील नियुक्तीचा काळ संपत येत असतानाच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर १ जानेवारी १९९३ रोजी आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे सरकार्यवाह म्हणून माधव चितळे यांची नियुक्ती झाली.
जलसंधारण आणि जलसंपदेबाबत जनजागरण या क्षेत्रांमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९३ सालच्या स्टॉकहोम वॉटर प्राईझ या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलसंधारणाबरोबरच अन्यही अनेक क्षेत्रांत चितळे यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे.
औरंगाबाद येथे वाल्मीकि रामायणावर त्यांनी दिलेली ८८ प्रवचने पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेच्या प्रसारासाठीही ते काम करीत असतात.
दिलीप महालानेबिस यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३४ रोजी ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतातील किशोरगंज जिल्ह्यात झाला. तेथे इंटर्न म्हणून काम केल्यानंतर १९५८ मध्ये त्यांनी कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून बालरोगतज्ञ म्हणून पदवी प्राप्त केली.
यूकेमधील एनएचएसमुळे त्यांना यूकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांनी लंडन आणि एडिनबर्ग येथून पदव्या मिळवल्या. ते अतिसाराच्या आजारांवर उपचार करण्यासाठी ओरल रीहायड्रेशन थेरपीच्या वापरासाठी प्रख्यात होते.
दिलीप यांनी १९६६ मध्ये भारतातील कलकत्ता येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संशोधन अन्वेषक म्हणून ओरल रीहायड्रेशन थेरपीवर संशोधन करण्यास सुरुवात केली होती. बांगलादेशी स्वातंत्र्याच्या युद्धादरम्यान, त्यांनी जॉन्स हॉपकिन्स सेंटरच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले. पश्चिम बंगालमध्ये आश्रय मागणाऱ्या पूर्व बंगाल (आता बांगलादेश ) मधील निर्वासितांमध्ये १९७१ मध्ये कॉलरा सुरू झाला तेव्हा ओरल रीहायड्रेशन थेरपीची नाट्यमय जीवन-बचत प्रभावीता दाखवून दिली. यामुळे साधे, स्वस्त ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) ला मान्यता मिळाली. द लॅन्सेट या नियतकालिकाने त्यांच्या ह्या थेरपीला “२० व्या शतकातील सर्वात महत्वाचा वैद्यकीय शोध” म्हणून त्यांना गौरवण्यात आले.
त्यांनी १९७५ – १९७९ पासून डब्ल्यु एच ओ च्या कॉलरा कंट्रोल युनिटमध्ये अफगाणिस्तान, इजिप्त आणि येमेनमध्ये काम केले. १९८० च्या दशकात त्यांनी डब्ल्यु एच ओ साठी जिवाणूजन्य रोगांवर सल्लागार म्हणून काम केले. १९८० च्या मध्यात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस, ते डब्ल्यु एच ओ च्या अतिसार रोग नियंत्रण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी होते.
१९९० मध्ये त्यांची बांगलादेशातील इंटरनॅशनल सेंटर फॉर डायरियाल डिसीज रिसर्च येथे क्लिनिकल रिसर्च ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. पुढे जाऊन तेथील क्लिनिकल रिसर्चचे संचालक झाले. २००४ मध्ये, ते आणि डॉ. नॅथॅनियल पियर्स ओआरएस च्या सुधारित आवृत्तीवर काम करत होते जे सर्व प्रकारच्या अतिसारापासून निर्जलीकरण रोखण्यासाठी आणि कमी स्टूल आउटपुट सारखे अतिरिक्त फायदे प्रदान करण्यासाठी अधिक प्रभावी होईल.दिलीप यांचा विवाह जयंती महालनेबीस यांच्याशी झाला होता.
वयाच्या ८७ व्या वर्षी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी पश्चिम बंगाल, कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी ग्रासले होते.
जागतिक कीर्तीचे सर्पतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम जयकृष्ण देवरस यांचा जन्म मध्यप्रदेशातील बिलासपूर शहरात झाला. मध्यप्रदेशातच शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला झाले आणि तेथील विज्ञान महाविद्यालयामधून त्यांनी प्राणिशास्त्रात एमएस्सी ची पदवी प्राप्त केली.
त्यानंतर दोन वर्षे खेड्यापाड्यांत राहून भातावरील ‘गाद’ नावाच्या कीटकामुळे उद्भवणाऱ्या रोगांवर त्यांनी मौलिक संशोधन केले.
पुढे १९३८ साली ते हिंदू एज्युकेशन फंडाची शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला गेले. तेथे प्रथम एडिन्बरा व नंतर डरहॅम विद्यापीठाच्या किंग्ज महाविद्यालया मध्ये त्यांनी ‘आफ्रिकेतील काही उंदरांवरील कीटक’ आणि ‘प्लासी नदीच्या खोर्यात अॅलर्जी उत्पन्न करणारे केडीस फ्लाइज’ या दोन विषयांवर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली.
भारतात परतल्यावर अखिल भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली येथे माशी व डास यांच्यावर त्यांनी संशोधन केले. पुढे १९४२ साली त्यांनी टोळधाड नियंत्रण मंडळातर्फे राजस्थान, गुजरात व सिंध प्रांतांची पाहणी करून या कार्यासाठी विमानाचा प्रथमच उपयोग करून दाखविला.
पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते १९४३ साली रुजू झाले.
१९४७ साली डॉ.आघारकर यांच्याबरोबर त्यांनी व इतरांनी ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या स्वायत्त संशोधन संस्थेची स्थापना पुण्यातील विधी महाविद्यालयाच्या तळघरात केली. १९५१ साली पुण्याहून मुंबईला आल्यावर त्यांची परळ येथील हाफकिन संशोधन संस्थेत कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख व उपसंचालक म्हणून नेमणूक झाली. १९६९ साली सेवानिवृत्त होईपर्यंत तेथेच त्यांनी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुखपद भूषविले.
हाफकिनमध्ये कार्यरत असताना दूषित पाणी, आरेचे दूध, मुंबईतील आरोग्यनाशक किटकांची जंत्री, पिसवा, माश्या, डास इत्यादींवर त्यांनी संशोधन करून बारा विद्यार्थ्यांना एमएस्सी, पीएचडी करिता मार्गदर्शन केले. या काळात त्यांनी प्लेग रोगावर मूलगामी संशोधन केले. प्लेगचा फैलाव करणारे शहरातील उंदीर प्लेगच्या जंतूंना जुमानत नाहीत. त्यातून असे दिसून आले की, महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरांतील उंदरांच्या विशिष्ट जातींची आकडेवारी बदलली आहे, तर शेतमळ्यातील उंदीर आता घरात शिरले आहेत. या उंदरांवरील पिसवांचे तीन प्रकार आहेत. त्यांची रक्तशोषणाची क्रिया वेगवेगळी आहे. या क्रियेवरच प्लेगची लागण अवलंबून असते, आदी निष्कर्ष त्यांच्या संशोधनातून निघाले.
तसेच डीडीटी चा परिणाम भारतातील कीटकांवर होत नाही, हे पाहून त्यांनी देशातील कीटक नियंत्रण औषधांचे संशोधन व्हावे म्हणून चालना दिली. तसेच महाबळेश्वर, जम्मू, नीलगिरी, आसाम येथे पेरलेली पाथरेश्रम नावाची वनस्पती यावर उपयोगी पडू शकते, हे त्यांनी सिद्ध केले.
त्यांचे मौलिक संशोधन लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना प्लेगविषयक तज्ज्ञ समितीवर नेमले. यामुळे उंदीर व प्लेगवर एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून त्यांची देशात व परदेशात गणना झाली.
भारतात प्रतिवर्षी दोन लाख लोकांना सर्पदंश होतो व त्यात सुमारे वीस हजार लोक दगावतात, असा अंदाज त्या वेळी वर्तवण्यात आला होता. पण एवढी गंभीर समस्या असूनही या विषयावर कोठेच संशोधन होत नव्हते. देवरसांनी जंगल, डोंगर व माळरानांत प्रवास करून सर्पजीवनाचे अवलोकन केले, प्रयोग केले. त्यांनी असे शोधून काढले, की महाराष्ट्रात सापांच्या २७८ जाती असून त्यांतील नाग- फुरसे-मण्यार व घोणस एवढ्या चारच जाती विषारी आहेत. यासंबंधी सर्वसामान्य जनतेलाही माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी १९५४ साली हाफकिन संस्थेत सर्पालय स्थापन केले. भारतातील हे पहिले सर्पालय होय.
साप चावल्यानंतर सर्प किती विष देतो, सर्वच सर्प विषारी असतात काय आणि सर्पदंश इ. शीर्षकांखाली त्यांनी प्रबंध सादर केले. त्यांनी लिहिलेल्या निबंधांची संख्या शंभरवर भरते. त्यांनी पाच पुस्तके आणि मराठी, हिंदी व इंग्रजीतून अनेक लेख लिहिले. ‘भारतीय सर्प’ हा त्यांचा ग्रंथ अद्वितीय गणला गेला.
महर्षी दिनकर धोंडो कर्वे यांचा जन्म५जुलै १८९९ रोजी झाला. दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले.
ते बीएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्र विषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी.फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते.
फर्ग्युसन महाविद्यालय मध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले. त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियत कालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यांनी सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.
डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी – अॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा.इरावती कर्वे यांनी लिहिला होता.
१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला.
बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत. कार्य करत असताना ५ जुलै १९८०रोजी त्यांना देवाज्ञा झाली…