सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. धवन यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते.
त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले.
धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले. १९५१ साली त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी केली. कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ अशी ओळख असलेल डॉ. सतीश धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधनाची सुरवात केली.
त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली.
श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय. १९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणा-या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवनसरांना भेटले. रोज १ तासप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. सत्रान्ती आराखडा बनवण्याइतके डॉ. कलामांचे मन खंबीर झाले. १९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली.
डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले. १९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता.
धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत. १० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली.
यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली. त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला.
पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला. या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांनी कसे वागावे याचा आदर्श ‘धवनसर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली, डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले.
१९९० मध्ये हैद्राबादमध्ये ‘पक्ष्यांची उड्डाणे’ या विषयावर धवन सरांचे व्याख्यान झाले, त्यावेळी डॉ. कलामांनी त्यांची ओळख करून दिली. ३१ मे १९९२ रोजी, ‘लॉच व्हेइकल प्रोग्राम’वर धवनसरांनी चर्चा आयोजित केली होती. डॉ. कलामांनी इस्रे संचालकांसमोर आपले विचार मांडले. प्रा. धवन यांनी डॉ. कलामांच्या डीआरडीओमध्ये बदलीची घोषण करून सा-यांना धक्का दिला.
१९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय. १९९९ मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांना लाभला. राष्ट्रीय समस्या सा-यांना बरोबर घेऊन वैज्ञानिक मार्गाने सोडवण्याच्या धवनसरांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे डॉ. कलाम यांना त्या क्षणी वाटले. इस्त्रोचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रेचे’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वायपेयी यांनी केला.
भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांचा जन्म केरळातील राप्पल येथे झाला. त्यांचे शिक्षण मद्रास विद्यापीठ (डी. एस्सी.), बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेज (पीएच्. डी.) येथे झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन साहाय्यक (१९३५–३८) आणि भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर तेथेच त्यांनी १९४८–७२ या काळात भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. १९७३ मध्ये केरळ विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर त्यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.
त्यांचे प्रमुख संशोधन कार्य प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे), वर्णपटविज्ञान, स्फटिक भौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिक रीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. भौतिक-रासायनिक प्रश्नांत उपयुक्त असलेल्या या परिणामाला ‘कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे.
स्फटिक भौतिकीसंबंधी १९५१ पासून ते संशोधन करीत असून १९५८ साली ‘प्रोग्रेस इन क्रिस्टल फिजिक्स’ हा व्याप्ति प्रबंध त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांचे १६० हून अधिक संशोधन पर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (लंडन), अमेरिकन फिजिकल सोसायटी, इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो होते. १९४९ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे ते अध्यक्ष होते.
असिमा चॅटर्जी विज्ञानात डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचे डॉक्टरेट संशोधन वनस्पती उत्पादनांच्या रसायनशास्त्रावर आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्रावर केंद्रित होते.
1954 मध्ये तिची विज्ञान विभागात रीडर म्हणून नियुक्ती झाली.
भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी विज्ञान जगतात आपला झेंडा फडकावला आहे आणि आपल्या शोधांद्वारे पृथ्वीच्या विकासात योगदान दिले आहे. या क्षेत्रात नेहमीच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे, कारण भारतात 20 व्या शतकापर्यंत महिलांना घरातच कोंडून ठेवले जात होते, परंतु त्यानंतरही अनेक महिलांनी हे सामाजिक बंधने तोडून विज्ञानाच्या जगात वेगळे स्थान मिळवले. त्यापैकी एक डॉ. असिमा चॅटर्जी होत्या. एक यशस्वी ऑरगॅनिक केमिस्ट असण्यासोबतच, भारतातील डॉक्टरेट ऑफ सायन्सची पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील आहेत.
असिमा चॅटर्जी यांचा जन्म 23 सप्टेंबर 1917 रोजी बंगालमध्ये झाला. त्यांचे वडील इंद्र नारायण मुखर्जी हे डॉक्टर होते आणि आई कमला देवी. हे एक मध्यमवर्गीय कुटुंब होते, ज्यामध्ये त्यांना शिक्षण क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या वडिलांना वनस्पतिशास्त्रात खूप रस होता आणि चॅटर्जी यांना त्यांच्या आवडीचा वाटा होता.
त्यानंतर असिमाने स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर असिमा चॅटर्जी यांनी राजाबाजार सायन्स कॉलेज कॅम्पसमधून सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि 1944 मध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यांचे डॉक्टरेट संशोधन वनस्पती उत्पादनांच्या रसायनशास्त्रावर आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्रावर केंद्रित होते.
2006 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी तिने हे जग सोडले.
शिक्षणाचा दिवा घरोघरी लावणारे, थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक – 22 सप्टेंबर 1887. 9 मे 1959.
भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली. तेव्हापासून अनेक विद्वान व बहुजनसमाज आदराने आणि प्रेमाने त्यांना कर्मवीर म्हणू लागला. ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.
भाऊराव यांचा जन्म कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.
भाऊराव पाटील हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. त्यातच १९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता.
पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले.
गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.
भाऊराव हे बहुजनसमाजाच्या शैक्षणिक उद्धाराकडे वळले, त्याचे वास्तविक कारण सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य करून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. स्वतःच्या मातापित्यांची व समाजाचीही नाराजी त्यांनी ओढवून घेतली. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले. रयत शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने जनतेची झाली. वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली.
गांधींवधानंतरच्या उद्रेकात १९४७ साली संस्थेचे सरकारी अनुदान काही दिवस स्थगित करण्यात आले; पण कर्मवीर भाऊराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाणेदारपणाने लोकाश्रयावर संस्था पुढे चालविली व संवर्धित केली.
कर्मवीर भाऊराव हे विलक्षण जिद्दीचे व धडाडीचे कार्यकर्ते होते. धिप्पाड शरीर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि गरीब, पददलितांचा अंतर्यामी जिव्हाळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होत. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले व राजर्षी शाहू महाराज यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. सद्गुरू गाडगेबाबांचेही रयत शिक्षण संस्थेस अमोल साह्य लाभले.
भाऊराव यांनी भगीरथ प्रयत्नांनी खेड्यापाड्यांत ज्ञानगंगा नेऊन पोचविली. त्यांची रयत शिक्षण संस्था ही आशियातील एक मोठी व नावलौकिक प्राप्त झालेली संस्था असून तिच्या शाखा महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांत व कर्नाटक राज्यात विस्तारलेल्या आहेत. त्यांमध्ये ३१ पूर्व प्राथमिक, ४२ प्राथमिक, ४३८ माध्यमिक आणि ४२ महाविद्यालये आहेत. तसेच गरीब व होतकरू मलांसाठी ५१ आणि मुलींसाठी २९ अशी एकूण ८० वसतीगृहे आहेत (२०१९).
संदर्भ : Matthew, A. V., Karmaveer Bhaurao Patil, Satara, 1958.
आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिवस आहे.
त्याचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच. पण घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले, व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले. तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन BA केले. आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची ओढ लागली. गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात. या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली. येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली. एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता. पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.
त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला.
म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले. त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली. काही काळ ते दिवाणही होते. या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला. म्हैसुरचे पद सोडल्या नंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग, अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले. समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना आदरांजली. अभियंता दिना निमीत्त सर्व अभियंत्यांना अभिवादन व हार्दिक शुभेच्छा !
वर्गीस कुरियन यांचा जन्म केरळ राज्यातील कोझिकोड (कालिकत) शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तामिळनाडूतील जिल्हा इरोड गोबीचेट्टीपालयम गावात डायमंड जुबिली हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील सरकारी रूग्णालयात शल्यतज्ज्ञ होते.
कुरियन यांनी मद्रासच्या लॉयोला कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळविली. विद्यार्थी दशेत त्यांनी लॉयोला कॉलेजचे क्रिकेट, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि टेनिसमध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मद्रास (सध्याच्या चेन्नई) विश्वविद्यालयाची यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) पदवी मिळविली.
अल्प काळासाठी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीत (TISCO) नोकरी करून त्यांनी इंपिरियल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. सध्या ही संस्था बंगळूरूत असून आता या संस्थेचे नाव नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट – सदर्न रिजनल सेंटर आहे. डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी त्यांना मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश हवा होता. प्रवेशासाठी कुरियन यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. पण प्रवेशपूर्व अट म्हणून मेटॅलर्जीत अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीबरोबर डेअरी इंजिनीअरिंग हा दुय्यम विषय घेणे अनिवार्य होते. या अटींची पूर्तता करून मिशिगनमधून मास्टर्सची पदवी मिळवून ते भारतात परतले.
डेअरी इंजिनीअर म्हणून कुरियन १९४९ ला आणंदच्या गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरीत पाच वर्षांच्या कालावधीसाठी रुजू झाले. तेथे त्यांचा गांधी विचारांचा पगडा असलेले कार्यकर्ते त्रिभुवनदास पटेल यांच्याशी परिचय झाला.
त्रिभुवनदास यांना त्याकाळी लहान दूध उत्पादकांसाठी आणंद येथे सहकारी दूध संघटना स्थापन करायची होती. मध्यंतरीच्या काळात १९५२-५३ मध्ये कुरियन यांनी भारत सरकारच्या पुरस्काराने न्यूझीलंडमध्येही दुग्ध यांत्रिकी शिक्षण घेतले. तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील सहकारी दूध व्यवस्थेचाही अभ्यास केला. त्रिभुवनदास पटेल यांचा उपक्रम भावल्यामुळे सुरक्षित सरकारी नोकरी सोडून कुरियन यांनी खेडा जिल्ह्यातील चळवळीत उडी घेतली. कुरियन यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या सहकारी दूध व्यवस्थेच्या अभ्यासाचा खेडा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रॉड्युसर्स युनियन लिमिटेड (KDCMPUL) म्हणजेच अमूलची बांधणी करण्यासाठी उपयोग केला.
कुरियन यांनी १९५५ मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन जगातील पहिला म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्याचा प्रकल्प आणंदमध्ये केला. दुधातील पाण्याचे प्रमाण कमी करून अतिशय दाट (कन्डेस्ड) टिकाऊ दूध बनवण्याचे तंत्र कुरियन यांचे अमेरिकेत राहणारे अभियंता वर्गमित्र, एच. एम. दलाया यांनी विकसित केले होते. म्हशीच्या दुधाची भुकटी आणि दूध दाट टिकाऊ करणे या दोन्ही प्रकल्पांतही त्यांना एच. एम. दलाया यांची मदत झाली.
सहकारी दूध चळवळीचा देशभर विकास करण्याच्या हेतूने भारत सरकारने १९६५ मध्ये नॅशनल डेअरी विकास बोर्डाची स्थापना केली. या बोर्डावर कुरियन यांची संस्थापक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. ऑपरेशन फ्लड उर्फ धवल क्रांती नावाने प्रसिद्ध अशा या उपक्रमामुळे भारतातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढले. पूर्वी लहान प्रमाणात दूध उत्पादन करणाऱ्याना दूध थंड जागी साठविण्यास, मुंबईसारख्या मोठ्या, खात्रीच्या आणि वाढत्या पण दूरच्या बाजारात दूध वाहून नेण्यास मोठ्या दूध उत्पादकांच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागे. ते अर्थातच नाडणूक आणि नफेखोरी करत. त्यातून छोट्या दूध उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष होता.
गुजरात सहकारी दूध विक्री महासंघाचा अमूल प्रकल्प आकाराला आल्यावर अल्प दूध उत्पादकांना न्याय मिळू लागला. ‘अमूल’ हा शब्द त्यांच्या संस्थेने बऱ्याच विचारमंथनानंतर अमूल्य अशा अर्थी पण बोलायला, लिहायला सोपा म्हणून स्वीकारला होता. अमूलच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील दूध उत्पादन १९६० मध्ये दरवर्षी दोनशे लाख मेट्रिक टन होते. ते पन्नास वर्षात वाढून २०११ मध्ये सहा पट – म्हणजे बाराशे लाख मेट्रिक टन झाले. एके काळी दुधाचे दुर्भिक्ष्य असलेला भारत योग्य धोरण आणि काही दशकांचे प्रयत्न यामुळे दूध उत्पादनात अग्रेसर ठरला. कुरियन यांना भारतासारख्या देशातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढविण्याच्या कामगिरीबद्दल वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशनतर्फे १९८९ चे वर्ल्ड फूड प्राइझ देण्यात आले. या संस्थेला त्यांचा जनतेला पोषण पुरवताना उत्पादनवाढी इतकेच प्रभावी व्यवस्थापन आणि वितरणही महत्त्वाचे आहे, हा विचार आवडला.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अमूल डेअरी प्रकल्पाचे उद्घाटन झाले आणि खुद्द पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांचे कौतुक केले. त्यामुळे कुरियन यांना काम करण्यास आणखी हुरूप आला आणि त्यांनी अमूलच्या स्थापनेत आणि वाढीत मोलाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या प्रयत्नाने अमूलसारख्या संस्था ठिकठिकाणी उभ्या करून भारतात लाखो लहान दूध उत्पादकांच्या एकत्रित परिश्रमाने दूध उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविता आले. तसेच दुधाची त्वरित फायदेशीर विक्री होऊ लागली. शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचा फायदा झाला. या धवल क्रांतीमुळे अक्षरश: लाखो ग्रामीण, अर्ध-नागरी भागातील लोकांना विशेषतः महिलांना घरात वा घराजवळ रोजगार मिळाला. कुपोषण आणि गरीबी कमी होण्यास मदत झाली. भारत दूध उत्पादनात अग्रेसर होऊन अमूल – आणंद हा तीस लाख लहान दूध उत्पादकांचा समूह देशासाठी दुधाचा कटोरा ठरला. स्वस्त आणि शुद्ध दुधाच्या पुरवठ्यामुळे नेस्ले आणि पोलसनसारख्या आंतरराष्ट्रीय दूध उत्पादकांची मक्तेदारी संपली.
कुरियन यांनी, व्यावसायिक विशेषज्ञ निवडून अमूलसाठी व्यापारी चिन्ह तयार करवून घेतले. त्याचिन्हाची १९५७ साली अधिकृत नोंदणी केली. या चिन्हाद्वारे एक छोटी, मिश्कील, चुणचुणीत मुलगी १९६७ पासून अमूलची लाडकी प्रतिनिधी म्हणून ग्राहकांसमोर आणली. तिच्या तोंडचे ‘अटरली बटरली डेलिशियस’ ऐकत, वाचत ग्राहक अमूलचे लोणी देशभर खरेदी करू लागले.
१९७९ मध्ये कुरियन यांनी इन्स्टिटयूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद अशी संस्था सुरू करून सहकारी संस्था व्यावसायिक कुशलतेने चालविल्या जातील यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करून ठेवली. कुरियन यांच्या कर्तबगारीचा लाभ गुजरात बाहेरही अनेकांना झाला. कर्नाटकमधील नंदिनी, राजस्थान मधील सरस, बिहार येथील सुधा या व्यापारी नावांनी किफायतशीर किमतीला विकले जाणारे दूध ही कुरियन यांची किमया आहे. भारताचे शेजारी देश पाकिस्तान, चीन, श्रीलंका तसेच रशिया यांनाही कुरियन यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा त्यांच्या दूध पुरवठा योजना सुधारण्यात झाला.
कुरियन यांची योजकता केवळ दुधापुरतीच मर्यादित राहिली नाही. तेलबिया आणि खाद्य तेलाच्या बाबतीतही भारत स्वयंपूर्ण व्हावा अशी भारत सरकारची आकांक्षा होती. पूर्वानुभवामुळे कुरियन यांना हे केवळ तीन वर्षांत साध्य झाले. गुजरात मध्ये तेलीया राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही मोजक्या कुटुंबांकडे खाद्य तेलाच्या व्यापाराची सूत्रे होती. कुरियननी कठोरपणे त्यांची मक्तेदारी मोडून काढली. जुने, आजारी, वापरात नसलेले पण परवाना धारक तेल कारखाने ताब्यात घेऊन कार्यान्वित केले. थोड्याच काळात धारा या व्यापारी नावाने माफक किमतीला ग्राहकांना अधिक मागणी असलेले शेंगदाणा तेल मिळू लागले. तेल आयातीवर खर्च होणारे महागडे परकीय चलन वाचू लागले.
कुरियन यांना प्रदान करण्यात आलेले अन्य प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणजे रामन मॅगसेसे पुरस्कार, रामन मॅगसेसे ॲवार्ड फॉर कम्युनिटी लीडरशिप,पद्मश्री, पद्मभूषण, कृषिरत्न पुरस्कार इत्यादी. परंतु त्याना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे जनसामान्यांच्या लेखी ते भारताचे दुग्धपुरूष होते.
आपल्या आठवणी आणि विचार कुरियन यांनी तीन पुस्तकांत नोंदवून ठेवल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत, ‘आय टू हॅड ड्रीम’, ‘द मॅन हू मेड द एलिफंट डान्स’ आणि ‘ॲन अनफिनिश्ड ड्रीम.’
कुरियन यांचा गुजरातेतील नडियाद येथे अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला.