कृषि-संशोधक, क्रांतिकारक 7 नोव्हेंबर 1884 22 जानेवारी 1967
पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वर्धा येथे झाले व माध्यमिक शिक्षण नागपुरातील सिटी हायस्कूलमध्ये झाले. स्वातंत्र्यलढ्यासाठी व समाजसुधारणेसाठी त्यांनी बालसमाज, आर्य बांधव समाज, श्री समर्थ शिवाजी समाज व हनुमान आखाडा इ. सामाजिक उपक्रम सुरू केले.
विविध देशांना भेटी देणे, तेथील शेतीतील प्रश्न अभ्यासणे, प्रत्यक्ष शेतात काम करणे, विद्यापीठांतून शिक्षण घेणे, संशोधन करणे, प्रयोगशाळा उभारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतीत प्रयोग करणे, शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नवी पिके शोधणे, अधिक उत्पादन देणारी नवीन बी-बियाणे शोधणे व त्यांचा प्रसार करणे, आधुनिक शास्त्रीय ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे, अशा विविध स्तरांवर त्यांनी शेतीत आपले योगदान दिले.
अमेरिकेला जाऊन तेथून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावेे, या उद्देशाने खानखोजे यांनी पूर्वेकडे प्रयाण केले. जपानला त्यांचा शेती व्यवसायाशी जवळचा संबंध आला. जपानमधील आधुनिक शेतीची ओळख व्हावी; म्हणून त्यांनी शेतावर नोकरी केली. जपानी शेतकरी स्वतःचे मलमूत्र शेतात पसरवतात व शेतीला जैविक खत देतात, हे त्यांना अत्यंत स्तुत्य वाटले. त्यांना त्या खताची उपयुक्तता व श्रमप्रतिष्ठेचा असामान्य गौरव यामुळे नवीन दृष्टी मिळाली.
शेतीला जोडधंदाही पाहिजे, हे त्यांना पटले. जपानमधील वास्तव्यात साबण, आगपेट्या, टिनचे डबे आणि खेळाच्या वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान ते शिकले. जपानहून खानखोजे अमेरिकेत कॅलिफोर्नियाला गेले. पुढील शिक्षणासाठी पैसे जमवून बर्कले विद्यापीठातील कृषिशास्त्र विभागात प्रवेश घेतला. तेथील मुख्य पुस्तकालय, उत्तम प्रयोगशाळा, आधुनिक उपकरणे, निष्णात प्राध्यापक वर्ग, प्रात्यक्षिके यांचा खानखोजे यांच्यावर खोलवर परिणाम झाला.
खानखोजे यांनी फळबागांमध्ये नोकरी करून फळझाडांची लागवड, फळांची तोडणी, स्ट्रॉबेरी व हॉपची फुले वेचणे, फळांचे पॅकिंग यासंबंधीची शास्त्रशुद्ध माहिती मिळवली. नंतर ते मेरीज व्हिले या गावी ‘फळ संरक्षण आणि कॅनिंग’ कारखान्यात फळ परीक्षण व फळ डबाबंद करणे या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकले.
उन्हाळ्याच्या सुट्टीत नोकरीसाठी खानखोजे सिअॅटल या गावी गेले. तेथे रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. दुर्दैवाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत मंदी आली. त्यामुळे कॅनडा व अमेरिकेत परदेशी मजुरांवर बंदी आली. मेक्सिकोत सोन्या-चांदीच्या खाणींचा शोध लागला होता व त्यांना मजूर हवेे होते. तेथे परदेशी मजुरांवर बंदी नसल्यामुळे खानखोजे मेक्सिकोला गेले.
सुट्टी संपल्यावर खानखोजे यांनी ओरेगॉन कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. बर्कले येथे त्यांनी चार सेमेस्टर पूर्ण केल्या होत्या व संरक्षण अकादमीत एक वर्ष शिक्षण घेतले होते. त्यामुळे ओरेगॉन विद्यापीठातील एक वर्ष शिक्षण घेतल्यावर त्यांना बी.एस. (१९११) ही कृषिशास्त्र शाखेतील पदवी मिळाली. त्यांनी पुलमन येथील वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात एम.एस.साठी प्रवेश घेतला. त्यांना प्राध्यापक डॉ. थॅचर व प्रा. थाम यांनी विभागातच नोकरी दिली. आयडाहो, ओरेगॉन, उटाह, नेवाडा ही शेजारची राज्ये दुष्काळी होती. तेथे १०/१२ इंचच पाऊस पडे, पण पिके मात्र रसरशीत व हिरवीगार असत. हे पाहून कोरडवाहू शेतीत खानखोजे यांनी विशेष लक्ष घातले, कारण भारतातही परिस्थिती दुष्काळीच असे. नापीक जमीन सुपीक करणे, आधुनिक अवजारे, खतांचा योग्य उपयोग यांद्वारे कोरडवाहू शेतीही फायदेशीर ठरू शकते हे त्यांना पटले.
भारतीय शेती व अमेरिकेतील शेतीवर तौलनिक टिपणी ते अशी करतात की, ‘पाश्चात्त्यास शेतकीत सधन बनता येते व भारतीयास शेतकीत कर्जबाजारी बनता येते. त्यासाठी भूमी परीक्षण, पाणी वापर, मशागत याबाबत शेतकर्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.’
खानखोजे यांनी पीक, प्राणी, शेती, प्रकाश, उष्णता-हवा आणि वनस्पती, पीक आणि रोग यांविषयी संशोधन केले. प्रा. थॅचर, थॉम, होल्टन व थॉमस हे प्राध्यापक त्यांना मार्गदर्शन करत व प्रोत्साहन देत. त्यांनी शेतीप्रमाणेच पशुधनावरही संशोधन केले. अधिक दूध देणार्या गाई, गोवंश सुधार, पशुपालन इत्यादी विषयांतील त्यांचे प्रावीण्य पाहून अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशन या प्रसिद्ध संस्थेने त्यांना आजीव सभासदत्व दिले. प्राध्यापकांच्या सहकार्याने खानखोजे यांनी ‘अमेरिकन सोसायटी फॉर द अॅग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक ट्रेनिंग इन इंडिया’ ही संस्था स्थापिली. तसेच त्यांना अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रॉनॉमी या संस्थेचे सभासदत्वही मिळाले.
एम.एस.चे शिक्षण घेत असताना खानखोजे यांना प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन यांचे व्याख्यान ऐकायची व त्यांच्याशी शेतकी विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली व अलबामा येथील टस्कगी विद्यापीठाला भेट देण्याचे आमंत्रणही मिळाले.
वॉशिंग्टन येथे अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रॉनॉमीच्या वार्षिक संमेलनाला हजर राहण्याचे खानखोजे यांनी ठरवले. वाटेत त्यांनी टस्कगी विद्यापीठाला भेट दिली. हे विद्यापीठ स्वावलंबी, औद्योगिक आणि कृषिशास्त्रात अग्रणी म्हणून नावाजलेले होते. व्यावहारिक शिक्षणाचे धडे देणारी संस्था म्हणून ती प्रसिद्ध होती. ‘कमवा आणि शिका’ या योजनेमुळे कोणतेही उच्च शिक्षण गरिबातल्या गरिबालाही शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले.
खानखोजे यांनी टस्कगी विद्यापीठातील कृषि-संशोधक डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचीही भेट घेतली. त्यांच्या संशोधन कार्याचा विशेषतः बटाटे, रताळी यांसारख्या पदार्थांवरील प्रक्रियेतून औद्योगिक विकास या संकल्पनेचा खानखोजे यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. वॉशिंग्टन विद्यापीठातील संमेलनात खानखोजे यांनी ‘रोपट्यांसाठी पाण्याच्या गरजेवर प्रभाव टाकणारे घटक’ (१९१३) हा निबंंध वाचला. या निबंधाचा नवीन पाठ्यपुस्तकात समावेश केला.
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांविरुद्ध अनेक राष्ट्रे युद्धास उभी राहिली. भारतात ब्रिटिशांविरुद्ध उठाव करावा व स्वातंत्र्य मिळवावे, असा खानखोजे व त्यांच्या मित्रांनी विचार केला व त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. जर्मनी, तुर्कस्थान, रशिया, मध्य पूर्वेतील इराण, इराक, अफगाणिस्तान या देशांत खानखोजे गेले. तेथून गनिमी फौज घेऊन भारतात क्रांती घडवून आणण्याची त्यांची योजना होती. यानिमित्ताने स्पेन, कॉन्स्टॅन्टिनोपल, बर्लिन, बगदाद, बुशायर, सीराज, निरीज, केरमान, सिर्ईस्तान या भागांत खानखोजे यांनी सैन्यासह प्रवेश केला. तो भाग ताब्यात घेतला व १९१६ साली स्वतंत्र हिंदुस्थानची घोषणा केली. या भागात खानखोजे हे महंमद खान या नावाने फिरत होते.
पुढे खानखोजे यांनी इराणी पारपत्र मिळवले व हाजी आगाखान या नावाने हिंदुस्थानात प्रवेश मिळवला. त्यांनी नुकत्याच मंडालेहून सुटलेल्या टिळकांची भेट घेतली. नंतर ते मेक्सिकोला गेले. मेक्सिकोचे राष्ट्रीय कृषी विद्यापीठ चापिंगो या गावात नव्याने उभारले जात होते. तेथे त्यांना रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत नोकरी मिळाली. तेथे ते कृषीचे प्रयोग करत. राष्ट्राध्यक्ष ओब्रेगान हे विद्यापीठाला भेट देण्यास आले असता त्यांना खानखोजे यांचे प्रयोग दिसले. मक्यावरील त्यांच्या प्रयोगाला प्रथम पारितोषिक व विशेष पुरस्कारही मिळाला. त्याची परिणती म्हणून त्यांना विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली.
त्यांनी गव्हावरही प्रयोग करून गव्हाचे विविध वाण विकसित केले. त्यांनी पावसाळ्यात व उन्हाळ्यात येणारी गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, अशा अनेक जाती विकसित केल्या. १९२९च्या राष्ट्रीय प्रदर्शनात त्यांना एक हजार पेसोंचा प्रथम पुरस्कार मिळाला, तसेच सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मेक्सिकन सरकारने आधुनिक कृषिशास्त्र शिकवण्यासाठी कृषी शाळा स्थापन करायचे ठरवले. त्यासाठी संपूर्ण देशाचा अभ्यासदौरा करून शासनास योग्य त्या सूचना करण्यासाठी समिती नेमली. त्या समितीवर खानखोजे यांची नेमणूक केली. यानिमित्ताने खानखोजे यांना संपूर्ण मेक्सिको देशभर फिरून तेथील प्रश्न समजावून घेता आले व लोकांचे प्रबोधनही करता आले. अनेक ठिकाणी कृषी संघ स्थापन केले. पुढे राष्ट्रीय पातळीवर त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला. त्याच्या अध्यक्षपदी खानखोजे यांची नेमणूक करण्यात आली.
मका हे मेक्सिकोचे महत्त्वाचे पीक. त्यांनी मक्याचे उत्पादन व दर्जा यात क्रांतिकारक सुधारणा केल्या. टिओसिंटे या जंगली वनस्पतीबरोबर मक्याचा संकर करून त्यांनी एकाच ताटाला अनेक कणसे लागणारी नवीन जात शोधली. अशा मक्याच्या शेेतात उभ्या असलेल्या खानखोजेंची छायाचित्रे वर्तमानपत्रांतून ‘हिंदू जादूगार शेतीत चमत्कार करत आहे.’, या मथळ्यासह येऊ लागली. मेक्सिको सरकारने त्यांची शेतीविषयीची पुस्तके प्रसिद्ध केली. १९३० साली मेक्सिकन सरकारने त्यांना संशोधनातला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. Nuevas Variedades de maiz & Maiz Grenada Zea masy Digitata या खानखोजेंच्या दोन संशोधनपर लेखांनी शेतीत क्रांती घडवून आणली.
मक्याचे कणीस तोडल्यावर त्यावरील हिरवे पान पांढरे पडत असे. ग्राहकाला हिरवेगार कणीस अधिक आकर्षित करते. खानखोजेंनी नवी वेष्टन पद्धत शोधून काढली. त्यामुळे पान अनेक दिवस हिरवेगार राहू लागले व मेक्सिकोतून अमेरिकेला होणारी मक्याची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. खानखोजे यांनी अनुवंशशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी तूर, चवळी, सोयाबीन, वाल यावर संशोधन करून अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले. त्याचप्रमाणे त्यांनी बहुवर्षीय तुरीचे झाड शोधले. ते झाड वर्षातून दोन वेळा पीक देत असे.
त्यांनी शेवग्याच्याही नवीन जाती शोधून काढल्या. शेवग्याच्या बीपासून सुगंधी द्रव्य निर्माण केले. शेवग्याचा पाला, शेंगा, खोड, मुळी या प्रत्येकाचा उपयोग करता येतो, हे त्यांनी सिद्ध केले व त्याचा प्रचार केला. त्यांनी टोमॅटो, लिंबू व अन्य फळांवर पडणारा लाल खवल्यांचा रोग, तसेच पशुखाद्य व निवडुंग यावरील अभ्यास करून शेतकर्यांना उपयोगी पडतील अशा पुस्तिका तयार केल्या. मेक्सिकन सरकारनेही त्यांची उपयुक्तता जाणून पुस्तिका प्रकाशित केल्या व त्या सामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था केली.
खानखोजे आपल्या उत्पन्नातील काही भाग जमीन खरेदीवर खर्च करत. त्यातील काही जमीन ते गरिबांना देत व त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देत. त्यांच्या शेतावर प्रयोग करत. स्वतःच्या जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करून त्याचा किफायतशीरपणा पाहत व यशस्वी प्रयोग शेतकर्यांपर्यंत पोहोचवून त्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळवून देत. त्यांचे प्रयोग कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली आणि त्यातही ते आपले प्रयोग करत. त्यांच्या प्रयोगशीलतेला मेक्सिको सरकारनेही दाद दिली. त्यांनी खानखोजेंना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी दिली. त्यावर काम करणार्यांना, शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शेतीचे यांत्रिकीकरण करणे या गोष्टी त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास मंडळ युरोपच्या दौर्यावर गेले. फ्रान्स, स्पेन, हॉलंड, जर्मनी इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या.
मेक्सिकोत केळी, कॉफी, व्हॅनिला यांसारखी व्यापारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात. त्यांची अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यातही केली जाई, पण त्या निर्यात व्यापारातून होणारा फारच थोडा फायदा प्रत्यक्ष शेतकर्यांपर्यंत पोहोचे म्हणून व्हेराक्रूज राज्याचे गव्हर्नर तेखेदा यांच्या सहकार्याने खानखोजे यांनी प्रत्येक पिकाची वेगळी शाळा सुरू केली आणि त्याद्वारे शेतकर्यांना निर्यातीचेही शिक्षण दिले. त्यांच्या या कार्यामुळे गव्हर्नर तेखेदा खूश झाले व त्यांनी खानखोजे यांना त्या संस्थानचे प्रतिनिधी म्हणून मेक्सिको राजधानीत सल्लागार समितीवर पाठवले. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची व अधिकार्यांची त्यांच्याशी ओळख झाली.
सदर्न पॅसिफिक रेल्वे कंपनीने मेक्सिको व अमेरिकेला जोडणारी हजार मैल लांबीची रेल्वे बांधली, परंतु ज्या प्रदेशातून ही रेल्वे जात होती, तो भाग निर्जन होता. त्यामुळे रेल्वे तोट्यात चाले. रेल्वे कंपनीने हा भाग लागवडीखाली आणण्याचे ठरवले. या निर्जन प्रदेशाचे सुजलाम सुफलाम भूमीत रूपांतर करण्याचे अत्यंत अवघड काम रेल्वेने खानखोजेंना दिले आणि त्यांनीही ते समर्थपणे पेलले. त्या जमिनीवर खानखोजेंनी अनेक कृषी प्रयोग केले. अनेक स्टेशनांच्या व रुळांच्या भोवती त्यांनी कृषिपिके घेतली. शेतीचा प्रसार व प्रचार केला.
युद्धकाळात रबराला मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. मेक्सिकोत अनेक ठिकाणी रबराची लागवड केली जाई. खानखोजेंनी मेक्सिकोतील रबर-जंगलांना भेटी दिल्या व या झाडांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्याची पुस्तिकाही काढली व शेतकर्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर मागणीही आली. अमेरिकेतही रबर लागवडीविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी खानखोजेंची समक्ष भेट घेतली. मेक्सिको व ग्वाटेमाला येथे रबराची लागवड वाढवण्यासाठी खानखोजेंना आमंत्रण देण्यात आले. ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स, अमेरिका’ यांनी त्यांचा गौरव केला व डिक्शनरी ऑफ रीसर्च सायंटिस्ट ऑफ अमेरिका यात त्यांची नोंद झाली.
पूर्वी अमेरिकेत माकडांच्या ग्रंथीतून मानवाला उपयुक्त अशी हार्मोन्स मिळवली जात, पण पुढे माकडांचा असा उपयोग करण्यावर बंदी आली आणि अशा हार्मोन्सचा तुटवडा भासू लागला. याची जाणीव ठेवून खानखोजेंनी संशोधन केले व दक्षिण अमेरिकेतील वनस्पतींचा अभ्यास करून ‘मध्वालु’ या जंगली कंदांपासून आवश्यक ते हार्मोन्स मिळवले. त्यांनी अमेरिकन मित्राच्या साहाय्याने बोरानी मॅक्स कं. स्थापली. मेक्सिकोतील जंगली झाडांपासून प्रोजेस्टिरीन व टेस्टोस्टिरीन या औषधांचे उत्पादन सुरू केले.
मेक्सिकन सरकारने मसाल्याचे पदार्थ निर्माण करण्याच्या उद्देशाने खानखोजे यांना साडेचार हजार एकर जमीन दिली. खानखोजेंनीही त्याचा उपयोग कृषी प्रयोगशाळा (१९४४) उभारण्यासाठी केला. खानखोजेंनी आपल्या प्रयोगशीलतेच्या जोरावर अनेक प्रकारचे अन्नपदार्थही तयार केले व ते लोकप्रिय केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. खानखोजेंना भारतात परत येण्याची इच्छा झाली. १९४९मध्ये खानखोजेंना ही संधी मिळाली. मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री रा.कृ. पाटील यांनी मध्य प्रदेशात शेतीसुधारणा करण्यासंबंधात खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मेक्सिकन सरकारनेही त्यांना भारतात जाण्यास परवानगी दिली. ते नागपूरमध्ये पोहोेचल्यावर त्यांचे मोठ्या उत्साहाने सर्वत्र स्वागत झाले, परंतु इथले दारिद्य्र पाहून ते फार दुःखी झाले, कारण त्याच काळात इतर देशांत झालेली प्रगती त्यांनी अनुभवली होती.
त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे काम मुख्यत्वे पाच गोष्टींशी संबंधित होते ः १) शेतकी शिक्षण, २) कृषी संशोधन, ३) डेमॉन्स्ट्रेशन फार्म्स, ४) लोकशिक्षण, ५) यांत्रिकीकरण, सहकार शेती.
खानखोजे यांनी ग्रामीण भागात दौरा केला. त्यांनी प्रश्नपत्रिका तयार करून त्या लोकांकडून भरून घेतल्या. त्याआधारे आपला अहवाल दिला. विविध प्रकारच्या २९ सूचना दिल्या. शेेतीचे यांत्रिकीकरण, शेतकी शाळांची निर्मिती, प्राथमिक कृषिशास्त्राचे शिक्षण, मजुरांचे वेतन, पडीक जमिनी सरकारने ताब्यात घेणे व त्यावर सामूहिक शेतीचे प्रयोग करणे इत्यादी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सूचना त्यात होत्या. समितीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर भारताचे नागरिकत्व मिळण्यातही त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे ते मेक्सिकोला (१९५१-५५) परत गेले. तरी तेथे त्यांचे मन रमेना. आपली प्रयोगशाळा, ग्रंथसंग्रह, फर्निचर, शेतजमीन विकून त्यांनी प्रवासखर्चाची सोय केली व ते परत हिंदुस्थानात आले. सरकारने त्यांच्यासाठी फारसे काही केले नाही, पण लोकांनी त्यांच्यासाठी दहा हजार रुपयांचा फंड जमा करून सेनापती बापट यांच्या हस्ते एका सत्कार समारंभात त्यांना अर्पण केला. नागपूर विद्यापीठात त्यांना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून नोकरी मिळाली. संत्रा उत्पादकाच्या सहकारी संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.
खानखोजे ‘मुक्त-ग्राम’ या आपल्या संकल्पनेचा प्रचार करत. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हावे; अशी ती योजना होती. क्रमशः आधुनिक यंत्रे खेड्यात आणावीत व ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण करावे, अशी त्यांची संकल्पना होती. नागपूर आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. त्याद्वारे त्यांनी अनेक शेतीप्रश्न चर्चिले. शेतकर्यांचा पौष्टिक आहार, कुंपणासाठी झाडे, शेतीची सुधारलेली अवजारे, जमिनीची धूप व त्यापासून संरक्षण, जनावरांचे पौष्टिक अन्न, शेतकरी संघ, जंगली झाडांपासून नवी उत्पादने इत्यादींवर त्यांनी भाषणे दिली. टाकाऊ वनस्पतीच्या मुळ्या, खोडं वगैरेपासून खाद्यपदार्थ कसे करावेत हे ते सांगत व स्वतः करून खात. त्यांनी भारतीयांना सोयाबीनची ओळख करून दिली.
सन १९६१मध्ये खानखोजेंना भारतीय नागरिकत्व मिळाले. नागपूरमध्ये घरासाठी भूखंड मिळाला. त्यांना १९६३मध्ये स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता व निवृत्ती वेतन मिळू लागले. वार्धक्यामुळे जीवन जगणे कठीण होऊ लागले होते, पण ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या आयुष्यातील शेेवटच्या दिवशीही कृषी विभागाच्या रौप्य महोत्सवात ते सहभागी झाले होते.
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध चित्रकार ए. ए. आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.
चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणार्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागल
पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली. त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले.
आयुष्यभर हरणाची शिकार करणार्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला,ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले.
लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला दुसरा गुरू. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्षाची घरटी त्यानेच दाखविली. त्याच्याबरोबर रानातून चालताना रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे चुकवत चालावे लागे. त्या झाडाखालून चितमपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले.
अरण्यवाटेवर आणखी एकाने, हणमंतामामाने, चितमपल्लींना जंगलाचे न्यारे जग शिकवले पाखरांची नावे त्यानेच सांगितली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते. विषारी, बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चितमपल्लींना हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले.
हणमंतामामांनी चितमपल्लींना वन्यप्राण्यांच्या असंख्य लोककथा सागितल्या, आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. मामाची अंधश्रद्धाच चितमपल्लींना पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले. मारुती चितमपल्लींचे रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे चितमपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले.
पारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. या वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितमपल्ली यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले.
शिस्त काय असते हे त्यांना या महाविद्यालयाने शिकवले. पहाटे उठणे, ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही करणे सुरू झाले. वानिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा त्यांनी वनातला अभ्यास दौरा केला. जंगलात राहायचे म्हणजे तंबूत, महिनाभर लागणारे सारे सामान सोबत, असे सारे काही कुतूहलमिश्रित होते. प्रवेश घेताना १६ मैलांची अट जशी कायम होती, तशी मॅरेथॉन रेसमधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना १६ मैलांचे अंतर धावत धावत चार तासांत पूर्ण करावे लागे. वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आहात की नाही याची ती चाचणी होती. मात्र, पहिल्याच वर्षी मॅरेथान रेसमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकार्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पाडला. भविष्यात वनाधिकार्याला कशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते, याचे दाहक वास्तव मारुती चितमपल्लींनी विद्यार्थिदशेतच अनुभवले.
मारुती चितमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला. रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे.
पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्लींनी पक्षिशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे.जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे.चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत) ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी) चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले.
मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.
भारतातील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म सधन बंगाली कायस्थ कुटुंबात करपाडा (खुलना जिल्हा, बांगला देश) या खेड्यात झाला. वडील पूर्णचंद्र रॉय हे मुन्सफ होते. त्यामुळे शरदच्चंद्राचे प्राथमिक व सुरुवातीचे माध्यमिक शिक्षण बदलीच्या विविध ठिकाणी झाले. ते कॉलीडिएट हायस्कूल (कलकत्ता) मधून मॅट्रिक झाले आणि पुढे कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी बी. ए. एम्. ए. आणि बी. एल्. या पदव्या संपादन केल्या. या सुमारास त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा (रमेशचंद्र) आणि मुलगी (मीरा) झाली.
प्रारंभी ते मैमनसिंग येथील धल्ला विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून नोकरीस लागले. नंतर रांची येथे ते मिशन स्कूलचे मुख्याध्यापक झाले. १८९८ मध्ये त्यांनी अध्यापन व्यवसाय सोडून वकिलीस प्रारंभ केला आणि रांची ते स्थायिक झाले. अल्पकालातच त्यांचा जम बसला.
व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा आदिवासींच्या, विशेषतः मुंडा जमातीच्या चालीरीती, रूढी यांच्याशी संबंध आला. त्यामुळे त्यांचे लक्ष छोटा नागपूर येथील मुंडांच्या खडतर जीवनाकडे गेले. या लोकांना पाश्चात्य अभ्यास करीत असलेले पाहून त्यांच्यासाठी आपण काही उपाय शोधावा, असे त्यांना वाटू लागले. परिणामतः त्यांनी मुंडांची भाषा, चालीरीती, राहणीमान आणि रूढी यांच्या अभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी १९१२ ते १९३९ दरम्यान ओरिसा-बिहारमधील विविध आदिम जमातींचा अभ्यास करून विपुल लेखन केले. त्यांत शंभराहून अधिक शोधनिबंध असून सात अभ्यासपूर्ण ग्रंथ आहेत. त्यांनी मुंडांसंबंधी अभ्यास करून द मुंडाज अँड देअर कंट्री हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला.
यानंतर त्यांनी द ओराओंज ऑफ छोटा नागपूर द प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ फिजिकल अँन्थ्रपलॉजी, द बिऱ्होर्स, ओराओं रिलिजन अँड कस्टम्स , द हिल भुइयाज ऑफ ओरिसा, द खरियाज वगैरे ग्रंथ लिहिले. त्यामुळे मानवशास्त्रज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली. मानवशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी मॅन इन इंडिया हे त्रैमासिक सुरू केले. त्यांच्या विद्वत्तापूर्ण लेखनामुळे त्यांना ब्रिटिश शासनाने कैसर-इ-हिंद हे रौप्यपदक आणि रायबहादूर हा किताब दिला.
पाटणा विद्यापीठात त्यांना सलग तीन वर्षे प्रपाठक म्हणून काम करण्याची संधी लाभली. १९२० च्या भारतीय विज्ञान परिषदेत ते मानवशास्त्र विभागाचे अध्यक्ष होते. बिहार व ओरिसा कायदेमंडळावर सदस्य म्हणूनही ते निवडून आले. कलकत्ता विद्यापीठात त्यांच्या प्रयत्नांनी मानवशास्त्राच्या अभ्यासास प्रारंभ झाला.
राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी भारतीय आदिवासींच्या अभ्यासाद्वारे केले. रॉयनी मुंडा. भुईया. बिऱ्होर आदी जमातींचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे प्रथम दर्शन आपल्या ग्रंथाद्वारे घडविले. आदिमांच्या युवागृहांकडे लोकांचे लक्ष त्यांनी वेधले. मुंडा, बिऱ्होर, भुईया, ओराओं इ. जमातीतील गिटिओरा, धनगरबासा, धुमकुरिया वगैरे अनुक्रमे युवागृहांविषयी त्यांनी प्रथम माहिती उजेडात आणली आणि युवागृहे किंवा शयनगृहे ही केवळ मनोरंजनाची स्थळे नसून ती शिक्षण देणारी सामाजिक-सांस्कृतिक केंद्रे आहेत. पूर्व भारतातील ओराओं या जमातींत आजोबाने आपल्या नातीशी लग्न केल्याचे उदाहरण शरच्चंद्र रॉय यांनी सलगी संबंधाच्या संदर्भात निदर्शनास आणले.
त्यांनी मतदारांविषयी एक विस्तृत अहवाल सादर केला आणि त्यातून अल्पसंख्याकांच्या स्वतंत्र मतदारसंघास विरोध दर्शविला कारण भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना त्यामुळे लोप पावेल, असे त्यांचे मत होते.
त्यांनी राजकारणात सक्रिय भाग घेतला नाही परंतु सर्व जातिजमातींमध्ये सलोखा असावा, या मताचे ते होते आणि घटनात्मक शासनाचा त्यांनी पुरस्कार केला,
भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी भारतीय लोकांची वेगळी ओळख जगामध्ये दाखवून दिली. असे महान व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणजे जगाला मिळालेली एक बहुमोल देणगीच होय. कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगल्या कार्यासाठी खर्च केलेला दिसून येतो. म्हणूनच त्यांना आपण “मिसाईल मॅन” असे म्हणतो. तसेच आपले पाहिलेले स्वप्न पूर्णच करण्याची जिद्द ठेवणारे डॉक्टर अब्दुल कलाम तसेच त्यांचे विचार यापुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरित ठरतील. त्यांनी निर्माण केलेल्या मिसाईल मुळे देशाची सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत मिळालेली आहे. तसेच जगासमोर एक आपल्या देशाचा आदर्श निर्माण करून दिला आहे.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम असे आहे, तर आईचे नाव आशिमा जैनुलाब्दिन असून, वडिलांचे नाव जैनुलाब्दिन मारकयार आहे.
डॉ अब्दुल कलाम यांचे शिक्षण १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून, एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली आहे.
प्राथमिक शिक्षण रामेश्वरम् शाळेत झाले. पुढील शिक्षण रामनाथपुरम मधील चार्ट हायस्कूल मधून झाले . डॉक्टर अब्दुल कलाम यांचे नाव शिक्षक अयादुराई शलमोन होते. 1950 मध्ये इंटरमीडिएट शिक्षण घेण्यासाठी तिरुचिरापल्ली सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याठिकाणी भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास केल्यानंतर बी. एस. सी. साठी प्रवेश घेतला ते पूर्ण केल्यावर त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय न निवडता इंजीनियरिंग मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश घेतला.
त्याठिकाणी त्यांनी पहिले वर्ष पूर्ण करून, तसेच मतदानाविषयी अभ्यास पूर्ण करून एरोनॉटिकल इंजीनियरिंग ला आपला विशेष विषय म्हणून पदवी नंतर ते हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड बेंगलोर येथे रवाना झाले . तेथे त्यांनी विमानांच्या इंजिनचे देखभालीचे चे कार्य हाती घेतले. त्यांचा अभ्यास सुरू केला. पिस्टन वर टरबाइन इंजिन मशीन वर त्यांनी विशेष अभ्यास करून प्रत्यक्ष काम केल्यानंतर रेडियल इंजिन व ड्रम ऑपरेशन चे प्रशिक्षण घेतले.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य…
शिक्षण पूर्ण केल्यावर सर्वप्रथम डी आर डी ओ मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरू केले. तेथे त्यांनी एक छोट्या हेलिकॉप्टर चे डिझाईन तयार केले. नंतर इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च चे काही काळ सदस्यत्व स्वीकारून, 1962 मध्ये त्यांचे ISRO जवळचे संबंध आले. अग्नी व पृथ्वी सारख्या मिसाईल ची निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन हे काम त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्यांना 1992 ते 1999 मध्ये भारताचे रक्षा मंत्री म्हणून काम पाहावे लागले.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम भारताचे 11 वे राष्टपती.
18 जुलै 2002 रोजी डॉ. अब्दुल कलाम यांना भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. त्यांना 25 जुलै 2002 रोजी संसद भवन येथे राष्ट्रपती ची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाल 25 जुलै 2007 रोजी समाप्त झाला . त्यानंतर त्यांनी संशोधन, लेखन, अभ्यास करून सामाजिक सेवा यामध्ये सहभाग घेतला. भारतातील अनेक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित संस्थांना त्यांच्या कार्यातून त्यांना मार्गदर्शन करून अनेक ठिकाणी विज्ञान-तंत्रज्ञान यांचे शिक्षण त्यांनी दिले. भारतातील अनेक संस्थांना त्याच्या ज्ञानाचा फायदा झाला डॉ. अब्दुल कलाम हे एक विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व होते. मुलांना अनेक क्षेत्रात सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी ते जागरूक होते. हे सर्व कार्य करत असताना ते स्वतः शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत.त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असत.
डॉ.अब्दुल कलाम यांचे पुस्तके…
डॉ. अब्दुल कलाम हे फक्त शास्त्रज्ञच नव्हते , तर ते एक उत्तम लेखक सुद्धा होते . त्यांनी अनेक वेगवेगळे पुस्तक लिहिलेले आहेत त्यामध्ये काही पुस्तके खालीलप्रमाणे (खालील पुस्तके मराठीत अनुवादित आहेत.
अदम्य जिद्द
ईग्नाईटेड माइंड्स
इंडिया 2020
इंडिया माय ड्रिम
उन्नयन
विंग्ज ऑफ फायर
सायंटिस्ट टू प्रेसिडेन्ट
दिपस्तंभ
डॉ.अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार…
पद्मभूषण, भारतरत्न, इंदिरागांधी पुरस्कार, डॉक्टर ऑफ इंजीनियरिंग ,वीर सावरकर पुरस्कार ,डॉक्टर ऑफ सायन्स इत्यादी.
डॉ.अब्दुल कलाम यांचे विचार…
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करायला शिका.
स्वप्ने ते नाहीत जे आपण झोपेत पाहतो , स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.
कृत्रिम सुखा ऐवजी ठोस कामगिरीसाठी समर्पित व्हा.
जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहात नाहीत तोपर्यंत कोणीही तुमचा आदर करणार नाही, या जगात भीतीला स्थान नाही , केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आधार करत असते.
डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन… 27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी अब्दुल कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे राहण्यायोग्य ग्रह या विषयावर व्याख्याने देत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले, त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर दोन तासांनी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी रामेश्वरम् येथे पैतृक अंत्यसंस्कार करण्यात आले.सर्व जगासमोर एक आदर्श व्यक्ती त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य जगाला अविस्मरणीय राहील.
महाराष्ट्रातील शेतकरी वापरत असलेल्या लोखंडी नांगराचे जनक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म बेळगावातील गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे बालपण बेळगाव येथे गेले. सुरुवातीला त्यांनी बेळगाव येथे सायकल दुरुस्तीचे दुकान टाकले. त्याचबरोबरीने त्यांनी दुकानाच्या मागील बाजूस लहान शेडमध्ये कडबा कापणीचे यंत्र तयार करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे कोणत्याही एका कामाकडे लक्ष देता येत नाही, हे लक्षात आल्यामुळे लक्ष्मणरावांनी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय बंद करण्याचे ठरवले व १९०३मध्ये सायकलचे दुकान तीन हजार रुपयांना विकले व कडबा कापण्याच्या यंत्रासोबत दुसरे शेतीला आवश्यक असणारे यंत्र तयार करण्याचे ठरवले.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे सुमारे ८० टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात. तेव्हा त्यांना उपयुक्त व फायदेशीर ठरणारे यंत्र तयार केले तर आपल्या मालाला मागणी येईल, अशी त्यांना खात्री वाटली. त्या काळी पश्चिम भारतात, मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील शेतकरी वर्ग जमिनीच्या पूर्वमशागतीसाठी लाकडी नांगराचा उपयोग करत असत. या लाकडी नांगराने उथळ नांगरणी होत असे. लक्ष्मणरावांना त्या वेळेच्या पारंपरिक शेती नांगरणीतील समस्यांची पूर्ण जाणीव होती. अशा स्थितीत नांगरणीसाठी कोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, हे त्यांनी जाणले आणि लोखंडी नांगर बनवण्याची कल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा त्यांनी सुधारलेल्या परदेशी शेतीच्या आऊतांचे नमुने पाहिले.
जमिनीच्या मशागतीसंबंधी शक्य ती सर्व माहिती त्यांनी गोळा केली. त्या वेळी शेतकी खात्याने विलायती नांगर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेतकी खात्याचे वरिष्ठ अधिकारी मल्हार लिंगो कुलकर्णी यांच्या साहाय्याने किर्लोस्कर यांनी नमुन्याचा नांगर तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी एक विलायती नांगर आणला. या नांगराचे फाळ, पाठ, मधला भाग इ. बिडाचे होते व हाळीस व रूमणे लोखंडी पट्ट्याचे होते. हा नांगर तयार करायला लागणारी बिडाची भट्टी त्यांनी माळरानावर उभी केली. लोंढ्याहून मोल्डिंग सॅड व फायर क्ले मागवली. चार पोती कोक गोळा केला व साचे घालून ओतकामाला सुरुवात केली, परंतु या कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यात त्यांना अपयश आले. परंतु तेव्हा त्यांनी हार न मानता अनेक युक्त्या लढवून आपल्याला हवे तसे नांगराचे भाग यशस्वीपणे तयार केले. त्या वेळेस किर्लोस्करांनी आपल्या छोटेखानी कारखान्यात सहा नांगर तयार केले, परंतु त्यातील एकही नांगर विकला गेला नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेपोटी हा नांगर अनेक दिवस कारखान्यात पडून राहिला. पुढे मिरजमधील जोशी नावाच्या सुशिक्षित शेतकऱ्याला नांगराचे महत्त्व पटून ते सहाही नांगर विकत घेतले. त्यानंतर पलूस येथील पांडू पाटील यांनी किर्लोस्करांकडे ३५ नांगरांची मागणी केली.
कालांतराने किर्लोस्करांच्या लक्षात आले की, काळ्या जमिनीत वापरण्यासाठीचा नांगर अधिक वजनदार हवा. त्यामुळे नांगरांचे काही भाग अधिक जड करून व हाळीस पट्ट्यांची लांबी वाढवून त्यात आवश्यक त्या सुधारणा त्यांनी केल्या. हा सुधारित नांगर त्यांनी शिफारशीसाठी शेतकी खात्याकडे पाठवला. युरोपीयन अधिकाऱ्यांनी नांगरात दोष असल्याचे सांगून विलायती नांगरांचीच शिफारस केली. त्यामुळे चिडलेल्या किर्लोस्करांनी आपल्या नांगरातील दोषांची शहानिशा करण्यासाठी व निरनिराळ्या विलायती कंपन्यांचे फाळ मागवले व त्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांनी विलायती फाळ तयार करण्यास कोणती पद्धत वापरतात याचा शोध लावला. ती पद्धत अवलंबल्यावर किर्लोस्करांचे फाळ विलायती फाळांसारखे होऊ लागले, परंतु तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी त्यात अनेकानेक प्रयोग करून फाळ अधिक उपयुक्त केला. १९१०मध्ये किर्लोस्करवाडी येथे आधुनिक पद्धतीचा पहिला लोखंडी नांगर तयार झाला. हाच नांगर महाराष्ट्राच्या शेतीसाठी क्रांतिकारक बदल करणारा ठरला.
नंतर हळूहळू शेतकऱ्यांना लोखंडी नांगराची उपयुक्तता पटली व त्यांनी नांगर खरेदी करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच किर्लोस्करवाडी येथील कारखान्यातून दिवसाला २००-२५० नांगर बाहेर पडू लागले. त्यावेळेस महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मोठ्या शेतकऱ्यांकडे लोखंडी नांगर होते. हे एक प्रकारे किर्लोस्कर यांच्या संशोधनाला मिळालेले यशच म्हणता येईल. शेती क्षेत्रात लागणाऱ्या अवजारांत घडलेली ही एक क्रांतीच होय.
किर्लोस्करांनी पुढे कडबा कुट्टी यंत्र, शेंगा फोडणी यंत्र, उसाचे गुर्हाळ आणि पाण्याच्या पंपाचे उत्पादनसुद्धा सुरू केले. महाराष्ट्राच्या शेतीला लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक-लोखंडी नांगर व दोन-पाण्याचा पंप, किर्लोस्करांनी दिला. लक्ष्मणरावांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या नावाचे टपाल तिकीट काढले.
त्यांचे सुपुत्र शंतनु किर्लोस्कर यांनी कारखानदारीत जगात नाव उज्ज्वल केले आहे.
संकलन - डॉक्टर बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट
रसायनशास्त्राचे नामवंत शिक्षक आणि संशोधक पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन.सी.एल.) १९६६ ते १९७८ या कालखंडातील संचालक – बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा या गावी 26 सप्टेंबर 1918 रोजी झाला.
त्यांचे वडील दत्तात्रय टिळक हे जळगावमधील खानदेश मिल्समध्ये एक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक जाणकार तंत्रज्ञ म्हणून ते परिचित होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे १९३३ साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून १९३७ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीमध्ये, प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केली.
त्या काळामध्ये वस्त्रोद्योगासाठी आवश्यक असणारे विविध रंग आणि अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये नित्य लागणारी रसायने आपल्या देशात तयार होऊ लागलेली होती. तथापि दर्जेदार प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळत नसत. हे लक्षात घेऊन टिळक यांनी मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. १९३९ साली बी.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठ-डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.यू.डी.सी.टी.) मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करायचे ठरवले. तेथे प्रा. के. व्यंकटरामन हे अत्यंत नावाजलेले प्रोफेसर औद्योगिक रसायनशास्त्रातील दर्जेदार संशोधन करीत असत. त्यांचे मार्गदर्शन टिळकांना मिळाले.
१९४३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. सेंद्रिय रसायनशास्त्रामध्येच अजूनही सखोल संशोधन करण्याची टिळकांची इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले. प्रयोगशाळेत विविध संरचना असलेल्या सेंद्रिय रसायनांची जडणघडण करण्यात प्रा. रॉबिन्सन यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते. त्यांना आधुनिक सेंद्रिय रसायनशास्त्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये १९४४ ते १९४६ या कालावधीत संशोधन केल्यानंतर डॉ.टिळक यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४६ साली टिळकांना डी.फिल. ही पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केले.
इंग्लंडमध्ये संशोधन केल्यावर डॉ. टिळक मुंबईच्या ‘बी.यू.डी.सी.टी.’मध्ये अध्यापन आणि संशोधन करू लागले. स्टिरॉइडवर्गीय रंगाच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली. हेटेरोसायक्लिक (विषमचक्रीय) संयुगांचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. त्यांचे मूलभूत गुणधर्म तपासले आणि सखोल संशोधनही केले. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेन्ड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ या शीर्षकाचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी, त्यांचे सहकारी संशोधक डॉ.आर.बी. मित्रा यांच्याबरोबर लिहिले. गंधकाशी संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला ‘टिळक प्रक्रिया’ (टिळक रिअॅक्शन) असे नाव आहे. कृषी उद्योगामध्ये कीटकनाशकांचे महत्त्व उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने गरजेचे असते. हे लक्षात घेऊन डॉ. टिळकांनी कीटकनाशकांसंबंधी संशोधन सुरू केले.
१९६० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांना प्रा. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर सेंद्रिय रसायनशास्त्रातील क्लिष्ट संरचना असलेल्या संयुगांचे संशोधन करण्याची संधी मिळाली.
१९६०-१९६१ साली त्यांनी प्रा. वुडवर्ड यांच्या प्रयोगशाळेत हेटेरोसायक्लिक कार्बन संयुगांवर संशोधन केले होते. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट वुडवर्ड हे दोघेही रसायनशास्त्रातील नोबेल मानकरी होते. प्रा. रॉबिन्सन यांनी जीवशास्त्रामध्ये विशेष क्रियाशील असणाऱ्या अल्कोलॉइडवर्गीय रसायनांचे संशोधन केले होते, म्हणून त्यांना १९४७ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रा. वुडवर्ड यांनी प्रयोगशाळेत अनेक सेंद्रिय रसायने घडवलेली होती. त्याबद्दल त्यांना १९६५ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता.
डॉ. टिळकांना या दोन्ही निष्णात संशोधकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा अनुभव समृद्ध होत गेला. साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ तर झालाच, पण औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञांना रसायननिर्मिती करताना डॉ. टिळकांच्या मार्गदर्शनाची मदत झाली. रसायन उद्योगक्षेत्रातील अनेक उद्योजक, तंत्रज्ञ त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी येऊ लागले. देशातील आणि परदेशातील अनेक संस्थांमध्ये जाऊन त्यांनी रसायननिर्मितीशी संबंधित अनेक व्याख्याने दिली. वैज्ञानिक संशोधन आणि विकास या संदर्भात अनेक आंतरदेशीय करार होत असतात. त्यासाठी परदेशात जाणाऱ्या पथकांचे त्यांनी अनेकदा नेतृत्व केले होते.
मुंबईच्या बी.यू.डी.सी.टी.मध्ये ‘प्रोफेसर ऑफ डायस्टफ टेक्नॉलॉजी’ या पदावर १९५० ते १९६५ सालापर्यंत डॉ. टिळकांनी अध्यापन आणि संशोधन केले. १९६५ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये संचालकपदाचा स्वीकार केला. त्या काळात रसायननिर्मितीसाठी बहुतांशी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागत असे. ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे’च्या (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) आत्मनिर्भरतेच्या धोरणानुसार डॉ. टिळकांनी प्रयोगशाळेच्या वाटचालीचा आराखडा बनवला.
भारताकडे आवश्यक ती कच्ची रसायने आहेत व आणि आपल्या संशोधक आणि तंत्रज्ञांकडे पुरेशी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रंगोद्योग, जंतुनाशके, कीडनाशके, कृषिक्षेत्रात नित्य लागणारी रसायने यांसंबंधीचे संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नेमून दिलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रासंगिक अडचणी दूर करण्यासाठी ते संशोधकांसह नियमितपणे बैठका घेत असत. छोट्या आणि मोठ्या उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी आणि रसायननिर्मिती करतानादेखील त्यांची दूरदृष्टी, अनुभव, बुद्धिमत्ता, तसेच कौशल्यदेखील उपयुक्त ठरले. उपयोजित संशोधन करीत असताना, रसायनशास्त्रातील मूलभूत संशोधनाकडे डॉ. टिळकांनी विशेष लक्ष दिले होते.
दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आणि ३५ जणांनी एम.टेक. किंवा एम.फिल.साठीचे प्रबंध लिहिले. त्यांचे अनेक विद्यार्थी रसायनशास्त्रामध्ये लक्षणीय संशोधन करू शकले. विशेषत: औद्योगिक रसायनशास्त्रामधील अनेक विद्यार्थी स्वत:चा उद्योग उभारू शकले.
डॉ. टिळक यांचा अनुभव आणि व्यासंग लक्षात घेऊन त्यांची ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स’ या रसायननिर्मितीशी संबंधित असलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी १९६९-१९७६ सालाच्या दरम्यान नेमणूक झाली. तसेच ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’, ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’, ‘इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ अशा कंपन्यांचे एक संचालक म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली.
महाराष्ट्र सरकारने डॉ. टिळक यांना ‘विज्ञान-तंत्रज्ञान विभागा’चे मानद सल्लागार म्हणून १९८१ साली आमंत्रित केले. भारत सरकारच्या ‘नॅशनल टॅलन्ट अँड टेक्नॉलॉजी’च्या संचालकपदी डॉ. टिळकांनी काही काळ कार्य केलेले होते. भारताने रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावे म्हणून डॉ. टिळकांनी विशेष परिश्रम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९६६ साली स्वीकारले, तेव्हा प्रयोगशाळेच्या संशोधनावर आधारित असलेल्या रसायनांचे औद्योगिक उत्पन्न सुमारे पंधरा लाख रुपये होते. १९७८ साली डॉ. टिळक सेवानिवृत्त झाले, त्या वर्षी तो आकडा ८१ कोटी रुपये एवढा वाढला होता. प्रयोगशाळेतील संशोधन केवळ प्रयोगशाळेतच राहता कामा नये, त्याचा औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग व्हावा, असे त्यांना वाटत असे. नित्य आयात केल्या जाणाऱ्या रसायनांचे भारतामध्येच उत्पादन व्हावे, म्हणून त्यांनी आयात-पर्यायी रसायनांचे संशोधन हाती घेतले होते. त्या काळामध्ये भारतात परकीय चलनाची खूप कमतरता होती. त्याची बचत होण्याकडे त्याचा उपयोग झाला.
सेवानिवृत्तीनंतरही डॉ. टिळक सतत कार्यमग्न राहिले. त्यांनी ग्रामोद्धाराचे कार्य हाती घेतले. भारतीय पारंपरिक ज्ञान, अनुभव यांचा उपयोग कसा करता येईल, यासंबंधी विचार केला.
जैवविविधतेचे संरक्षण, महिलांचे सबलीकरण, पशुपालन, आहार, आरोग्य, स्वच्छता, ग्रमोद्योग आदी विषयांशी संबंधित अनेक योजना किंवा प्रकल्प त्यांनी सुरू केले. खेड्यांमधील भारतीय नागरिकांची आर्थिक उन्नती त्यामुळे होऊ शकेल हे डॉ. टिळकांनी ओळखले. ऊती संवर्धन तंत्र वापरून दुर्मीळ वृक्षांची लागवड आणि वनौषधींचे आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी कर्करोगरोधक वनस्पतींचाही अभ्यास केला.
ग्रमोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘सेंटर फॉर अॅप्लिकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (सी.ए.एस.टी.एफ.ओ.आर.डी.-कॅस्टफोर्ड) ही संस्था स्थापन केली. त्यामुळे अनेक छोटेमोठे प्रकल्प त्यांना पार पाडता आले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या संस्थेतर्फे ‘फोरम ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ (एफ.ओ.एस.टी.इ.आर.ई.डी.-फॉस्टेरॅड) हा कक्ष त्यांनी सुरू केला. कृषी मालाची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने काही यशस्वी प्रयत्न त्यांना त्यामुळे करता आले. विशिष्ट रसायनांचा सूक्ष्म तवंग जर एखाद्या छोट्यामोठ्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पसरवता आला, तर पाण्याचे बाष्पीभवन काही प्रमाणात थोपवता येते. बरेचसे पाणी जमिनीत जिरते. हे लक्षात घेऊन, याचे संशोधनही डॉ. टिळकांनी दीर्घकाळ केले.
डॉ. टिळकांच्या कार्याला राजमान्यता आणि जनमान्यताही वेळोवेळी मिळत गेली. भारतातील वैज्ञानिकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेतर्फे देण्यात येणारा सन्मान डॉ. टिळकांना १९६३ साली मिळाला. भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे, आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे ते मानद सदस्य झाले. के.जी. नाईक सुवर्णपदक (१९५९), बॅनर्जी सुवर्णपदक (१९६०) या सन्मानाचेदेखील ते मानकरी झाले. डॉ. टिळक औद्योगिक रसायनशास्त्राचे मान्यवर संशोधक होते. प्रयोगशाळेतील ज्ञान-विज्ञान आणि अनुभव यांद्वारे ग्रमीण विकास साधण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले.