भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकाचे कार्य बहुमोलाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा बारकाव्यासह अभ्यास केला तर असे लक्षात येते की,भारताचे स्वातंत्र्य हे विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यावर लढल्या गेलेल्या अविरत प्रयत्नांची फलश्रूती आहे. भारताचे शैक्षणिक क्षेत्र लुळे पांगळे करण्याचा इंग्रजांचा मनसुबा आपल्या देशातील पुरुषोत्त्वास खऱ्या अर्थाने गुलाम बनविण्यास कारणीभूत ठरला आणि म्हणूनच गलितगात्र झालेल्या भारतीय मानसिकतेस उद्दीपित करण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षक तज्ञांचे, विपरीत परिस्थितीत लढणाऱ्या संशोधकांचे स्थान स्वातंत्र्याच्या लढ्यात वेगळ्या रूपाने उठून दिसते. परकीय सत्तेच्या अमलाखाली राहून संशोधनासाठी अपुरी सामग्री असताना अनेक अच्युत प्रतिभेच्या व्यक्तीमत्त्वांनी भारतीय विज्ञानाची झळाळती पताका जगभर पसरली. बुद्धिमान राष्ट्राच्या समूहात इंग्रजांच्या गुलामीत असणाऱ्या भारताने नाव अधोरेखांकित करण्याचे महान कार्य या भारतीयांनी केले. चला तर मग स्वतःच्या संशोधनाने भारताचे नाव जगभरात करणाऱ्या या शास्त्रज्ञाची आज आपण ओळख करून घेऊया…. “आधुनिक युगातील वशिष्ठ” आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय
आचार्य प्रपुल्लचंद्र रॉय यांचा जन्म राउली काठीपाडा पश्चिम बंगाल या गावी 2 ऑगस्ट 1861साली झाला. हरिश्चंद्र रॉय हे त्यांचे वडील ते साहित्याचे गाढे अभ्यासक होते. प्रफुल्लचंद्र रॉय यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांनी उभारलेल्या प्रायमरी शाळेत झाले. “अज्ञानी असणे हा शापच आहे “ध्येयाला ज्ञानाचे पंख लावले तर स्वर्गाचा मार्ग मोकळा होतो हे प्रफुल्ला लहान वयातच उमजले होते. हारे विद्यालयात प्रफुल्ल यांचे नाव घालण्यात आले.हारे शाळेतील शिक्षकांना प्रफुल्लच्या तल्लक बुद्धी व असामान्य प्रतिभेची जाणीव व्हायला वेळ लागला नाही. कलकत्त्याची हवा प्रफुल्लचंद्रांना मानवली नाही. त्यामुळे ते परत गावी गेले. रसायनशास्त्रात प्रफुल्ला अधिक रुचि निर्माण झाली. शालेय शिक्षण अल्बर्ट शाळेतून पूर्ण केल्यावर कॉलेज शिक्षण त्यांनी मेट्रोपोलीटन संस्थेतून पूर्ण केले. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे दोन विषय शिकण्यासाठी प्रफुल्लचंद्रांना प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये बाही:शालexternal विद्यार्थी म्हणून प्रवेश घ्यावा लागला. प्राध्यापक पेटलर यांनी स्पष्ट केलेले प्रयोग स्वतः करून बघण्यासाठी प्रफुलचंद्र व त्यांच्या मित्रांनी घरीच एक प्रयोगशाळा तयार केली. 1882 साली त्यांना एडीनबर्ग विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व उच्च शिक्षणासाठी त्यांनी एडनबर्ग ला प्रवेश घेतला. डॉक्टर ऑफ सायन्स डिग्री प्राप्त केली. लंडनमधील सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञांच्या वर्तुळात प्रफुल चंद्राचे नाव चर्चेला जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्राचा मोठ्या खुबीने वापर केला. मुठभर इंग्रजांनी केवळ विज्ञानाच्या बळावर विशाल काय भारताला गुलामीच्या काळोखात लुटले हे सत्य नाकारता येत नाही.भारतात परत आल्यावर जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक ब्राऊन यांचे प्रशंसापुत्र असूनही प्रफुल्लचंद्र रॉय यांना नोकरी मिळाली नाही. या काळात निकटचे मित्र श्री जगदीश चंद्र बोस यांच्याबरोबर ते राहिले. या कालावधीत त्यांनी वनस्पती शास्त्राचा भरपूर अभ्यास केला. शिवाय प्राचीन ग्रंथातून त्यांना अर्क रसायनाचा अभ्यास करता आला. नंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये केवळ 250 रुपये प्रतिमाह पगारावर अस्थायी प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. रेसिडेन्सी कॉलेज मधील सरकारी नोकरीत प्रफुल चंद्रांची खूप घुसमट होत होती. याच काळात ते अशितोष मुखर्जी यांच्या संपर्कात आले. मुखर्जी यांनी नुकतेच कलकत्त्यास सायन्स कॉलेज घडले होते.भारतीय प्रथेपकाचा शोधच मुखर्जी घेत होते.रसायनशास्त्र शिकवीण्यासाठी प्रफुल्लचंद्र सारखा हिरा गवसला. प्रफुल्लचंद्र प्रेसिडेन्सी मधील नोकरी सोडून मुखर्जी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सायन्स कॉलेजमध्ये नव्या उत्साहाने व जोमाने प्रफुल्लचंद्र व त्यांचे विद्यार्थी रसायनशास्त्रातील नवनवीन शोधासाठी अथक प्रयत्न करू लागले. सायन्स कॉलेजच्या परिसरात आचार्यासाठी राहण्याची खोली बांधली होती. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आचार्याबरोबर राहता येई. प्रफुल्लचंद्र केमिकल सोसायटी ऑफ एडनबर्ग युनिव्हर्सिटी 1887- 88 या काळासाठी उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेले होते. नाईट्राईट संयुगावर प्रफुल्लचंद्रांनी भरपूर काम केले.नाईट्राइट तज्ञ म्हणून त्यांना वेगळी ओळख मिळाली. आयुर्वेदात पारा या धातूचा विशेष महत्त्व आहे. पारा व त्याची संयुगे याचा प्रफुल्लचंद्र यांनी भरपूर अभ्यास केला. पारा व नाइट्रिक अँसिड यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या ‘मरर्क्युरस नाईट्राईट’च्या शोधाणे प्रफुल्लचंद्र यांना जगभरात नवीन ओळख मिळाली. 1894 ते 1934 या चाळीस वर्षाच्या काळात त्यांचे दीडशे शोधनिबंध जगभरातील प्रसिद्ध शोधपत्रिकातून प्रसिद्ध झाले. अमोनियम नाइट्राइटचे पथ:,,क्करन करण्यात आचार्य व त्यांचा विद्यार्थी चमू यशस्वी झाला. या शोधाने जगभरातील वैज्ञानिकांचे श्वास रोखले गेले.अमोनियम नाईट्राईट स्फटिक स्वरूपात वेगळे मिळविले होते व हवा विरहित जागेत त्याचे विघटन न होता बाष्पीभवन होते तेही 60 डिग्री वर हे आचार्यांनी सहजपणे दाखवले. या शोधाबद्दल इंग्लंडच्या केमिकल सोसायटीत आचार्यांचा गौरव करण्यात आला. इंग्रजांच्या गुलामगिरीमुळे सत्व हरवलेल्या भारतीय मनात प्राण फुंकण्यासाठी आचार्यांनी ‘HISTORY OF HINDU CHEMISTRY’ हे पुस्तक लिहिले.औद्योगिक क्षेत्रात आचार्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. त्यांनी संपूर्ण स्वदेशी अशा ‘बेंगाल केमिकल्स अँड फार्मासिटिकल वर्क्स’ उद्योगाची मूर्तमेढ 1901 साली कलकत्त्याला केली. स्वदेशी विज्ञानच राष्ट्रस प्रगतीपथावर नेऊ शकते, याच ध्यासाने अध्यापन करणारा हाडाचा शिक्षक म्हणजे आचार्य.स्वदेशी उद्योगाची कास पकडून भारताचा पाठिचा कणा ताठ करणारा उद्योजक म्हणजे आचार्य.आचार्य म्हणजे सप्तऋषी तेजोगोलातून भारतभूमीवर अवतरलेला, ज्ञान भंडाराने परिपूर्ण असलेला वशिष्ठच.. भारतीय रसायनशास्त्राची आभा जगभर पसरविणारे एक तेजोमय जीवन 16 जून 1944 रोजी आसमंतात विलीन झाले.आधुनिक रसायनशास्त्राच्या या जनकास आमचे त्रिवार वंदन……
नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तंत्रज्ञानाचा वापर करताना वसुंधरेच्या नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन व्हायलाच हवे असा मोलाचा संदेश देणारे जगदीश चंद्र बोस यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सर जगदीश चंद्र बोस यांचा जन्म बंगाल देशातील मुंशिगंज जिल्ह्यात 30 नोव्हेंबर १८५८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवान चंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनल ऑफिसर होते आणि आईचे नाव बामा सुंदरी बसू होते. बसू नावाचे इंग्रजी स्पेलिंग मुळे पुढे बोस झाले. कलकत्ता येथील सेंट झेवियार्स शाळेत शिक्षण घेतल्यावर कलकत्ता विद्यापीठातून कला शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. लंडन विद्यापीठाची बी.एस.सी. व डी. एस. सी. पदवी प्राप्त केली. कलकत्ता विद्यापीठातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. इसवी सन 1876साली IACS इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्स चे उद्घाटन झाले. त्यात सर जगदीशचंद्र बोस आणि प्रफुलचंद्र बोस यांचा मोलाचा वाटा होता. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षण मात्र भाषेत स्थानिक भाषेत व्हावे यावर त्यांनी भर दिला.सर जगदीशचंद्र बोस यांनी विद्युत लहरीवर संशोधन केले. बिनतारी संदेश वाहन तंत्रज्ञानाचा जनक कोण असेल तर ते होते सर जगदीशचंद्र बोस. सर जगदीशचंद्र बसुनी विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध लावला, पण बोसांना तरंगाच्या प्रवास जास्त अंतरापर्यंत अपेक्षित होता. पथक परिश्रमांनी या तरंगाचे अंतर वाढवण्यास बोस यशस्वी झाले.आता पुढचा प्रश्न समोर उभा राहिला की तरंग रिसिव्ह कशी करायची बोसांच्या संशोधनाची पुढची यशस्वी बाजू अशी की त्यांनी रिसिव्हरचा सेमीकंडक्टरचा शोध लावला.कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये भिंती पलीकडे घंटानाद आणि बारूद ज्वलनाचा प्रयोग केला.या वायरलेस टेलिकमुनिकेशनच्या जनकाला मानाचा मुजरा. प्रसार माध्यमाचा खडतर प्रवास पक्षी,प्राणी, वाद्य, विविध संकेत ध्वनी, टपाल खाते, तार ऑफिस करत करत ईमेल पर्यंत सुखर होत गेला.अर्थात हे श्रेय बोसांना द्यायला हवे. सर जगदीशचंद्र बोस यांचे बायोफिजिक्स क्षेत्रात खूप मोलाचे योगदान आहे.विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली. सर जगदीशचंद्र बोस यांनी “बोस इन्स्टिट्यूट” बोस विज्ञान मंदिर या संस्थेची स्थापना 1917 मध्ये कलकत्ता येथे केली.सर जगदीश चंद्र बोस यांनी भारतात प्रायोगिक विज्ञानाचा पाया रोवला. I.E.E.E.ने त्यांना फादर ऑफ रेडिओसायन्स म्हणून संबोधले, तसेच एम्पायर CIE इसवी सन 1903 साली त्यांना सन्मान प्राप्त झाला. सर जगदीशचंद्र बोस यांना नाईट बॅचलर ही उपाधी 1917 साली मिळाली. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा जगदीश चंद्र बोस एक श्रेष्ठ गुरु,आचार्य होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वसा मेघनाथ सहा,सिसिरकुमार मिश्रा, देवेंद्र मोहन बोस,सत्येंद्रनाथ बोस यांना दिला. देशाच्या विकासासाठी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकाला जे.सी.बोस फेलोशिप प्रदान केली जाते. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात एक विवर जगदीशचंद्र बोस नावाने प्रसिद्ध झाले. 23 नोव्हेंबर 1937 साली बंगालच्या गिरिडो शहरात ही महान व्यक्ती अनंतात विलीन झाली. पर्यावरणीय अन्नसाखळी परस्परावलंबी आहे.सर जगदीशचंद्र बोस यांनी तंत्रज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घातली. तंत्रज्ञानाचा वापर करताना वसुंधरेच्या नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन व्हायलाच हवे असा मोलाचा संदेश सर जगदिशचंद्र बोस यांचे जीवन चरित्र आम्हाला देतो. science knows no country because knowledge belongs to humanity and is the torch which illuminates the world… संकलन -सो माधुरी देहेडकर डॉ.बी.व्ही.लिंबाळकर
नमस्कार 🙏🏻🙏🏻 दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती……….. आज आपण भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉक्टर ‘कमल रणदिवे’ यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर कमल रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 मध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर दत्तात्रय समर्थ. ते एक जीवशास्त्रज्ञ होते. बाईंनी फर्ग्युसन कॉलेज मधून 1937 साली B.sc ची पदवी घेतली. नंतर M.Sc करण्यासाठी त्या पुण्याच्या Agriculture कॉलेजमध्ये दाखल झाल्या. 1939 जयसिंग रणदिवे यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले.बाईंनी डॉक्टर खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली.पोस्ट डॉक्टरेट प्रशिक्षणासाठी त्यांना अमेरिकेत “टिश्यू कल्चर” चे तंत्र शिकण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांना रॉकफेलर फाउंडेशन ची शिष्यवृत्ती मिळाली होती. बाईंनी राजुर परिसरात जो संशोधन प्रकल्प हाती घेतला होता त्याला केंद्र सरकारच्या” डिपारमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी” या खात्याने मदत केली होती. हा प्रकल्प “इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन”या नावाने होता. ही संस्था 1973 साली स्थापन झाली होती. कॅन्सरचे संशोधन हा बाईंच्या आयुष्याभराचा ध्यास होता.अमेरिकेतून परतल्यावर आय.सी.आर.सी. मध्ये त्यांच्यावर टिशू कल्चर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. या विभागातून बाईंनी तीन उपविभागाची निर्मिती केली. कार्सिनोजेनेसिस, सेल बायलॉजी आणि इमिनोलॉजी. कॅन्सर कसा कार्य करतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत उंदरासारख्या प्राण्यावर दीर्घकाळ संशोधन केले.त्यातून स्तनाचा कॅन्सर,रक्ताचा कॅन्सर आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचे स्वरूप समजण्यास फार मोलाची मदत झाली. बाई या क्षेत्रातल्या पहिल्या शास्त्रज्ञ होत्या की ज्यानी ट्यूमर निर्माण करणारा व्हायरस आणि आपल्या शरीरातील संप्रेरके यांच्या कॅन्सरला बळी पडण्याच्या प्रवृत्तीशी ससेप्टिबिलीटी चा काय संबंध असतो हे शोधले. शिवाय त्यांनी कुष्ठरोगाच्या बॅक्टेरियावर जे काम केले त्यातून त्यावरची प्रतिबंध लस निर्माण करता आली. जगाकडे कुतुहलाने पाहण्याची बाईंची नेहमीच वर्त्ती होती. डॉक्टर कमल रणदिवे यांनी कर्करोग व कुष्ठ रोगावरील दोनशेहून अधिक वैज्ञानिक शोधप्रबंध प्रकाशित केले होते. डॉक्टर कमल यांना 1982 मध्ये मेडिसिन साठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया चा १९६४ चा पहिला रोप्य महोत्सव ही संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात त्यांना सुवर्णपदक देण्यात आले. डॉक्टर कमल यांना सूक्ष्मजीवशास्त्रासाठी 1964 चा G.H.Watumal Foundation पुरस्कार देण्यात आला.शेवटच्या काही वर्षात बाईंना अल्झायमरचा त्रास झाला. 10 एप्रिल 2001 रोजी त्यांचे निधन झाले.त्यावेळी एखादी स्त्री केवळ चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी भव्यदिव्य करते असे नक्कीच म्हणावेसे वाटते…….. विज्ञान सेनानी शब्दांकन- सो मृणालिनी कुंभारे संकलन- डॉ. बी. व्ही. लिंबाळकर….
आज आपण एक हुशार, कर्तबगार,धाडसी, बाणेदार, सरस्वतीच्या कन्या……… ‘कमला नारायण भागवत’ यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. 18 जुलै 1912 मध्ये इंदोरला त्यांचा जन्म झाला. कमला यांच्या वडिलांनी ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पदव्यूत्तर संशोधन केले आणि काकांनी मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. साठी प्रबंध सादर करून ‘मूस गोल्ड मेडल’ मिळवलं होतं. वडील आणि काकांचा वारसा घेऊन ही मुलगी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये पदव्युतर शिक्षण घेण्यासाठी आली खरी पण ब्रिटीश अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स’मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांनी ‘मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही’ असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व ‘मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.’ असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला.मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच द्यावा. आत्मविश्वास,उत्कृष्ट इंग्रजीत बोलन, उत्तम काम करून ध्येय पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्या अंगी होती. डॉक्टर सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी जीवरसायनशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.संशोधनात प्रथम प्रोटीन्स,नॉन प्रोटीन्स वेगळी केली आणि प्रथिनाचे तीन स्तरावर प्रथक्करण केले. गुरु श्रीनिवासय्या यांच्या मार्गदर्शनाने शोधलेख लिहिण्याचे शिकल्या.दूध आणि कडधान्यावरच त्यांचे संशोधन फार गाजले.1936 मध्ये मुंबई विद्यापीठातून एम. एस्सी ची पदवी मिळाली.पुढे पीएच.डी. साठी 1936 मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला.’स्प्रांगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरेन स्कॉलरशिपल’या शिष्यवृत्या प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत्या. त्यांनी डेरीक त्यांच्यासोबत वनस्पतीवर संशोधन केले. सायटोक्रोम- सी वनस्पतीच्या शोषण प्रक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या सायटोक्रोमचा शोध लावला.हे प्रथिन श्वसन रंजक असते असे आढळून आले आहे. तसेच सर्व वनस्पती कोशिकांच्या ऑक्सिडीकरणात ‘सायटोक्रोम-सी’चा सहभाग असतो, हे माहीत झाले. केंब्रिज विद्यापीठातून पी.एचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय मराठी भाषिक स्त्री होत्या.न्यूट्रिशनल रिसर्च लॅब कुन्नूर,भारत तोसला ईस्ट जीवनसत्व प चा शोध पण त्यांनीच लावला. 4 सप्टेंबर 1947 रोजी कमला भागवत यांचा माधव सोहनी यांच्याशी मुंबईत विवाह झाला. म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान करण्याची प्रक्रिया शोधणे, कडधान्यांमधील ट्रिप्सीन इनहिबिटर्स,आरे दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत. वासरांचा आहार, धानआट्यातील पौष्टिक घटक, नीरा या पेयातील उपयुक्त घटक, त्यांचे माणसांवर परिणाम. नीरा संशोधनाबद्दल त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई येथे विभाग प्रमुख असणाऱ्या कमलाबाईंनी’आहारगाथा’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या 155 इतकी आहे.निवृत्तीनंतरही त्यांनी आपले सार आयुष्य अन्नभेसळी विरोधात काम करण्यात विधीत केलं. भारतीय वैज्ञानिक संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी खास कार्यक्रम दिल्लीत आयोजित केला होता. प्रेक्षकांनी उभ राहून त्यांच्या कार्याला टाळ्यांच्या कडकडाटांनी मानवंदना दिली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावर कोसळल्या.ही तारीख होती आठ सप्टेंबर 1997 वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला……. विज्ञान सेनानी शब्दांकन – सो मृणालिनी कुंभारे संकलन – डॉ. बी. व्ही. लिंबाळकर………..
नमस्कार🙏🏻 ” इतिहास भारतीय विज्ञानाचा” या सत्रात आपले स्वागत. “घेतलेला हा वसा तू कधी सोडू नको,निराशेने वा अपयशाने तू कधी मोडू नको” अशा विस्मृतीत गेलेली एक तारका “वैज्ञानिक विभा चौधरी” यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. विभा चौधरीचा जन्म 3 जुलै 1913 कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील बांकु बिहारी चौधरी डॉक्टर होते,तर आई उर्मिला देवी एका ब्राम्हो समाज मिशनची मुलगी होत्या. विभा यांनी कलकत्ता विश्वविद्यालयाच्या बाजारा सायन्स कॉलेजमधून भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. 1936 मध्ये त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्राची पदवी व पदविका मिळविली. नोबेल पासून वंचित ठेवली गेलेली पहिली भारतीय शास्त्रज्ञ आजही मायदेशात दुर्लक्षितच आहे.
संशोधन क्षेत्रातलं असंच एक दुर्लक्षित नाव म्हणजे विभा चौधरी. अणुभौतिकशास्त्रात महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं. केवळ स्त्री असल्यामुळे आणि सरकार सहीत इतर कोणाचाही पाठिंबा नसल्यामुळे त्यांनी केलेलं महत्त्वाचं संशोधन विस्मृतीत गेलं. त्या आजही लोकांना माहीत नाहीत. अगदी नोबेल प्राईज मिळेल इतक्या तोडीच संशोधन करूनही त्यांना नोबेल तर सोडाच पण भारतातीलही कुठल्याही वैज्ञानिक संस्थेकडूनही संशोधनात्मक कार्यासाठी दिला जाणारा कोणताही पुरस्कार दिला गेला नाही. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी केवळ संशोधनासाठी वाहून घेतलं होत. त्याकाळात भौतिकशास्त्र घेऊन एमएससी करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. पोस्ट ग्रज्युएशन नंतर त्याच युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी डी.एम. बोस यांच्याबरोबर संशोधन चालू केले. त्यांच्याबरोबरच त्या बोस इन्स्टिट्युट मध्ये १९३८ मध्ये गेल्या. त्याचं संशोधन मेसोन वर होतं.”मेसोन” म्हणजे अणु पेक्षाही लहान मूलकण, अणुच्या केंद्रात आढळणारा मूलकण. त्यांच्या या संशोधनासाठी लागायचे फोटोग्राफिक प्लेट्स.त्याद्वारेच झालेल्या संशोधनावर त्यांनी लिहलेले तीन प्रबंध सायन्स साठी प्रसिद्ध असलेल्या नेचर मासिकात त्यावेळेस प्रसिद्ध झाले होते. १९४० नंतर पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यामुळेच त्यांना संशोधनासाठी लागणारे फोटोग्राफिक प्लेट्स मिळेनासे झाले. म्हणून मग त्यांना संशोधन थांबवावे लागले आणि त्यांनी मॅंचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये पीएचडी करायचे ठरवले.
विभा चौधरी यांनी जे संशोधन चालू केले होते त्यासाठी त्या ज्या मेथड वापरायच्या त्याच मेथडचा वापर करून ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ सी.एफ. पॉवेल यांनी संशोधन केले.आणि विशेष म्हणजे त्यांच्या संशोधनाला नोबेल प्राईज मिळाले. विभा चौधरी इथेही दुर्लक्षित राहिल्या.
१९४५ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ ब्लॅकेट यांच्याबरोबर त्या संशोधनात सहभागी होत्या. त्यावेळेस ब्लॅकेट हे ब्रम्हांडातील किरणांचा अभ्यास करत होते. त्यावरती त्यांचं काम चालू होतं.विभा चौधरी त्यांना मदत करायच्या. कॉस्मिक रेज वर विभा चौधरी संशोधन करत होत्या. ब्लॅकेट यांनीही आपलं संशोधन ब्रह्मांडातील किरणांवरच चालू ठेवलं होतं. १९४९ मध्ये विभा चौधरी यांनी आपला पीएचडी चा कॉस्मिक रेज वरचा थिसिस सादर केला. त्याच वेळेस ब्लॅकेट यांना त्यांच्या कॉस्मिक रेज वरच्या संशोधनसाठी नोबेल प्राईज मिळालं. परंतु यासाठी विभा यांनी दिलेले योगदान दुर्लक्षित राहिलं.
त्यानंतर त्या १९४९ मध्ये भारतात परत आल्या. इथे आल्यावर त्या “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई” येथे जॉईन झाल्या. डॉक्टर होमी भाभा यांच्या बरोबर अणूसंशोधन आणि कण भौतिकी यावर त्या काम करत होत्या. १९५५ मध्ये इटली मध्ये पिसा येथे मूलकणांच्या संदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनातही त्या सहभागी होत्या. १९५७ मध्ये त्या ‘फिजिकल रिसर्च लॅबरोटरी, अहमदाबाद’ येथे रुजू झाल्या. त्यावेळेस त्याचे प्रमुख होते डॉक्टर विक्रम साराभाई. त्यांनी डॉ. साराभाई यांच्याबरोबर ‘कोलार गोल्ड फिल्ड’ या संशोधनात सहभाग घेतला.ज्यामध्ये भूमिगत असलेल्या उप अणूकणांचा शोध घेतला जात होता. ज्यासाठी एक ” कण डिक्टेटर “देखील तयार करण्यात आला होता. खाणींमध्ये खोल जाऊन अशा उपकणांचा शोध घेतला जायचा.
१९८० पर्यंत या प्रयोगावर काम चालू होते. भारतीय वैज्ञानिक हे करू शकत होते. परंतु पुढे सरकारकडून मिळणारा निधी कमी पडायला लागला. शेवटी निधीअभावी कण डिक्टेटर सोडून द्यावा लागला आणि प्रयोगही थांबवावा लागला. विभा यांना खरंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी उत्सर्जनाचा अभ्यास करण्यात देखील रस होता. त्यासाठी माउंट अबू येथे एक केंद्र स्थापन करायचा त्यांचा मानस होता.
परंतु विक्रम साराभाई यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांना हे कार्य करता आले नाही. विक्रम साराभाई, विभा चौधरींना प्रयोगांसाठी प्रोत्साहन द्यायचे.
पुढे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये देखील नेतृत्व बदल झाले. भारतातील इतर सरकारी ऑफिसेस मध्ये असणारी नोकरशाही तिथेही सुरू झाली. विभा चौधरी यांना मुक्तपणे संशोधन करण्यास मनाई करण्यात आली.
शेवटी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि त्या परत कलकत्त्याला गेल्या. तिथे त्यांनी ‘साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ मध्ये काम करायला सुरुवात केली.
अगदी त्यांचा मृत्यू येईपर्यंत त्या त्याच इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होत्या. त्यांचा प्रबंध १९९० मध्ये त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स मध्ये छापला गेला. विभा चौधरी यांनी आपले संपूर्ण जीवन केवळ संशोधनासाठी वाहून घेतलं होतं. त्यांनी कधीही लग्न केलं नाही आणि संसार मांडला नाही. त्यांचा संसार म्हणजे त्यांचे संशोधनच.
परंतु त्यांच्या संशोधनाला जो सन्मान मिळायला हवा होता तो मात्र त्यांना मिळाला नाही.
फिजिकल रिसर्च लॅबरोटरी मध्ये त्यांच्याबरोबर इतर जे शास्त्रज्ञ काम करत होते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, प्रतिष्ठित पद मिळाले, पण विभा मात्र त्यापासून वंचित राहिल्या.
भारतीय विज्ञान अकादमी कडून दरवर्षी अनेक शास्त्रज्ञांना पुरस्कृत केलं जातं. परंतु कधीही विभा यांना कुठलाही पुरस्कार मिळाला नाही.
अगदी २०१९ मध्ये भारतीय विज्ञान अकादमीने भौतिकशास्त्रात इंग्रजांच्या काळापासून आत्तापर्यंत काम केलेल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांची यादी दिली होती.
त्यामध्ये शंभर एक महिला शास्त्रज्ञांचे नाव आहे, परंतु त्यातही विभा चौधरी यांना स्थान नाही. अगदी अलीकडे विज्ञान इतिहासकार राजिंदर सिंह आणि सुप्रकाश सी यांनी एक पुस्तक लिहिले आहे ज्याचं नाव आहे बिभा चौधुरी: अ ज्वेल उनाटर्डः द स्टोरी ऑफ अ इंडियन वुमन सायंटिस्ट’.
त्यामध्येच विभा चौधरी यांची माहिती मिळते.
मॅंचेस्टर मध्ये असताना ब्लॅकेट यांना त्यांनी केलेल्या मदती बद्दल तिथल्या ‘ मॅंचेस्टर हेरॉल्ड ‘ या वर्तमानपत्राने विभा चौधरी यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना म्हटलं होतं,
“Meet India’s New Woman Scientist — She has an eye for cosmic rays”.
स्वतः विभा चौधरी यांना अनेक महिलांनी, मुलींनी भौतिकशास्त्राच्या संशोधनात सहभागी व्हावं असं वाटायचं. २जून१९९१ ला त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत साधी राहणी आणि केवळ संशोधनासाठी आपलं सारं जीवन व्यतीत करणारी विभा चौधरी खरोखरच विस्मृतीत गेलेली एक तारका आहे असंच म्हणावं लागेल………. अशा या स्वयंप्रकाशित तेजपुंज तारकेला शतशः नमन………
आत्ता आपण पाहणार आहोत लगतच्या काळातील वैज्ञानिक,एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैज्ञानिक……….. भारत देश पारतंत्र्यात होता, पण भारतीय वैज्ञानिकांनी आपली राष्ट्रप्रेम जगभर दाखवून दिले. अत्यंत कठीण परिस्थिती सुद्धा आपला आत्मविश्वास,जिज्ञासा आणि जिद्दीने आपले संशोधनाचे कार्य करून सर्व जगात भारताचे नाव केले. चला तर जाणून घेऊया ह्या सर्व वैज्ञानिकांबद्दल…
भारतीय ऊसाला गोडवा प्राप्त करून देणाऱ्या स्त्री शास्त्रज्ञ “जानकी अम्मल”
जानकी अम्मल यांचा जन्म 1897 मध्ये केरळ मधील तेलीचेरी येथे झाला.तेलीचेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या मद्रास येथे गेल्या. तिथे त्यांनी किन मेरी महाविद्यालयामधून वनस्पती शास्त्रज्ञाची बॅचलर्स डिग्री आणि पुढे प्रेसिडेन्सी महाविद्यारातून ओनर्स डिग्री प्राप्त केली. परदेशात पूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी बार्बेल शिष्यवृत्ती जानकीला मिळाली.1924 मध्ये जानकी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात रुजू झाल्या. त्या ठिकाणी plant cytology चा अभ्यास सुरू केला. डॉक्टर जानकी अम्मल या अमेरिकेतून वनस्पती शास्त्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. वनस्पती शास्त्रात संशोधन करण्यासाठी त्या पूर्ण जग फिरल्या .मात्र कोईम्बतुर मध्ये त्यांच्या ज्ञानाचा खरा उपयोग झाला. त्यांनी ‘इम्पिरियल शुगरकेन’या संस्थेत संशोधन सुरू केले. भारतीय ऊसाच्या जातीचा सखोल अभ्यास केला.जानकी अंम्मल यांनी कोणत्या संकरामध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त आहे हे शोधण्यासाठी अनेक क्रॉस ब्रीड करून पाहिले. त्यामुळेच भारतीय ऊसात गोडवा निर्माण झाला आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी सुधारित जात निर्माण करता आली.म्हणूनच त्यांना भारतीय ऊसाला गोडवा प्राप्त करून देणारी स्त्री शास्त्रज्ञ असे म्हणून सुद्धा संबोधले जाते. त्यांनी वेगवेगळ्या वनस्पतींच्या गुणसूत्रांचा विस्तृत अभ्यास केला. त्यांच्या नावे ‘मॅग्नोलिया कोंबस जानकी अम्मल’हे नाव जपान व चीनमध्ये सापडणाऱ्या गुलाबी फुलांच्या झाडांना देण्यात आले. 1951 मध्ये भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सूचनेनुसार जानकी भारतात परतल्या. भारत सरकारने त्यांना डायरेक्टर जनरल ऑफ बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या पदावर नियुक्त केले. त्यांनी लखनऊ आणि जम्मू येथील सुप्रसिद्ध बॉटनिकल गार्डन ची निर्मिती केली. दुसऱ्यांना आनंद देणारी ज्ञानी ,शास्त्रज्ञ, हुशार विद्यार्थिनी,आई-वडिलांची कर्तुत्वान लेक,भारताचे नाव अजरामर करणारी संशोधिका आयुष्यातील कटू प्रसंगाचे घोट पचवून भारतीय उसाच्या पेरापेरात गोडवा भरणारी ही गोड आम्मा 4 फेब्रुवारी 1984 रोजी अनंताच्या प्रवासाला निघून गेली…….
विज्ञान सेनानी शब्दांकन – सौ.मृणालिनी कुंभारे संकलन-डॉ. बी.व्ही. लिंबाळकर