+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
परभणीकरानी अनुभवला शून्य सावली दिवस

परभणीकरानी अनुभवला शून्य सावली दिवस

निसर्ग आपल्याला विविध नैसर्गिक कृतीतून अवाक करत असतो. आपण म्हणतो की आपली सावली आपली साथ सोडून जाऊ शकत नाही. पण हे सत्य नाही. वर्षभरात असे दोन दिवस असतात ज्या वेळेत दुपारी काही क्षणा साठी आपली सावली आपली साथ सोडून जाते. त्या दिवसांना शून्य सावलीचा दिवस अर्थातच झिरो शॅडो डे अस संबोधलं जाते. दरम्यान परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी तर्फे सुद्धा ह्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आवाहन करण्यात आले, ज्यास परभणीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन शून्य सावलीचे विविध प्रयोग केले.

ह्या झिरो शॅडो डेच्या शुन्य सावली दिनाच्या दिवशी सुर्य आपल्या डोक्याच्या एकदम वर येत असल्याने आपणास आपली सावली दिसेनाशी होते.यालाच बिनासावलीचा दिवस असे देखील म्हटले जाते. वर्षातील खुप ठाराविक एक दोन दिवस आहे जेव्हा हा शुन्य सावलीचा अनुभव आपणास येत असतो.
आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते.
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.

महाराष्ट्रातील विविध शहरे यांचे अक्षांश वेग वेगळे असल्या कारणाने विविध ठिकाणी शून्य सावलीची वेळ आणि दिनांक वेगळा असू शकतो.त्यामुळे दुपारी 12 ते 12.35 वेळेमध्ये आपण शुन्य सावली दिवस अनुभवू शकतो. शहरे आणि शून्य सावली ची वेळ : परभणी – 12.19 मि., नांदेड – 12.17 मि., छ. संभाजीनगर – 12.25 मि., बीड- 12.23 मि., लातुर- 12.20 मि., हिंगोली-12.18 मि., धाराशिव- 12.22 मि., जालना – 12.23 मि.

पासच्या आवाहनास वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू श्री. इंद्र मनी ह्यांनी सुद्धा प्रतिसाद देत, शून्य सावली प्रयोग अनुभवले. त्यावेळी त्यांनी पास च्या विज्ञान चळवळ विषयी सदिच्छा व्यक्त केल्या. प्रस्थावित परभणी विज्ञान संकुल परिसरात देखील शून्य सावली दिन विविध प्रयोगाच्या मार्फत साजरा केला गेला.

राधानाथ सिकदार

राधानाथ सिकदार

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

जी पाऊले अथक ध्येयाकडे उत्तुंग हिमनग तोकडा, मां भारतीच्या पुत्रापुढे…….. हे वर्णन ज्यांना लागू पडते त्या भारत मातेच्या सुपुत्राची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत.एवरेस्ट ची उंची मोजणारे गणितज्ञ राधानाथ सिकदार……

त्यांचा जन्म, कलकत्ता येथे इसवी सन 1813साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तितुराम सिकदर. त्यांचे शालेय शिक्षण फिरंगी कमल बोस स्कूल आणि हिंदू स्कूल कोलकत्ता येथे झाले.लहानपणापासूनच त्यांना गणित विषयात विशेष रुचि होती. त्रिकोणमिती हा विषय त्यांचा विशेष लाडका! गणितावर त्यांचे लेखही प्रसिध्द होत असत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुढे ब्रिटिश सरकारनं त्यांना त्रिमितीय समितीत सहभागी करून घेतलं.
भारतीय सर्वेक्षण खात्यात प्रगणक या पदावर ते रूजू झाले तेव्हा ते एकमेव भारतीय तर होतेच, शिवाय त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षं.
त्यांची या क्षेत्रातील गती आणि ज्ञान इतकं थक्क करणारं होतं की देशातच नाही तर विदेशातही त्यांचा हात धरू शकणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. भारतीय सर्वेक्षण खात्यातील अनमोल रत्न असा त्यांचा गौरवानं उल्लेख होऊ लागला. हवामान आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केलं. वेधशाळेच्या कार्यपध्दतीत बदल करून हवेच्या दाबाच्या आकड्यांचे शून्य अंश सेल्सिअस तापमानासाठी रूपांतर करण्यासाठी म्हणून गणिती सूत्र शोधलं.
खरंतर एव्हरेस्ट या शिखराला राधानाथांच्या नावानं ओळखलं जाणं जास्त योग्य होतं. तत्कालिन सरकारनं जरी एव्हरेस्ट यांचा सन्मान म्हणून या शिखराला त्यांचं नाव दिलं असलं, तरीही हे श्रेय पूर्णार्थानं राधानाथ यांनाच द्यायला हवं.त्रिमितीय समितीचं काम चालू असण्याचा तो काळ होता, १८५२ मधील. एका सकाळी राधानाथ सिकदर, घाईनं सर ॲण्ड्र्यु वॉ यांच्या ऑफिसमधे आले. त्यांचा चेहरा अत्यानंदानं चमकत होता.
त्यावेळी त्यांनी एका दमात त्यांच्या साहेबाला सांगितलं, “सर मी जगातलं सर्वात उंच पर्वतशिखर शोधलं आहे” व्यवसायानं गणितज्ज्ञ असणारे राधानाथ तत्कालिन ब्रिटिशराजमधील सर्वेक्षण खात्यात काम करत होते.

तत्कालिन सरकारनं हिमालयातील शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणितज्ज्ञ यांचा अभ्यासगट नेमला होता. या प्रकल्पाचं नाव होतं, द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे (महा त्रिकोणमितीय सर्वेक्शण). राधानाथ हे या अभ्यास गटात सहभाग असणारे एकमेव भारतीय. सिकदारांनी सूर्य आणि रात्री दिसणारे तारे यांच्या निरीक्षणावर आधारलेली दिवसाच्या सेकंदाच्या अल्पांशापर्यंत अचूक वेळ समुद्रातील अकबोटींना इशारे देऊन कळविण्यासाठी एक संकेत प्रणाली स्थापन केली होती, ती इसवी सन 1853 पासून अमलात आली.

17 मे 1870 मध्ये गोंदालपारा येथे राधानाथ यांचे निधन झाले. अशा या हिमालया एवढ्या उत्तुंग बुद्धिमत्ता लाभलेल्या व तेवढ्याच मोठ्या मनाच्या गणित तज्ञाला कोटी कोटी नमन…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

संकलन -डॉ. बी. व्ही. लिंबाळकर

विषयसौंदर्य अध्यापनात आणण्याची गरज- भाभा अणु संशोधन चे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयंत जोशी यांचे प्रतिपादन

विषयसौंदर्य अध्यापनात आणण्याची गरज- भाभा अणु संशोधन चे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयंत जोशी यांचे प्रतिपादन

   दिनांक 30/4/2013 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ  आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने एकदिवशीय 'भौतिक संकल्पनांचे दृढ़ीकरण' या विषयाची कार्यशाळा,पशु शक्तीचा योग्य वापर योजना, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
 कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉक्टर बाहुबली लिंबाळकर यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण करून त्यांचे राष्ट्राविषयीचे प्रेम व भारतीय विज्ञान चळवळीतील योगदान याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा  कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी साहेब होते.दैनंदिन व्यवहारात भौतिकशास्त्राचा वापर कसा असतो याची उदाहरणे देत डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील व डॉ. स्मिता सोलंकी लाभल्या होत्या. मुले अशा प्रकारच्या कार्यशाळेने प्रेरित होतात असे मत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि कार्यशाळेचे प्रमुख डॉ. श्री जयंत जोशी हे मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र येथून खास उपस्थित होते. 
कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भौतिकशास्त्रातील प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबक,गुरुत्वमध्य, अपकेंद्रबल, केंद्रगामीबल,घनता, घर्षण, न्यूटनचे गतीविषयक नियम या संकल्पनांचे दृढ़ीकरण करणारे प्रयोग डॉ.जयंत जोशी यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांकडून करून घेतले. प्रयोग करताना मुलांचा आनंद ओसांडून वाहत होता.
 तसेच शिक्षक व पालकांसोबतच्या परिसंवादात डॉ.जयंत जोशी सर बोलताना पूरक शिक्षण प्रणाली व शिक्षकांची भूमिका ही आत्ताच्या शिक्षण पद्धतीत अतिशय महत्त्वाची आहे असे सांगून, प्रत्येक विषयाचे विषय सौंदर्य शिक्षकांनी मुलासमोर ठेवली तर त्यांना त्या विषयाची गोडी लागेल व ते आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जातील, अशी आशा डॉ.जयंत जोशी यांनी व्यक्त केली.कोणत्याही विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्या विषयाचे वेडे होण्याची गरज आहे असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथून आलेले गणित शिक्षक  श्री.नागेश वाईकर सर यांनी मुलांना गणितीय संकल्पनांचे प्रयोगतून ज्ञान दिले.जालन्याहून श्री अमोल कुंभळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगात मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवी शिंदे ,श्री प्रसाद वाघमारे, श्री प्रवीण वायकोस व दीपक शिंदे यांनी केले. याप्रसंगी श्री प्रकाश केंद्रेकर सर, प्रा. डॉ.सुनील मोडक सर, प्रा. विष्णू नवपुते सर व श्री नानासाहेब कदम व श्री रामटेके सर यांनी आपले मत मांडले.
या कार्यक्रमासाठी डॉ .रामेश्वर नाईक डॉ. प्रताप पाटील, सौ. कमल पाटील, श्री सुधीर सोनुनकर, डॉ. विजयकिरण नरवाडे, श्री हेमंत धनोरकर,श्री दत्ता बनसोडे , प्रसन्न भावसार, प्रसाद वाघमारे, डॉ.रणजीत लाड, ओम तलरेजा, अशोक लाड, संग्राम देशपांडे, डॉ.अनंत लाड, डॉ अमर लड़ा,नयना गुप्ता,पद्माकर पवार ,महेश काळे व संपूर्ण परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची टीम व कृषी विद्यापीठातील  कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत असताना डॉ.रामेश्वर नाईक सरांनी पुढील काळात पण अशाच प्रकारच्या विविध विषयातील कार्यशाळा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीने घेण्याचे आश्वासन देऊन पूरक शिक्षणप्रणालीचे महत्व सांगितले.
सुब्रमण्यम चंद्रशेखर

सुब्रमण्यम चंद्रशेखर

नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻

नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

डॉक्टर चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 मध्ये लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रमण्यम हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडिट खात्यात नोकरीला होते. विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सी. व्ही.रामन हे चंद्रशेखरांचे काका होते. अशा हुशार घराण्यातील असलेले चंद्रशेखर स्वतः ही बालपणापासून प्रतिभावान व हुशार होते.

डॉक्टर चंद्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. 1930 साली डॉक्टर चंद्रशेखर बी.एस्सी.झाल्यानंतर केंब्रिज विद्यापीठातील ट्रीनिटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पीएच.डी. झाल्यानंतर डॉ. चंद्रशेखर शिकागो विद्यापीठात 1939 साली सहाय्यक म्हणून रुजू झाले. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी इंडियन जनरल ऑफ फिजिक्स मध्ये चंद्रशेखर यांची पहिली शोध पत्रिका प्रकाशित झाली. 11 जानेवारी 1935 ला इंग्लंड येथील रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सभेत त्यांनी आपले शोध पत्र सादर केले. ज्यामध्ये छोट्या छोट्या पांढऱ्या रंगाचे तारे एक निश्चित द्रवमान प्राप्त केल्यानंतर आपल्या वजनात आणि वृद्धीत वाढ करू शकत नाहीत. त्यांनी सांगितले की ताऱ्यांचे द्रव्यमान हे सूर्यग्रहापेक्षा 1.4 पट आहे. त्यामुळे ते तारे आकुंचन पावतात व जड होतात. तार्‍यावरील त्यांचे संशोधन कार्य आणि ‘चंद्रशेखर मर्यादा’ नावाचा सिद्धांत खगोलशास्त्राच्या क्षेत्रात एक मोठी उपलब्धी मानली जाते. डॉक्टर चंद्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे त्यांचा हा “चंद्रशेखर मर्यादा सिद्धांत” पुंजवाद आणि सापेक्षतावाद याची सांगड घालून चंद्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमान मर्यादा सूर्यापेक्षा 44% इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. डॉक्टर चंद्रशेखर यांनी 1939 साली आपला सिद्धांत An Introduction to the study of stellar structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रूपात मांडला. 1983 साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉक्टर चंद्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार देण्यात आला. 1972 मध्ये ब्लॅक होलचा शोध लागला. कृष्णविवरांच्या शोधात चंद्रशेखरांचा सिद्धांत कामी आला.

अमेरिकेच्या नासा या संस्थेने अंतराळात सोडलेल्या चार भव्य वेधशाळांपैकी एक वेधशाळा क्ष तरंग ग्रहण करणारी असून या वेधशाळेला चंद्रशेखर यांचे नाव देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. ही वेधशाळा ‘चंद्रा एक्स रे’या नावाने ओळखली जाते. ही वेधशाळा 23 जुलै 1999 रोजी अंतराळात सोडण्यात आली असून ती आज तगायात कार्यरत आहे. भौतिकशास्त्राची चुंबकीय द्रवगतीशास्त्र नावाची शाखा आहे. या विषयातील स्थिरअंकाला चंद्रशेखर यांचे नाव देण्यात आले. तसेच एका लघुग्रहाला 1958 मध्ये चंद्रशेखर असे नाव दिले गेले. चंद्रशेखर यांनी सुमारे 380 शोधले आणि अकरा पुस्तके लिहिली. चंद्रशेखर हे 1952 ते 1971 या काळात एस्ट्रो फिजिकल जनरल या प्रतिष्ठित शोध नियतकालिकाचे संपादक होते. नोबेल पुरस्कारा व्यतिरिक्त त्यांना इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. विज्ञान शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या साठी आपले महत्त्वपूर्ण जीवन समर्पित करणारे महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांनी 21 ऑगस्ट 1995 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

शब्दांकन-सो. मृणालिनी कुंभारे

संकलन-डॉ.बी व्ही लिंबाळकर

आचार्य प्रफुल्ल चंद्र रॉय

आचार्य प्रफुल्ल चंद्र रॉय

नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकाचे कार्य बहुमोलाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा बारकाव्यासह अभ्यास केला तर असे लक्षात येते की,भारताचे स्वातंत्र्य हे विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यावर लढल्या गेलेल्या अविरत प्रयत्नांची फलश्रूती आहे. भारताचे शैक्षणिक क्षेत्र लुळे पांगळे करण्याचा इंग्रजांचा मनसुबा आपल्या देशातील पुरुषोत्त्वास खऱ्या अर्थाने गुलाम बनविण्यास कारणीभूत ठरला आणि म्हणूनच गलितगात्र झालेल्या भारतीय मानसिकतेस उद्दीपित करण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षक तज्ञांचे, विपरीत परिस्थितीत लढणाऱ्या संशोधकांचे स्थान स्वातंत्र्याच्या लढ्यात वेगळ्या रूपाने उठून दिसते. परकीय सत्तेच्या अमलाखाली राहून संशोधनासाठी अपुरी सामग्री असताना अनेक अच्युत प्रतिभेच्या व्यक्तीमत्त्वांनी भारतीय विज्ञानाची झळाळती पताका जगभर पसरली. बुद्धिमान राष्ट्राच्या समूहात इंग्रजांच्या गुलामीत असणाऱ्या भारताने नाव अधोरेखांकित करण्याचे महान कार्य या भारतीयांनी केले. चला तर मग स्वतःच्या संशोधनाने भारताचे नाव जगभरात करणाऱ्या या शास्त्रज्ञाची आज आपण ओळख करून घेऊया…. “आधुनिक युगातील वशिष्ठ” आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय

आचार्य प्रपुल्लचंद्र रॉय यांचा जन्म राउली काठीपाडा पश्चिम बंगाल या गावी 2 ऑगस्ट 1861साली झाला. हरिश्चंद्र रॉय हे त्यांचे वडील ते साहित्याचे गाढे अभ्यासक होते. प्रफुल्लचंद्र रॉय यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांनी उभारलेल्या प्रायमरी शाळेत झाले. “अज्ञानी असणे हा शापच आहे “ध्येयाला ज्ञानाचे पंख लावले तर स्वर्गाचा मार्ग मोकळा होतो हे प्रफुल्ला लहान वयातच उमजले होते. हारे विद्यालयात प्रफुल्ल यांचे नाव घालण्यात आले.हारे शाळेतील शिक्षकांना प्रफुल्लच्या तल्लक बुद्धी व असामान्य प्रतिभेची जाणीव व्हायला वेळ लागला नाही. कलकत्त्याची हवा प्रफुल्लचंद्रांना मानवली नाही. त्यामुळे ते परत गावी गेले. रसायनशास्त्रात प्रफुल्ला अधिक रुचि निर्माण झाली. शालेय शिक्षण अल्बर्ट शाळेतून पूर्ण केल्यावर कॉलेज शिक्षण त्यांनी मेट्रोपोलीटन संस्थेतून पूर्ण केले. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे दोन विषय शिकण्यासाठी प्रफुल्लचंद्रांना प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये बाही:शालexternal विद्यार्थी म्हणून प्रवेश घ्यावा लागला. प्राध्यापक पेटलर यांनी स्पष्ट केलेले प्रयोग स्वतः करून बघण्यासाठी प्रफुलचंद्र व त्यांच्या मित्रांनी घरीच एक प्रयोगशाळा तयार केली. 1882 साली त्यांना एडीनबर्ग विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व उच्च शिक्षणासाठी त्यांनी एडनबर्ग ला प्रवेश घेतला. डॉक्टर ऑफ सायन्स डिग्री प्राप्त केली. लंडनमधील सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञांच्या वर्तुळात प्रफुल चंद्राचे नाव चर्चेला जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्राचा मोठ्या खुबीने वापर केला. मुठभर इंग्रजांनी केवळ विज्ञानाच्या बळावर विशाल काय भारताला गुलामीच्या काळोखात लुटले हे सत्य नाकारता येत नाही.भारतात परत आल्यावर जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक ब्राऊन यांचे प्रशंसापुत्र असूनही प्रफुल्लचंद्र रॉय यांना नोकरी मिळाली नाही. या काळात निकटचे मित्र श्री जगदीश चंद्र बोस यांच्याबरोबर ते राहिले. या कालावधीत त्यांनी वनस्पती शास्त्राचा भरपूर अभ्यास केला. शिवाय प्राचीन ग्रंथातून त्यांना अर्क रसायनाचा अभ्यास करता आला. नंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये केवळ 250 रुपये प्रतिमाह पगारावर अस्थायी प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. रेसिडेन्सी कॉलेज मधील सरकारी नोकरीत प्रफुल चंद्रांची खूप घुसमट होत होती. याच काळात ते अशितोष मुखर्जी यांच्या संपर्कात आले. मुखर्जी यांनी नुकतेच कलकत्त्यास सायन्स कॉलेज घडले होते.भारतीय प्रथेपकाचा शोधच मुखर्जी घेत होते.रसायनशास्त्र शिकवीण्यासाठी प्रफुल्लचंद्र सारखा हिरा गवसला. प्रफुल्लचंद्र प्रेसिडेन्सी मधील नोकरी सोडून मुखर्जी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सायन्स कॉलेजमध्ये नव्या उत्साहाने व जोमाने प्रफुल्लचंद्र व त्यांचे विद्यार्थी रसायनशास्त्रातील नवनवीन शोधासाठी अथक प्रयत्न करू लागले. सायन्स कॉलेजच्या परिसरात आचार्यासाठी राहण्याची खोली बांधली होती. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आचार्याबरोबर राहता येई. प्रफुल्लचंद्र केमिकल सोसायटी ऑफ एडनबर्ग युनिव्हर्सिटी 1887- 88 या काळासाठी उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेले होते. नाईट्राईट संयुगावर प्रफुल्लचंद्रांनी भरपूर काम केले.नाईट्राइट तज्ञ म्हणून त्यांना वेगळी ओळख मिळाली. आयुर्वेदात पारा या धातूचा विशेष महत्त्व आहे. पारा व त्याची संयुगे याचा प्रफुल्लचंद्र यांनी भरपूर अभ्यास केला. पारा व नाइट्रिक अँसिड यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या ‘मरर्क्युरस नाईट्राईट’च्या शोधाणे प्रफुल्लचंद्र यांना जगभरात नवीन ओळख मिळाली. 1894 ते 1934 या चाळीस वर्षाच्या काळात त्यांचे दीडशे शोधनिबंध जगभरातील प्रसिद्ध शोधपत्रिकातून प्रसिद्ध झाले. अमोनियम नाइट्राइटचे पथ:,,क्करन करण्यात आचार्य व त्यांचा विद्यार्थी चमू यशस्वी झाला. या शोधाने जगभरातील वैज्ञानिकांचे श्वास रोखले गेले.अमोनियम नाईट्राईट स्फटिक स्वरूपात वेगळे मिळविले होते व हवा विरहित जागेत त्याचे विघटन न होता बाष्पीभवन होते तेही 60 डिग्री वर हे आचार्यांनी सहजपणे दाखवले. या शोधाबद्दल इंग्लंडच्या केमिकल सोसायटीत आचार्यांचा गौरव करण्यात आला. इंग्रजांच्या गुलामगिरीमुळे सत्व हरवलेल्या भारतीय मनात प्राण फुंकण्यासाठी आचार्यांनी ‘HISTORY OF HINDU CHEMISTRY’ हे पुस्तक लिहिले.औद्योगिक क्षेत्रात आचार्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. त्यांनी संपूर्ण स्वदेशी अशा ‘बेंगाल केमिकल्स अँड फार्मासिटिकल वर्क्स’ उद्योगाची मूर्तमेढ 1901 साली कलकत्त्याला केली. स्वदेशी विज्ञानच राष्ट्रस प्रगतीपथावर नेऊ शकते, याच ध्यासाने अध्यापन करणारा हाडाचा शिक्षक म्हणजे आचार्य.स्वदेशी उद्योगाची कास पकडून भारताचा पाठिचा कणा ताठ करणारा उद्योजक म्हणजे आचार्य.आचार्य म्हणजे सप्तऋषी तेजोगोलातून भारतभूमीवर अवतरलेला, ज्ञान भंडाराने परिपूर्ण असलेला वशिष्ठच.. भारतीय रसायनशास्त्राची आभा जगभर पसरविणारे एक तेजोमय जीवन 16 जून 1944 रोजी आसमंतात विलीन झाले.आधुनिक रसायनशास्त्राच्या या जनकास आमचे त्रिवार वंदन……

विज्ञान सेनानी.

शब्दांकन -वसुंधरा साठे

संकलन-डॉ.बी. व्ही. लिंबाळकर