डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक होते. डॉ.नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै१९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. “स्थिर स्थिती सिद्धान्त” डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने ‘व्याख्यानबाजी’ असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे..
विज्ञानकथा पुस्तके संपादन अंतराळातील भस्मासुर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ अवकाश सफरीला टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस अंतराळ आणि विज्ञान आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती) नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी) विश्वाची रचना विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप विज्ञानाचे रचयिते समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक) Seven Wonders Of The Cosmos सूर्याचा प्रकोप. त्याचबरोबर आत्मचरित्र “चार नगरांतले माझे विश्व”याचे पण लिखाण त्यांनी केले….
नारळीकर यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट मिळाली आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी
२००४ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. याआधी, १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले होते.
१९८१ मध्ये त्यांना इचलकरंजी येथील एफआयई फाउंडेशनने ‘राष्ट्र भूषण’ प्रदान केले होते.
त्यांना २०१० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
त्यांना भटनागर पुरस्कार , एमपी बिर्ला पुरस्कार आणि सोसायटी अॅस्ट्रोनॉमिक डी फ्रान्स (फ्रेंच अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी) चे प्रिक्स ज्यूल्स जॅन्सेन हे पुरस्कार मिळाले आहेत . ते लंडनच्या रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे असोसिएट आणि तीन इंडियन नॅशनल सायन्स अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत. त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाव्यतिरिक्त, नारळीकर हे त्यांच्या पुस्तके, लेख आणि रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे विज्ञानाचे संवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रयत्नांसाठी, त्यांना १९९६ मध्ये युनेस्कोने कलिंग पुरस्काराने सन्मानित केले.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्ल सागन यांच्या कॉसमॉस: अ पर्सनल व्हॉयेज या टीव्ही शोमध्ये ते वैशिष्ट्यीकृत झाले होते. १९८९ मध्ये, त्यांना केंद्रीय हिंदी संचालनालयाकडून आत्माराम पुरस्कार मिळाला.
त्यांना १९९० मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला.
त्यांनी २००९ मध्ये इन्फोसिस पुरस्कारासाठी भौतिक विज्ञान ज्युरीमध्येही काम केले.
२०१४ मध्ये, त्यांना त्यांच्या मराठीतील आत्मचरित्र, चार नागरांतले भूलभुलैया विश्वासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
आपले संपूर्ण जीवन खगोलशास्त्र .गणित आणि विज्ञानाला समर्पित करणारे असे आदरणीय जयंत नारळीकर यांनी जगाच्या नकाशावर भारतात चे नाव तेजोमय केले. असा हा तारा दिनांक 20 मे 2025 रोजी आकाशामध्ये सदैव चमकण्यासाठी आपल्या सर्वातून निघून गेला............
संदर्भ - इंटरनेट
संकलन- डॉ बाहुबली लिंबालकर
20 मे तारीख 2025 मंगळवारी सकाळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर सर यांचे दुःखद निधन झाले ही बातमी कळाली आणि मन सुन्न झाले. सविस्तर माहिती घेतली असता असे समजले की नारळीकर सरांचे गेल्या आठवड्यात त्यांचे हिप ऑफ फ्रॅक्चर चे ऑपरेशन झाले होते. त्यांना घरी आणले होते. ते त्यांचे आई वडील बसत त्या खुर्चीवर तीन तास बसले. आयझर मध्ये गाडीतून चक्कर मारून आले. काल दिवसभर आनंदात होते आणि सकाळी सर अनंतात विलीन झाले.
विज्ञान क्षेत्रातील एक अद्वितीय ध्रुवतारा निखळला. ज्यांना लहानपणापासून आपले हिरो मानत आलो, विज्ञान अथवा वैज्ञानिक म्हटलं की मराठी घरांमध्ये पहिलं नाव उच्चारलं जायचं, 'नारळीकर'.गणित व खगोलशास्त्रामध्ये ज्यांच्यामुळे आवड निर्माण झाली असे जयंत नारळीकर सर आता पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाहीत या विचाराने मन दु:खी झाले. पण म्हणतात ना 'जातस्य ध्रुवो ही मृत्यू' तथा जो जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच. आमच्या पिढीला डॉ जयंत नारळीकर यांचा सारखा शास्त्रज्ञ व त्यांचा सहवास लाभणे हे आमचे भाग्यच. जसा सचिन तेंडुलकर प्रत्येकाला आपल्या घरातला सदस्य वाटायचा तसेच नारळीकर सरही प्रत्येक विज्ञान प्रेमीला आपल्या घरातला सदस्यच वाटायचे. त्यामुळे प्रत्येक विज्ञान प्रेमीला नारळीकर सर आपल्यात नाहीत हे ऐकून फार दुःख झाले. यानंतर डॉ नारळीकर सरांच्या सहवासातील आठवणींनी मनामध्ये गर्दी केली होती. नारळीकर सरांचे संशोधन, परदेशातील शिक्षण, भारतात आगमन, TIFR मध्ये संशोधन सुरू असताना जेष्ठ शास्त्रज्ञ श्री यश पाल यांच्या आग्रहाखातर 'आयुका'ची स्थापना व व विस्तार, विज्ञान साहित्याची निर्मिती व अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये केलेली बहुमोल कामगिरी हे सर्व आठवले. त्यांची गणितातील आवड हे मात्र वाखाणण्याजोगी होती. नारळीकर सरांचे शिक्षण संशोधन याबद्दल अनेक मान्यवर त्यांच्या लेखांमधून ही माहिती देतीलच पण मला उमजलेले नारळीकर सर मी या लेखात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
आयुकामध्ये JVN या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले, आयुकाचे चैतन्य आणि श्वास असणारे असलेले नारळीकर सर यांच्या विज्ञान साहित्याबद्दल सांगायचे झाल्यास मी शाळेत असताना 'आकाशाशी जडले नाते, वामन परत न आला, प्रेषित या कादंबऱ्या वाचण्यात आल्या. प्रेषित व यक्षांची देणगी या कादंबऱ्यांनी तर प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि त्याचे गारुड आजतागायत कायम आहे. विज्ञानातील संकल्पना विज्ञान कथांच्या माध्यमातून अतिशय सोप्या करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांना विज्ञानामध्ये गोडी निर्माण केली. विशेषतः मराठी भाषेमध्ये सरांनी विपुल लिखाण केले. आपण साहित्यिक नाही हे वारंवार सर सांगत आले मात्र त्यांची पुस्तक वाचल्यानंतर असे कळते की साहित्याबद्दलची त्यांची जाण किती मोठ्या उंचीची आहे.
14 जानेवारी 2017 रोजी नारळीकर सर परभणीला आले असता त्यांची भेट घेण्याचा योग आला आणि त्यांचा प्रवासी प्रबंधक म्हणून त्यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण. या दिवसभरात नारळीकर सरांना अजून जवळून अनुभवता आले. त्यामध्ये तुमच्या स्वभावातील नम्रपणा, आपण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असताना देखील प्रत्येक व्यक्तीला बोलताना असणारी अदब, त्या व्यक्तीची व्यवस्थित विचारपूस सर करायचे. नारळीकर सरांना लहान मुले यांच्या बद्दल खूप कौतुक आणि कुतुहल होते. लहान मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी व तो मनात रुजवण्यासाठी सर सर्वतोपरी प्रयत्न करायचे. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी शाळे शिक्षण घेत असताना आपण आयुका येथे भेटलो होतो आता वीस वर्षानंतर आपण भेटतोय आणि मी गणित या विषयांमध्ये पदवी मिळवत आहे. हे एकूण सरांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सौ मंगला नारळीकर यांना म्हणाले की ‘’अगं हा तुझ्या विषयाचा आहे बरं का?” तेव्हा तितक्यात मिश्किल पद्धतीने मंगला मॅडमने देखील त्यांना उत्तर दिले की ‘’अरे हो का ! गणिताबद्दल तू काय बोलणार बरं?’’ हे ऐकून त्या ठिकाणी चांगला हशा पिकला होता. असे अनेक प्रसंग या दाम्पत्यांच्या जीवनात घडले असतील. सर्वजण सरांसोबत फोटो काढण्यासाठी धडपडत होते पण मात्र नारळीकर सर वैतागून गेले होते पण मी मात्र त्यांना इच्छा बोलून दाखवली की मला तुमच्या सोबत एक फोटो घ्यावयाचा आहे. तेव्हा त्यांनी म्हणाले की हो नक्कीच! माझ्या बाजूला बसा. पण मात्र मी त्यांच्या पायाशी बसून फोटो काढला आणि मनात म्हणालो ‘मम पामरासी काय थोरपण, पायीची वाहने पायीच बरी.’
होएल-नारळीकर स्टेडी स्टेट थेअरीचा सिद्धांत मांडतानाचा एक अनुभव नारळीकर सर सांगतात की आदल्या दिवशी फ्रेड होएल सरांनी त्यांना या सिद्धांतावर वैज्ञानिक मंडळी काय उलट प्रश्न विचारू शकतात याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यानुसार सादरीकरणाच्या आतल्या रात्री नारळीकर सरांनी या सर्व उलट प्रश्नांची शक्यता व त्यावरील उत्तरे यांचा अभ्यास केला व यशस्वीरित्या तो प्रबंध सादर केला. हा प्रसंग मी माझ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग मांडताना सांगितला तेव्हा विद्यार्थ्यांनी तसेच केले आणि त्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. यानंतर दिवसभरात सरांकडून हे असे आणि अनेक प्रसंग सर सांगत राहिले आणि त्यांचे मार्गदर्शन मिळत राहिले. संध्याकाळी सरांचा ‘अवकाशातील विचित्र वर्षाव’ या विषयावर मराठीमध्ये व्याख्यान झाले आणि या व्याख्यानासाठी तुडुंब गर्दी झालेली होती. नंतर सर पुण्याला परत निघत असताना मी भारताच्या मंगळयान मोहिमेवर एक छोटेसे इंग्रजी भाषेतून संकलित पुस्तक तयार केले होते ते सरांना दाखवले सरांनी बघितल्यानंतर आनंद व्यक्त केला पण मात्र हे जर मराठीमध्ये लिहाल तर अजून आपल्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असे सुचवले. अगदी असेच मला श्री मोहन आपटे यांच्याकडून देखील सुचवण्यात आले होते.
यानंतर मात्र मी पुढचे सर्व लिखाण ते वर्तमानपत्रातील असो किंवा एखाद्या वैज्ञानिक घटनेबद्दल असो ते मराठी मधून लिहू लागलो आणि यानंतरच सरांना भेटण्यासाठी आलेले परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, डॉक्टर पी आर पाटील आणि सुधीर सोनुनकर या तीन महारथींची भेट व त्यांच्याशी जुळलेला ऋणानुबंध की जो आजतागायत कायम आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील की ज्यामुळे सरांचे सरांकडून बरेच काही शिकता आले व मिळवता आले. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे विज्ञान वारी हा उपक्रम दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात येतो यात विद्यार्थ्यांना एका परीक्षेद्वारे निवडून आयुका पुणे येथे नेण्यात येते . यामध्ये नारळीकर सरांचा ‘Ask a Scientists’ कार्यक्रम असतो यामध्ये लहान मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरे सर शास्त्रीय पद्धतीने व तितक्यात मिश्किल पद्धतीने देतात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा वैज्ञानिक आपल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो हेच मुलांसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि परभणीतील विद्यार्थ्यांची जवळपास 80 टक्के प्रश्न त्यामध्ये घेतले जातात याबद्दल नारळीकर सरांनी नेहमीच कौतुक केले आहे व याची नोंद घेतली आहे.
दोन वर्षांपूर्वी सरांच्या पत्नी सौ मंगला मॅडम यांचे निधन झाले आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाला नारळीकर सरांना व्हीलचेअर वर पाहिले तेव्हा मात्र काळजात चर्रर झाले. हिरोला व्हीलचेअर वर बघून खूप वाईट वाटले आणि यावर्षी नारळीकर सर खूप आजारी असताना देखील गणित या विषयावर सरांनी ‘Ask a Scientists’ कार्यक्रमा ऐवजी गणित या विषयावर व्याख्यान दिले आणि वाटले की आता सरांनी एक नवीन इनिंग सुरू केली आहे. पर्यंत सरांची बुद्धी विलक्षण साथ देत होती. पण सर मात्र शरीराने खूप थकले आहेत असे दिसत होते. मी माझा मित्र जयेश चाचड आम्ही सरांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि तसेच घडले 20 मे मंगळवारी सकाळी नारळीकर सर आपल्यात नाहीत ही बातमी कळली आणि मन सुन्न झाले. पृथ्वीवरील एक अढळपदी विराजमान असलेला तेजस्वी तारा लुप्त झाला अशीच त्यांच्या बद्दल प्रत्येकाची भावना झाली. जरी नारळीकर सर आपल्यात नसले तरी देखील त्यांनी जो विज्ञानाचा त्यांच्या साहित्याचा जो ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे, जो मार्ग आखून दिला आहे त्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे पण मात्र आकाशाशी नाते जोडणाऱ्या या व्यक्तीच्या कार्याला एका लेखात कवेत घेणे कसे शक्य होईल बरे! जोपर्यंत सूर्य-चंद्र असतील तोपर्यंत या ‘आकाशाशी नातं जोडणाऱ्या’ या तेजस्वी ताऱ्याचे आढळपद प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनात कायम राहील.
प्रसाद वाघमारे खगोलशास्त्र तथा गणित अभ्यासक सहसचिव, परभणी कल सोसायटी, परभणी
पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आज दिनांक 20 मे 2025 रोजी , आकाशाशी जडलेले नाते ,असलेल्या प्रा डॉ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली परभणीकरांच्या वतीने अर्पण करण्यात आली.
जगातील ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांनी केलेल्या कार्य अगदी सोप्या भाषेमध्ये खगोलाचा अभ्यास, खगोलीय गोष्टी आहेत , त्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मांडण्याचा काम आदरणीय प्रा डॉ जयंत नारळीकर यांनी केलेला आहे
परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल , परभणी यांच्या वतीने विज्ञान चौक,परभणी या ठिकाणी डॉ नारळीकर यांना , त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री संजयजी ससाने (शिक्षणाधिकारी योजना) तसेच आदरणीय डॉ पी आर पाटील सर, सुभाष जाधव सर, ओमसेठ तलरेजा, नागेश वाईकर सर, प्रद्युम्न शिंदे डॉ रवी शिंदे, प्रा राम कराळे त्याचबरोबर प्रसाद वाघमारे तसेच सुधीर सोनूनकर व विज्ञानप्रेमी परभणीकर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.
त्यांच्या कार्याची ओळख ही चिरंतन आणि शाश्वत असून, त्यांच्या कार्याचा उपयोग, सर्व खगोल संशोधन करणाऱ्यां विद्यार्थ्यास , संशोधकास उपयोग होईल. प्रा डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
पद्मविभूषण प्रो जयंत विष्णु नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलभौतिकिशास्त्रज्ञ होते. तसेच ते उत्तम विज्ञान प्रसारक – सुधारक होते. १९८८ मधे त्यानी IUCAA ची ,म्हणजे आंतरविद्यापीठिय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्र ची TIFR मधे असताना स्थापना केली . ते IUCAA चे संस्थापक संचालक होते. बनारस विश्व विद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर, परदेशात केम्ब्रिज विद्यापीठत ते शिकले. प्रो फ़्रेड होयल हे त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक होते, त्यांच्या सोबत त्यानी विश्वाच्या निर्मितिचा सिद्धांत मांडला त्याला च होइल- नारलीकर सिद्धांत असे सम्बोधतात. तो सिद्धांत आइंस्टाइनच्या सिद्धांतशी समांतर होता.
परभणी तून , परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसाइटी तर्फे , दरवर्षी होत असलेल्या विज्ञानवारी च्या IUCAA प्रवासात , पुणे IUCAA त, “आस्क द सायंटीस्ट” या सदरात प्रो जयंत नारळीकर हे स्वतः परभानीतील मुलांच्या प्रश्नाला उत्तर देत. या वर्षी त्यानी मूलांसाठी गणित या विषयवार विशेष व्याख्यान राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित घेतले होते. परभानीतील होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलची ते प्रेरणास्रोत आहेत.