+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

21 फेब्रुवारी 1894.
1 जानेवारी 1995.

भटनागर यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे क्रमाक्रमाने भारतात १४ राष्ट्रीय प्रयोगशाळांची मालिका निर्माण झाली. अशा प्रकारे भारतात विविध वैज्ञानिक शाखांतील पद्धतशीर संशोधनाला भटनागर यांच्या परिश्रमामुळे बहुमोल चालना मिळाली. पुढे १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘नैसर्गिक साधनसंपत्ती व वैज्ञानिक संशोधन’ या मंत्रालयाचे पहिले सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांनी विरल मृत्तिका, किरणोत्सर्गी (भेदक किरण वा कण बाहेर टाकणारी) खनिजे. गंधकयुक्त खनिजे, खनिज तेल इत्यादींचे भारतातील साठे शोधण्याच्या कार्याला चालना दिली.

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाचे १९५४ मध्ये ते सचिव झाले. विद्यापीठ अनुदान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. वैज्ञानिक शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक शासकीय व्याप साभांळून त्यांनी वैयक्तिक संशोधनही चालू ठेवले होते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी औद्योगिक दृष्टया उपयुक्त अशा विविध द्रव्यांच्या निर्मितीच्या प्रकिया शोधून काढल्या (उदा., विषारी वायूचा वा धुराचा परिणाम न होणारे व कापडावर लेप देता येणारे रोगण, फेसाळ रबराच्या निर्मितीसाठी योग्य असा विद्राव, विस्फोटक द्रव्यांच्या साठवणीसाठी लागणारी विशिष्ट प्रकारची पात्रे. न फुटणारे व काचसदृश गुणधर्म असलेले पदार्थ आणि त्यांपासून उपयुक्त उपकरणे बनविणे, कृषी व्यवसायातील टाकाऊ पदार्थापासून प्लॅस्टिके तयार करणे वगैरे). त्यांना अनेक रासायनिक प्रक्रियांची व उपकरणांची एकस्वे मिळालेली होती.

भटनागर यांना त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले. ब्रिटिश सरकारने १९३६ मध्ये, ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ व १९४१ मध्ये ‘नाइट’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. ऑक्सफर्ड, पाटणा, अलाहाबाद, लखनौ, आग्रा व सागर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला. १९४३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थाचे सदस्य म्हणून निवड होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची नंतर निवड झाली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्टस ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेचं सदस्यत्व मिळणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत. भारतीय विज्ञान परिषदेच्या रसायनशास्त्र शाखेचे १९२८ व १९३८ मध्ये ते अध्यक्ष होते आणि १९४५ साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी सु. १७० संशोधनात्मक निबंध व लेख लिहीले. त्यांच्या इलमुलवर्क हा विद्यूत शास्त्रावरील उर्दु ग्रंथ व लाजवंती हा उर्दु कवितांचा संग्रह हेही प्रसिद्ध आहेत.

तरूण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ यांनी केलेल्या लक्षणीय महत्वाच्या संशोधनाला योग्य मान्यता मिळण्यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे भटनागर यांच्या स्मरणार्थ १९५७ पासून प्रतिवर्षी पाच ते सहा ‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिके’ देण्यात येत आहेत. ही पारितोषिके ४५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञांना त्यांनी पारितोषिक देण्यात येणाऱ्या वर्षाच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या भौतिकीय, रासायनिक, जीववैज्ञानिक, अभियांत्रिकीय, वैद्यकीय, गणितीय वा इतर विज्ञानांत केलेल्या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल देण्यात येतात.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट