+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

शिक्षणाचा दिवा घरोघरी लावणारे, थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक –
2
2 सप्टेंबर 1887.
9 मे 1959.

भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली. तेव्हापासून अनेक विद्वान व बहुजनसमाज आदराने आणि प्रेमाने त्यांना कर्मवीर म्हणू लागला. ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

भाऊराव यांचा जन्म कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.

भाऊराव पाटील हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. त्यातच १९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता.

पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले.

गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

भाऊराव हे बहुजनसमाजाच्या शैक्षणिक उद्धाराकडे वळले, त्याचे वास्तविक कारण सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य करून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. स्वतःच्या मातापित्यांची व समाजाचीही नाराजी त्यांनी ओढवून घेतली. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले. रयत शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने जनतेची झाली. वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली.

गांधींवधानंतरच्या उद्रेकात १९४७ साली संस्थेचे सरकारी अनुदान काही दिवस स्थगित करण्यात आले; पण कर्मवीर भाऊराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाणेदारपणाने लोकाश्रयावर संस्था पुढे चालविली व संवर्धित केली.

कर्मवीर भाऊराव हे विलक्षण जिद्दीचे व धडाडीचे कार्यकर्ते होते. धिप्पाड शरीर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि गरीब, पददलितांचा अंतर्यामी जिव्हाळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होत. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले व राजर्षी शाहू महाराज यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. सद्गुरू गाडगेबाबांचेही रयत शिक्षण संस्थेस अमोल साह्य लाभले.

भाऊराव यांनी भगीरथ प्रयत्नांनी खेड्यापाड्यांत ज्ञानगंगा नेऊन पोचविली. त्यांची रयत शिक्षण संस्था ही आशियातील एक मोठी व नावलौकिक प्राप्त झालेली संस्था असून तिच्या शाखा महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांत व कर्नाटक राज्यात विस्तारलेल्या आहेत. त्यांमध्ये ३१ पूर्व प्राथमिक, ४२ प्राथमिक, ४३८ माध्यमिक आणि ४२ महाविद्यालये आहेत. तसेच गरीब व होतकरू मलांसाठी ५१ आणि मुलींसाठी २९ अशी एकूण ८० वसतीगृहे आहेत (२०१९).


संदर्भ :
Matthew, A. V., Karmaveer Bhaurao Patil, Satara, 1958.


संकलन -डॉक्टर बाहुबली लिंबाळकर