20 मे तारीख 2025 मंगळवारी सकाळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर सर यांचे दुःखद निधन झाले ही बातमी कळाली आणि मन सुन्न झाले. सविस्तर माहिती घेतली असता असे समजले की नारळीकर सरांचे गेल्या आठवड्यात त्यांचे हिप ऑफ फ्रॅक्चर चे ऑपरेशन झाले होते. त्यांना घरी आणले होते. ते त्यांचे आई वडील बसत त्या खुर्चीवर तीन तास बसले. आयझर मध्ये गाडीतून चक्कर मारून आले. काल दिवसभर आनंदात होते आणि सकाळी सर अनंतात विलीन झाले.
विज्ञान क्षेत्रातील एक अद्वितीय ध्रुवतारा निखळला. ज्यांना लहानपणापासून आपले हिरो मानत आलो, विज्ञान अथवा वैज्ञानिक म्हटलं की मराठी घरांमध्ये पहिलं नाव उच्चारलं जायचं, 'नारळीकर'.गणित व खगोलशास्त्रामध्ये ज्यांच्यामुळे आवड निर्माण झाली असे जयंत नारळीकर सर आता पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाहीत या विचाराने मन दु:खी झाले. पण म्हणतात ना 'जातस्य ध्रुवो ही मृत्यू' तथा जो जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच. आमच्या पिढीला डॉ जयंत नारळीकर यांचा सारखा शास्त्रज्ञ व त्यांचा सहवास लाभणे हे आमचे भाग्यच. जसा सचिन तेंडुलकर प्रत्येकाला आपल्या घरातला सदस्य वाटायचा तसेच नारळीकर सरही प्रत्येक विज्ञान प्रेमीला आपल्या घरातला सदस्यच वाटायचे. त्यामुळे प्रत्येक विज्ञान प्रेमीला नारळीकर सर आपल्यात नाहीत हे ऐकून फार दुःख झाले. यानंतर डॉ नारळीकर सरांच्या सहवासातील आठवणींनी मनामध्ये गर्दी केली होती. नारळीकर सरांचे संशोधन, परदेशातील शिक्षण, भारतात आगमन, TIFR मध्ये संशोधन सुरू असताना जेष्ठ शास्त्रज्ञ श्री यश पाल यांच्या आग्रहाखातर 'आयुका'ची स्थापना व व विस्तार, विज्ञान साहित्याची निर्मिती व अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये केलेली बहुमोल कामगिरी हे सर्व आठवले. त्यांची गणितातील आवड हे मात्र वाखाणण्याजोगी होती. नारळीकर सरांचे शिक्षण संशोधन याबद्दल अनेक मान्यवर त्यांच्या लेखांमधून ही माहिती देतीलच पण मला उमजलेले नारळीकर सर मी या लेखात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
आयुकामध्ये JVN या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले, आयुकाचे चैतन्य आणि श्वास असणारे असलेले नारळीकर सर यांच्या विज्ञान साहित्याबद्दल सांगायचे झाल्यास मी शाळेत असताना 'आकाशाशी जडले नाते, वामन परत न आला, प्रेषित या कादंबऱ्या वाचण्यात आल्या. प्रेषित व यक्षांची देणगी या कादंबऱ्यांनी तर प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि त्याचे गारुड आजतागायत कायम आहे. विज्ञानातील संकल्पना विज्ञान कथांच्या माध्यमातून अतिशय सोप्या करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांना विज्ञानामध्ये गोडी निर्माण केली. विशेषतः मराठी भाषेमध्ये सरांनी विपुल लिखाण केले. आपण साहित्यिक नाही हे वारंवार सर सांगत आले मात्र त्यांची पुस्तक वाचल्यानंतर असे कळते की साहित्याबद्दलची त्यांची जाण किती मोठ्या उंचीची आहे.

14 जानेवारी 2017 रोजी नारळीकर सर परभणीला आले असता त्यांची भेट घेण्याचा योग आला आणि त्यांचा प्रवासी प्रबंधक म्हणून त्यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण. या दिवसभरात नारळीकर सरांना अजून जवळून अनुभवता आले. त्यामध्ये तुमच्या स्वभावातील नम्रपणा, आपण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असताना देखील प्रत्येक व्यक्तीला बोलताना असणारी अदब, त्या व्यक्तीची व्यवस्थित विचारपूस सर करायचे. नारळीकर सरांना लहान मुले यांच्या बद्दल खूप कौतुक आणि कुतुहल होते. लहान मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी व तो मनात रुजवण्यासाठी सर सर्वतोपरी प्रयत्न करायचे. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी शाळे शिक्षण घेत असताना आपण आयुका येथे भेटलो होतो आता वीस वर्षानंतर आपण भेटतोय आणि मी गणित या विषयांमध्ये पदवी मिळवत आहे. हे एकूण सरांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सौ मंगला नारळीकर यांना म्हणाले की ‘’अगं हा तुझ्या विषयाचा आहे बरं का?” तेव्हा तितक्यात मिश्किल पद्धतीने मंगला मॅडमने देखील त्यांना उत्तर दिले की ‘’अरे हो का ! गणिताबद्दल तू काय बोलणार बरं?’’ हे ऐकून त्या ठिकाणी चांगला हशा पिकला होता. असे अनेक प्रसंग या दाम्पत्यांच्या जीवनात घडले असतील. सर्वजण सरांसोबत फोटो काढण्यासाठी धडपडत होते पण मात्र नारळीकर सर वैतागून गेले होते पण मी मात्र त्यांना इच्छा बोलून दाखवली की मला तुमच्या सोबत एक फोटो घ्यावयाचा आहे. तेव्हा त्यांनी म्हणाले की हो नक्कीच! माझ्या बाजूला बसा. पण मात्र मी त्यांच्या पायाशी बसून फोटो काढला आणि मनात म्हणालो ‘मम पामरासी काय थोरपण, पायीची वाहने पायीच बरी.’
होएल-नारळीकर स्टेडी स्टेट थेअरीचा सिद्धांत मांडतानाचा एक अनुभव नारळीकर सर सांगतात की आदल्या दिवशी फ्रेड होएल सरांनी त्यांना या सिद्धांतावर वैज्ञानिक मंडळी काय उलट प्रश्न विचारू शकतात याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यानुसार सादरीकरणाच्या आतल्या रात्री नारळीकर सरांनी या सर्व उलट प्रश्नांची शक्यता व त्यावरील उत्तरे यांचा अभ्यास केला व यशस्वीरित्या तो प्रबंध सादर केला. हा प्रसंग मी माझ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग मांडताना सांगितला तेव्हा विद्यार्थ्यांनी तसेच केले आणि त्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. यानंतर दिवसभरात सरांकडून हे असे आणि अनेक प्रसंग सर सांगत राहिले आणि त्यांचे मार्गदर्शन मिळत राहिले. संध्याकाळी सरांचा ‘अवकाशातील विचित्र वर्षाव’ या विषयावर मराठीमध्ये व्याख्यान झाले आणि या व्याख्यानासाठी तुडुंब गर्दी झालेली होती. नंतर सर पुण्याला परत निघत असताना मी भारताच्या मंगळयान मोहिमेवर एक छोटेसे इंग्रजी भाषेतून संकलित पुस्तक तयार केले होते ते सरांना दाखवले सरांनी बघितल्यानंतर आनंद व्यक्त केला पण मात्र हे जर मराठीमध्ये लिहाल तर अजून आपल्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असे सुचवले. अगदी असेच मला श्री मोहन आपटे यांच्याकडून देखील सुचवण्यात आले होते.
यानंतर मात्र मी पुढचे सर्व लिखाण ते वर्तमानपत्रातील असो किंवा एखाद्या वैज्ञानिक घटनेबद्दल असो ते मराठी मधून लिहू लागलो आणि यानंतरच सरांना भेटण्यासाठी आलेले परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, डॉक्टर पी आर पाटील आणि सुधीर सोनुनकर या तीन महारथींची भेट व त्यांच्याशी जुळलेला ऋणानुबंध की जो आजतागायत कायम आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील की ज्यामुळे सरांचे सरांकडून बरेच काही शिकता आले व मिळवता आले. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे विज्ञान वारी हा उपक्रम दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात येतो यात विद्यार्थ्यांना एका परीक्षेद्वारे निवडून आयुका पुणे येथे नेण्यात येते . यामध्ये नारळीकर सरांचा ‘Ask a Scientists’ कार्यक्रम असतो यामध्ये लहान मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरे सर शास्त्रीय पद्धतीने व तितक्यात मिश्किल पद्धतीने देतात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा वैज्ञानिक आपल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो हेच मुलांसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि परभणीतील विद्यार्थ्यांची जवळपास 80 टक्के प्रश्न त्यामध्ये घेतले जातात याबद्दल नारळीकर सरांनी नेहमीच कौतुक केले आहे व याची नोंद घेतली आहे.
दोन वर्षांपूर्वी सरांच्या पत्नी सौ मंगला मॅडम यांचे निधन झाले आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाला नारळीकर सरांना व्हीलचेअर वर पाहिले तेव्हा मात्र काळजात चर्रर झाले. हिरोला व्हीलचेअर वर बघून खूप वाईट वाटले आणि यावर्षी नारळीकर सर खूप आजारी असताना देखील गणित या विषयावर सरांनी ‘Ask a Scientists’ कार्यक्रमा ऐवजी गणित या विषयावर व्याख्यान दिले आणि वाटले की आता सरांनी एक नवीन इनिंग सुरू केली आहे. पर्यंत सरांची बुद्धी विलक्षण साथ देत होती. पण सर मात्र शरीराने खूप थकले आहेत असे दिसत होते. मी माझा मित्र जयेश चाचड आम्ही सरांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि तसेच घडले 20 मे मंगळवारी सकाळी नारळीकर सर आपल्यात नाहीत ही बातमी कळली आणि मन सुन्न झाले. पृथ्वीवरील एक अढळपदी विराजमान असलेला तेजस्वी तारा लुप्त झाला अशीच त्यांच्या बद्दल प्रत्येकाची भावना झाली. जरी नारळीकर सर आपल्यात नसले तरी देखील त्यांनी जो विज्ञानाचा त्यांच्या साहित्याचा जो ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे, जो मार्ग आखून दिला आहे त्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे पण मात्र आकाशाशी नाते जोडणाऱ्या या व्यक्तीच्या कार्याला एका लेखात कवेत घेणे कसे शक्य होईल बरे! जोपर्यंत सूर्य-चंद्र असतील तोपर्यंत या ‘आकाशाशी नातं जोडणाऱ्या’ या तेजस्वी ताऱ्याचे आढळपद प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनात कायम राहील.
प्रसाद वाघमारे
खगोलशास्त्र तथा गणित अभ्यासक
सहसचिव, परभणी कल सोसायटी, परभणी