डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक होते. डॉ.नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै१९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. “स्थिर स्थिती सिद्धान्त” डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने ‘व्याख्यानबाजी’ असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे..
विज्ञानकथा पुस्तके संपादन अंतराळातील भस्मासुर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ अवकाश सफरीला टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस अंतराळ आणि विज्ञान आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती) नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी) विश्वाची रचना विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप विज्ञानाचे रचयिते समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक) Seven Wonders Of The Cosmos सूर्याचा प्रकोप. त्याचबरोबर आत्मचरित्र “चार नगरांतले माझे विश्व”याचे पण लिखाण त्यांनी केले….
नारळीकर यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट मिळाली आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी
२००४ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. याआधी, १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले होते.
१९८१ मध्ये त्यांना इचलकरंजी येथील एफआयई फाउंडेशनने ‘राष्ट्र भूषण’ प्रदान केले होते.
त्यांना २०१० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
त्यांना भटनागर पुरस्कार , एमपी बिर्ला पुरस्कार आणि सोसायटी अॅस्ट्रोनॉमिक डी फ्रान्स (फ्रेंच अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी) चे प्रिक्स ज्यूल्स जॅन्सेन हे पुरस्कार मिळाले आहेत . ते लंडनच्या रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे असोसिएट आणि तीन इंडियन नॅशनल सायन्स अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत. त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाव्यतिरिक्त, नारळीकर हे त्यांच्या पुस्तके, लेख आणि रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे विज्ञानाचे संवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रयत्नांसाठी, त्यांना १९९६ मध्ये युनेस्कोने कलिंग पुरस्काराने सन्मानित केले.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्ल सागन यांच्या कॉसमॉस: अ पर्सनल व्हॉयेज या टीव्ही शोमध्ये ते वैशिष्ट्यीकृत झाले होते. १९८९ मध्ये, त्यांना केंद्रीय हिंदी संचालनालयाकडून आत्माराम पुरस्कार मिळाला.
त्यांना १९९० मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला.
त्यांनी २००९ मध्ये इन्फोसिस पुरस्कारासाठी भौतिक विज्ञान ज्युरीमध्येही काम केले.
२०१४ मध्ये, त्यांना त्यांच्या मराठीतील आत्मचरित्र, चार नागरांतले भूलभुलैया विश्वासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
आपले संपूर्ण जीवन खगोलशास्त्र .गणित आणि विज्ञानाला समर्पित करणारे असे आदरणीय जयंत नारळीकर यांनी जगाच्या नकाशावर भारतात चे नाव तेजोमय केले. असा हा तारा दिनांक 20 मे 2025 रोजी आकाशामध्ये सदैव चमकण्यासाठी आपल्या सर्वातून निघून गेला............
संदर्भ - इंटरनेट
संकलन- डॉ बाहुबली लिंबालकर
प्रकट मुलाखतीतून पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितला पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र
परभणी/ 9/4/2025
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री चैत्राम पवार यांची प्रकट मुलाखत व नागरी सत्कार सोहळा बुधवारी (दि.९) सायंकाळी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वनामकृवि परभणी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.जगदीश नाईक आणि डॉ.विजयकिरण नरवाडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्राम पवार यांच्या व्यक्तिमत्वासह त्यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण कांतराव झरीकर, प्रमुख वक्ते हरीश कुलकर्णी व स्वागताध्यक्ष संदीप देशमुख, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्कार मिळालेले चैत्राम पवार यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. धुळे जिल्हा- सार्की तालुक्यात बारीपाडा येथे त्यांनी जवळपास 400 हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण केलेले आहे. 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून 400 हेक्टर जंगलाचे संरक्षण केले. स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी जवळपास 5 हजारहून अधिक झाडे लावली असून आजूबाजूच्या 40 गावामध्येही ही वनसंवर्धनाची चळवळ सुरू आहे अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली. श्री.पवार यांनी घेतलेले शिक्षण, आपल्या कामाची केलेली सुरुवात, जनप्रबोधन, संघटन आदीबाबत डॉ.नाईक यांनी प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. श्री.पवार यांनी केवळ कष्टाचे डोंगर फोडले नाहीत, तर बारीपाडा गावच्या आदिवासींच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणला. अज्ञान, दारिद्य्र आणि अनारोग्य या समस्यांना तोंड देतानाच पर्यावरणाचा होणारा र्हास थांबवण्याचे महत्वाचे काम ते 30 वर्षापासून करत आहेत. बेसुमार वृक्षतोड थांबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रबोधन करताना भविष्याची चिंता आणि वर्तमानातील गरज यांची सांगड घालावी लागत होती. हळूहळू त्यांची मते ग्रामस्थांना पटू लागली; पण ती अंगवळणी पडण्यासाठी काही अवधी लागला. मुळात शाश्वत विकासासाठी ते झटत होते. त्यामुळे केवळ जंगल वाढविणे किंवा वृक्षतोड थांबविणे एवढ्यापुरता त्यांचा विषय नव्हताच. जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन या पाच बिंदूंवर त्यांनी काम केले आणि त्यासाठी डॉ.आनंद फाटक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रबोधन करूनही जंगलतोड होतच होतीआणि बारीपाडा शहाणा झाला तरी आसपासच्या गावांचं काय? त्यांच्या कुर्हाडी कोण थांबविणार? हा प्रश्न होता. त्यामुळे गावाने नियमावली बनवली आणि सर्वजण तिचे पालन करू लागले असे श्री.पवार यांनी सांगितले. केवळ झाडांची कत्तल थांबवायची नव्हती, तर निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करून बारीपाड्याच्या अनंत समस्यांचे उत्तर मिळवायचे होते. त्यातूनच त्याची लोकसहभागातून जैवसाखळी शाश्वत स्वरूपात उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जुन्या वृक्षांचे संवर्धन आणि नव्या झाडांची लागवड करताना जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा कधीही विसर पडू दिला नाही, असेही ते म्हणाले. केवळ पावसावर अवलंबून असणार्या आणि ठरावीकच पारंपरिक पिके घेणार्या बारीपाड्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. इंद्रायणीसारखी सुवासिक तांदळाची शेती केली तशी मोहाच्या फुलांपासून निरनिराळे पदार्थ बनवले. साबण, अगरबत्ती तयार झाली. बचतगटातून वडिलांनी घेतलेली रक्कम मुदत संपली तरी ती परत केली नाही तेव्हा वसुलीसाठी श्री.पवार यांनी सर्व सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एका क्षणात निर्णय घेतला. जेवढी रक्कम थकीत आहे तेवढ्या किमतीची भांडी घरातून उचलून आणा आणि बचत गटात ठेवा.अशा त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध केले आणि या प्रसंगामुळे बारीपाड्याच्या गावकर्यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला.
कधीकाळी बेसुमार वृक्षतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा बारीपाडा आता सदाहरित डोंगरासाठी आणि वाहणार्या ओढ्यांसाठी ओळखला जातो. निसर्ग आणि माणूस यांच्या समन्वयातून ही संपदा निर्माण झाली आहे. या कामामध्ये पुढील पिढी जोडण्याचे कामही सुरू असून 44 गावांचा समूह करून लोकसहभागातून 11 हजार 200 हेक्टर वनक्षेत पुढे आणल्याचे पवार यांनी सांगितले. आमच्याकडे महिला, पुरुष असा कुठलाच भेद नाही. वनभाजी महोत्सव 100 टक्के महिलांचा असतो. त्याला 20 वर्षे झाली असून त्यांना पूर्वी बोलता येत नव्हते अशा महिला सर्व भाज्यांची माहिती पटापट देतात. वन धन केंद्राच्या माध्यमातून 3 गावात मोहाच्या झाडासारख्या शाश्वत संसाधनांचा वापर करून उद्योग निर्मितीचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गरजा कमी करून नैसर्गिक संसाधने वाचवीण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत असे सांगून वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. जैवसाखळी ऍग्रो फॉरेस्ट्रिसारखी कामे विविध विद्यापीठे, संशोधक आदींच्या मदतीने 10 वर्षे सातत्याने काम केले तरच निश्चित बदल झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वन संवर्धन कार्यात युवकांचा वाढता सहभाग हे आशादायी चित्र असून पर्यावरणाशिवाय आपण जगूच शकत नाही हे सर्वांना कळू लागले आहे
परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम : विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती
परभणी/प्रतिनिधी
गोष्ट, नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम ‘गोष्टरंग’ च्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मोठी उपस्थिती लावली. परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘गोष्टरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बालसाहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. पहिली ते चौथीसाठी ‘हाकांचा पूल’ तर पाचवी ते आठवीसाठी ‘पेरू’ ही गोष्ट नाट्यरूपाने सादर केली. यावेळी गोष्टरंग टीमचे फेलोज सचिन चिंचोलकर, सायली जोशी, गणेश वसावे, क्वेस्टचे सचिन वीर, सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.प्रताप पाटील, डॉ.जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड, डॉ.बाहुबली लिंबाळकर, अशोक लाड, बालाजी दामुके, बबन आव्हाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश वाईकर यांनी केले तर त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले.
बालकलावंतांचा सत्कार…
सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकवणार्या बालकलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नृसिंह विद्यामंदिर पोखर्णीच्या कु. नम्रता वाघ, कु. पंकजा वाघ, कु. उत्कर्षा वाघ यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणी आयोजित तर आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे पहिल्या विज्ञानजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात विविध शाळांचे प्रोजेक्ट मॉडेल्स व प्रयोग यांची मांडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये अन्न, आरोग्य व स्वच्छता, वाहतूक व दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, संसाधन व्यवस्थापन, रोबोटिक्स व गणितीय मॉडेल या विविध विषयावर विद्यार्थी प्रोजेक्ट व प्रयोगाचे सादरीकरण करणार आहेत.
तसेच वनामकृवि विद्यापीठाचे देखील स्टॉल्स असणार आहेत. या विज्ञान जत्रेबरोबरच आनंदनगरी, तारांगण, लहान मुलांसाठी खेळ, ब्रह्मांड संकल्पना, दिवसाचे खगोल, ड्रोन तंत्रज्ञान, AI रोबोट, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन व विक्री, इत्यादींची विविध दालने असणार आहेत.
विज्ञान जत्रेचे आयोजन तारीख 8 फेब्रुवारी , शनिवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 , या वेळेत आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसर, प्रशासकीय बिल्डिंगच्या पाठीमागे परभणी येथे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानप्रेमी व परभणीतील शाळांनी जास्तीत जास्त संख्येने विज्ञान जत्रेला भेट द्यावी असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे करण्यात आली आहे.